वसई: एमएमआरडीएच्या ४०३ सुर्या प्रकल्प योजनेतून १७० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. त्यापाठोपाठ आता शहराला देहरजी पाणी प्रकल्पातून १९० दशलक्षलीटर व खोलसापाडा २ या धरणातून २२ दशलक्षलीटर अतिरिक्त पाणी लवकरच उपलब्ध होणार आहे. दोन्ही प्रकल्पांची ८० टक्के कामे पूर्ण झाली असल्याने आगामी काळात वसई विरार मधील पाणी चिंता मिटणार आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण वाढत असल्याने लोकसंख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी ही प्रचंड वाढली आहे. सध्या शहराला सूर्या योजनेच्या धामणी व कवडास, उसगाव , पेल्हार या तीन धरणातून २३० दशलक्ष लीटर तर एमएमआरडीएच्या ४०३ सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा मंजूर केला आहे. त्यापैकी १७० दशलक्ष लीटर असा एकूण ४०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रतिदिन होतो. मात्र सद्यस्थितीत ४२२ दशलक्ष लीटर पाण्याची मागणी आहे. तर दुसरीकडे अन्य तांत्रिक कारणांमुळे पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची तूटही सहन करावी लागत आहे.
२०४१ पर्यंत शहराची लोकसंख्या ही ५२ लाखांच्या घरात जाणार असल्याचे गृहीत धरले आहे. त्यामुळे आगामी काळात शहराला सुमारे ८४२ दशलक्ष लीटर इतकी पाण्याची गरज भासणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर एमएमआरडीए मार्फत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे सुकसाळे येथे देहरजी प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) यांच्या तर्फे ९३.५५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेच्या प्रकल्पातून २५५ दशलक्षलीटर प्रतिदिन उपलब्ध होणार आहे. त्यातून वसई विरार पालिकेला १९० दशलक्ष लीटर इतक्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या प्रकल्पाचे काम आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण केले जाणार असल्याचे एमएमआरडीएने सांगितले आहे.
तर दुसरीकडे पालिकेने खोलसापाडा १ व २ या धरणांची कामेही प्रगतीपथावर असून त्याखोलसापाडा-२ धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. २०२६ मध्ये हा प्रकल्प मार्गी लागणार असून१३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातून पालिकेला २२ दशलक्षलीटर मिळणार आहे असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे. या आगामी काळात देहरजी व खोलसापाडा २ प्रकल्पातून शहराला २१२ दशलक्षलीटर इतके पाणी उपलब्ध होणार असल्याने शहरातील पाणी समस्या मिटण्यास मोठी मदत होणार आहे.
तसेच खोलसापाडा १ साठी सुमारे २९० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे दिला आहे. त्याला मंजुरी मिळाली तर आणखीन ४८ दशलक्षलीटर पाणी उपलब्ध होईल असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.
वसई विरार शहराला पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने व्हावा यासाठी पालिका प्रयत्न करीत आहेत. नवीन प्रकल्प ही लवकरच मार्गी लागतील. याशिवाय वितरण वाहिन्या अंथरण्याचे काम ही प्रगतीपथावर आहेत. – अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका
पालिकेचे पाण्याचे नियोजन
धरण पाणी पुरवठा ( प्रतिदिन)
पेल्हार – २० दशलक्षलीटर
उसगाव – १० दशलक्ष लीटर
सुर्या १व३ – २०० दशलक्ष लीटर
एमएमआरडीए – १७० दशलक्ष लीटर
देहरजी – १९० दशलक्ष लीटर (काम प्रगतीपथावर )
खोलसापाडा २- २२ दशलक्ष लीटर (काम प्रगतीपथावर)
पाण्याची मागणी (दशलक्ष लीटर मध्ये)
वर्ष | मागणी |
२०२५ | ४२२ |
२०३१ | ५३२ |
२०३५ | ६५६ |
२०४१ | ८४२ |
पाणी वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण
वसई विरार शहरात अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध झाला असल्याने त्याचे योग्य रित्या वितरण होण्याच्या अनुषंगाने नवीन जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या टाकणे, त्यातील त्रुटी सुधारणे अशी कामे प्रगतीपथावर आहेत. डिसेंबर अखेर पर्यंत ती कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे पाण्याचा पुरवठा अधिक सुरळीत होईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.