वसई : वसई-विरारच्या विविध परिसरातील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे.पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधार यात्रा करावी लागत आहे. तर दुसरीकडे अपघाताचा धोका ही वाढला आहे. एकीकडे वसई विरार भागात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शहरात सतत विजेचा लपंडाव सुरू असतो. तर दुसरीकडे आता विविध भागातील पथदिवे बंद पडल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामोरे जावे लागत आहे.वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात, वसई पूर्वेच्या एव्हरशाईन, नालासोपारा प्रगतीनगर, चंदनसार, नायगाव, नायगाव उड्डाणपूल यासह अन्य ठिकाणच्या भागात पथदिवे बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. पथदिवे बंद असल्याने संध्याकाळ नंतर रस्त्यावर प्रचंड अंधार पसरतो.

यामुळे शाळेतून व शिकवणी वरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामावरून घरी परतणाऱ्या महिलांना घरी पोहोचणे कठीण झाले आहे. मुख्यत्वे रात्रीच्या सुमारास पथदिव्यांच्या अभावी परिसरात वावरणे देखील आता नागरिकांना कठीण होऊन बसले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.पथदिवे सुरू नसल्यामुळे रोज रात्री अंधारात घरी परतावे लागते. ज्यामुळे रस्त्यावर चालायला देखील भीती वाटते. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना रस्त्यावरून चालताना बरीच अडचण येते. तसेच अनेकजण रस्त्यावर धडपडून पडल्यामुळे त्यांना इजा देखील झाली असल्याचे नालासोपारा येथील सत्य प्रकाश यांनी सांगितले आहे.

पालिकेने शहरातील विविध ठिकाणच्या पथदिव्यांची पाहणी करून जे नादुरुस्त व बंद झाले असतील ते सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे काही भागांतील पथदिवे बंद होत आहेत. विविध ठिकाणी पालिकेचे पथदिवे देखभाल दुरुस्ती पथकाकडून दुरुस्त केले जातील असे महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पथदिव्यांअभावी महिलासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पथदिवे नसल्यामुळे संध्याकाळ झाली की आम्ही घरीच बसून राहतो. मुलं खेळायला बाहेर जात नाहीत. तसेच महिलांनाही एकटं बाहेर पडणं सुरक्षित वाटत नाही. नोकरीवरून परतणाऱ्या महिलांना देखील या भागातून प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे, असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताचा धोका

मुख्य रस्त्यासह शहराअंतर्गत रस्त्यावरील विविध ठिकाणी पथदिवे बंद असतात. आता पावसाळा असल्याने जास्तच अंधार असतो अशावेळी वाहने चालविणे कठीण होते. पथदिवे बंद असल्याने काही वेळा रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे वाहनांचे चाक त्यात अडकून अपघात होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.