वसई: ऐतिहासिक वसई किल्ल्याचा २८७ वा विजयोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विजयोत्सवात मशाल यात्रा,नरवीर चिमाची आप्पांच्या पुतळ्याचे पूजन, ढोल ताशा पथकांचे वादन, लेझीम पथकांचा नृत्याविष्कार व पारंपारीक वेशभूषा अशा विविध कलाकृती सादर करण्यात आल्या. याच उत्सवाच्या निमित्ताने हा ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.

वसई विरार महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे २८७ वा विजयोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी सकाळी वज्रेश्वरी मंदिरातून निघालेल्या मशाल यात्रेने या विजयोत्सवाला प्रारंभ झाला होता. वज्रेश्वरीवरून मशाल यात्रा वसईच्या पारनाका येथे आल्यानंतर ढोल-ताशा पथक, लेझीम पथकांच्या जल्लोषपूर्ण गजरात मशाल यात्रा वसई किल्ल्यापर्यंत काढण्यात आली.

तसेच मशाल शोभायात्रेत ढोल ताशा ,लेझीम, वेगवेगळ्या वेशभूषेतील कलाकार नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नरवीर चिमाजी अप्पा स्मारक पुजन व नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गौतम बुद्धांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पअर्पण करण्यात आले. त्यानंतर पहलगाम येथील हल्ल्यात निधन झालेल्या व्यक्तींना तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्रगीत व राज्यगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या विजयोत्सवासाठी आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी, माजी महापौर राजीव पाटील, नारायण मानकर, यासह माजी नगरसेवक व गडप्रेमीं व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांना अवकाळीचा फटका

अवकाळी पडलेल्या पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वसई किल्ला, वसई गाव येथील परिसर चिखलमय झाल्यामुळे ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ निमित्त आयोजित करण्यात येत असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले होते व हा कार्यक्रम तीन दिवसांऐवजी एक दिवसीय करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संवर्धनासाठी प्रयत्न करणार

पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच वसईला विजयोत्सवाच्या निमित्ताने भेट दिली. वसईला लाभलेली निसर्गसंपदा व येथील ऐतिहासिक वारसा यांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच येथील पर्यटन क्षेत्र कसे विकसित करता येतील त्या दृष्टीने ही सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.