वसई : वसई विरार शहरात रिक्षाचालकांची वाढलेली मुजोरी, नियमबाह्य पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षा अशा तक्रारी नंतर अखेर परिवहन विभागाने कारवाईसाठी विशेष भरारी पथके नियुक्त करून कारवाई सुरू केली आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चारही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

तर रिक्षाचे परवाने खुले झाल्यापासून रिक्षाचालकांच्या संख्येत अजून भर पडली आहे. पण याचबरोबर रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मुजोरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर काही रिक्षा चालक हे बेकायदेशीर पणे रिक्षा चालवित असल्याचे प्रकार घडत आहे.

रेल्वे स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवर बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभी करून वाहतूक कोंडी करणे, कोरोनाकाळात केलेल्या भाडेवाढीनुसार अतिरिक्त भाडे आकारणे, रात्रीच्या वेळेस दुप्पट भाड्याची मागणी करणे, भाडे नाकारणे, तसेच प्रवाशांना धमकावणे अशा विविध समस्यांना प्रवाशांना दररोज सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लोकदरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तर नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

त्यानुसार वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथकात वाढ करून कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यात परिवहन विभागाची सुरुवातीला सहा पथके होती आता आणखीन दोन पथकांची वाढ करण्यात आली आहे. वसई विरारसाठी दोन स्वतंत्र भरारी पथक नियुक्त करून कारवाया केल्या जात असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत त्यांच्यामार्फत शहरात कारवाई सुरू झाली आहे.अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई.