डॉ. मिलिंद पराडकर discover.horizon@gmail.com

रामचंद्रपंत अमात्यांचे आज्ञापत्र हा एक अद्भुत ग्रंथ आहे. किंबहुना, तो शिवकालीन राज्यव्यवस्थेचा आरसा आहे. पुस्तक आहे लहानसंच. साठ-सत्तर पानांचं. ग्रंथाची ओळख करून देणारी दोन सोडली तर त्यात मोजून सात प्रकरणं. त्यात पंत आरमाराविषयी बोलले आहेत, सावकारांविषयी बोलले आहेत. राजा, मंत्री, वृत्ती व इनामे यांच्याविषयी बोलले आहेत. आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे, या पुस्तकात दुर्गाविषयी त्यांनी जे भाष्य केलं आहे, ते केवळ अतुलनीय आहे. किंबहुना, शिवछत्रपतींचे विचारच त्यांनी शब्दबद्ध केले आहेत असं म्हटलं तर ते जास्त सयुक्तिक ठरेल. रामचंद्रपंत अमात्यांचा जन्म इ.स. १६५० या सालचा. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी ही व्यक्ती अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदापर्यंत पोहोचली होती. नेमका अर्थ असा की, शिवछत्रपतींसारख्या विचक्षण राजाच्या मंत्रिमंडळात, इतक्या कोवळ्या वयात महसूलमंत्री होण्याइतकी विलक्षण बुद्धिमत्ता रामचंद्रपंतांपाशी होती. हाती घेतल्या कार्याला उपयोगी पडतील अशी नेमकी माणसे निवडण्याची देवदत्त देणगी शिवछत्रपतींना लाभली होती. अमात्य होण्याची योग्यता त्यांनी रामचंद्रपंतांच्या ठायी पंधरा-सोळाव्या वर्षीच हेरली असावी व त्यांना पंखाखाली घेऊन त्यांचं त्या दृष्टीने संगोपन केलं असावं. हे अशासाठी म्हटलं की, या अज्ञापत्रातला प्रत्येक शब्द इतका ठाशीव आहे, प्रत्येक वाक्य इतकं अर्थगर्भ आहे की, हे स्वये थोरल्या राजांचे विचार याविषयी मनी शंका राहत नाही. यातील एका एका वाक्याचं विश्लेषण करायचं झालं तर पानेच्या पाने लिहावी लागावीत इतकं सूचक, इतकं अर्थपूर्ण लिखाण आहे हे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

यातील दुर्गप्रकरण तर विशेष आहे. दुर्ग हा थोरल्या राजांच्या राज्याचा जणू प्राण होता. दुर्गाच्या प्रत्येक अंगोपांगाविषयी या प्रकरणात नेटका विचार केलेला आहे. आपल्यास जे जे नावीन्यपूर्ण म्हणून सुचावं, त्याची नेमकी नोंद यात आढळते अन् त्या प्रज्ञेसमोर आपसूकच नतमस्तक व्हायला होतं. दुर्ग जिथे बांधायचा ते स्थळ कसं असावं, तिथे जाणारे मार्ग, अरण्ये, दुर्गाची द्वारे, पाण्याची सोय, दुर्गातील इमारती, दारुगोळा अन् त्याची कोठारे, शस्त्रास्त्रे अन् हे ज्यांच्या हाती, ती माणसं कशी असावीत याचं नेमकं विवरण नेमक्या अन् नेमस्त शब्दांत केलेलं आपल्याला आढळून येतं. या पद्धतीचं लिखित रूप वा वर्णन आपल्याला फक्त कौटिल्याच्या अर्थशास्त्रातच आढळतं. फक्त अर्थशास्त्रात दुर्गात काय असावं यावर जास्त भर दिलेला आढळतो; मात्र दुर्ग अंतरंगी कसा असावा यासंबंधीचं अर्थशास्त्रातील विवेचन स्वल्प असंच आहे, तर शिल्पशास्त्र अन् नीतिशास्त्रांमध्ये दुर्गाच्या नाना प्रकारांवर व त्यांच्या उपयोगांवर जास्त चर्चा केलेली आपल्याला आढळते. ही कसर अमात्यांच्या ‘आज्ञापत्रा’तील सूत्ररूपी विवेचनाने भरून काढली आहे असं अगदी छातीठोकपणे म्हणता येतं.

शिवछत्रपतींनी जगाच्याही इतिहासात आगळी ठरावी अशी दुर्गकेंद्रित राज्यपद्धती निर्माण केली. दुर्ग- तोसुद्धा गिरिदुर्ग, हे एक सत्ताकेंद्र असं कल्पून त्यांनी त्यावर राज्याचा अवघड डोलारा उभारला. राज्यातला प्रत्येक दुर्ग आपल्या सभोवतालच्या भागावर मुलकी अन् लष्करी अशा दोन्ही सत्ता गाजवीत होता. पंचक्रोशीतले कज्जे, खटले, विवाद, न्यायनिवाडे, धारे, महसूल असे सारेसारेच या दुर्गाच्या अखत्यारित रुजू होते. तिथून जर निपटले नाही तर सुभ्याचा सुभेदार अन्यथा राजधानीची वाट साऱ्यांसच मोकळी होती. मात्र जिथे स्वत: राजाच दक्ष होता तिथे मग हाताखालची यंत्रणा सदैव सावध नसली तरच नवल. या नूतन राज्याच्या दृष्टीने याचा एक मोठा फायदा असा झाला की, राजा व प्रजा यांच्या मनी एकमेकांबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला. याची परिणती अशी झाली की, एखादा दुर्ग जरी शत्रूच्या ताब्यात गेला, तर तिथली प्रजा उठून राज्याच्या दुसऱ्या भागात जाऊ लागली, अन् तिथल्या भूभागाचा वा डोंगराचा तो दुर्ग नावाचा तुकडा तेवढा राज्यातून गेला अशी मानसिकता तयार झाली. हे चिलखतासारखे होते. एखाद्दुसरी कडी निखळली तरी राज्य अभंगच राहत होते. शिवकाळापूर्वी अशी रचनाच अस्तित्वात नव्हती. किंबहुना मध्ययुगात तशी मानसिकताच नव्हती. केवळ एक राजधानीचा दुर्ग- तोही बहुधा मदानीच असे- कोसळला की अवघे राज्यच लयाला गेले अशी अवस्था होती. कारण सारी सत्ताच मुळी एकाच दुर्गात एकवटलेली होती. ही अशी पंगू मानसिकता शिवछत्रपतींनी पार बदलून टाकली. उत्तम उदाहरण पुरंदरच्या तहाचं आहे. त्या तहात एक-दोन नव्हे, तर तेवीस दुर्ग शिवछत्रपतींना औरंगजेबास द्यावे लागले. मात्र त्यामुळे फरक काय पडला, तर महसूल कमी झाला. पण त्याचबरोबर त्या प्रदेशावर होणारा खर्चही कमी झालाच ना? मात्र महत्त्वाचं कलम जमा-खर्चाचं नव्हतंच मुळी. ते होतं तिथल्या प्रजेच्या शिवछत्रपतींप्रति असलेल्या अपरंपार निष्ठेचं. त्या प्रेमाच्या अन् निष्ठेच्या बळावर, योग्य वेळ येताच हे तेवीसही दुर्ग वर्षभरातच पुनश्च स्वराज्यात दाखल झाले. स्वराज्याची सत्ताकेंद्रं म्हणून पुनश्च अभिमानानं मिरवू लागले. राजांनी विचारपूर्वक राबवलेल्या दुर्गकेंद्रित राज्यपद्धतीचा हा विजय होता. याच पद्धतीमुळे औरंगजेबाच्या पंचवीस वर्षांच्या आक्रमणकाळात जरी दुर्ग ताब्यातून जात-येत होते, तरी त्यामुळे राज्याच्या अस्तित्वावर काहीच फरक पडत नव्हता. सारे राज्य निखळून पडत नव्हतं. छत्रपती रामराजा जिंजीला. सेनापती आज इकडे तर उद्या कुठे ते ठाऊक नाही अशी अवस्था. मात्र जे दुर्ग हाती होते त्या दुर्गाच्या आसऱ्याने हे राज्य पंचवीस वर्ष अक्षरश: निर्नायकी लढत होतं. तो दुराभिमानी पातशहा लढून थकून इथेच मेला, मात्र शिवछत्रपतींचं हे राज्य त्यांच्या या दुर्गाच्या आसऱ्यानं तावून सुलाखून, अपर आत्मविश्वासानं अन् ताठ मानेनं उभंच राहिलं होतं. पंतअमात्य म्हणतात त्याप्रमाणे, ‘..औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर, भागानगरासारखी महासंस्थाने आक्रमिली, संपूर्ण तीस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्याशी अतिशय केला, त्याचे यत्नास असाध्य ते काय होते? परंतु राज्यात किले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला..’ ज्या औरंगजेबाला व्यूहरचनेच्या अंगानं अन् ताराबाईसाहेब व शंकराजी नारायण यांच्या सोबतीनं पंचवीस वर्ष छातीवर झेललं त्या रामचंद्रपंत अमात्यांचे हे शब्द प्रचीतीचे आहेत, एवढं म्हटलं तरी पुरे!

कोश, सन्य, गुप्त युद्ध, फितुरांचं दमन, सन्याच्या बळाचा वापर, मदतीला येणाऱ्या सन्याचा स्वीकार व परचक्राचा प्रतिकार या गोष्टी दुर्गावर अवलंबून असतात. दुर्ग नसेल तर कोश शत्रूच्या ताब्यात जातो. ज्यांना दुर्गाचे संरक्षण आहे त्यांचा उच्छेद होत नाही असं दिसून येतं, असं कौटिल्याचं मत अर्थशास्त्रातसुद्धा नोंदलेलं आहे.

अशा या दुर्गाचं स्थळ निवडण्यापासून सुरुवात होई. दुर्ग बांधण्यासाठी जे स्थळ- अर्थात पर्वतशिखर- निवडलं जाई त्या पर्वतशिखराशेजारी दुसरा पर्वत जवळ नसेल हे कटाक्षानं पाहिलं जाई. जर असेल तर तो सुरुंग लावून तोडून काढला जाई. सुरुंगाच्या वापरास तो दुष्कर असला तर मग त्या पर्वतासही जोडदुर्गाचं रूप दिलं जाई. मात्र बहुतेक वेळा असा पर्वत मूळ दुर्गाच्या मुळावर येई. उत्तम उदाहरण आहे पुरंदर व वज्रगडाचं. मिर्झाराजा जयसिंगाच्या स्वारीच्या वेळी वज्रगड मुघलांनी पहिल्यांदा जिंकून घेतला अन् त्याच्यावरून मारा करत पुरंदर जेर केला. अशा प्रकारच्या जोडदुर्गाची असंख्य उदाहरणं महाराष्ट्रभर आहेत. पवनगड-पन्हाळगड, राजमाचीचे जोडकिल्ले, लोहगड-विसापूर, रवळ्या-जवळ्या, चंदन-वंदन, सिंधुदुर्ग-सर्जेकोट, खांदेरी-उंदेरी ही या प्रकारची काही उदाहरणे झाली. आसनगावजवळचा माहुली अन् तुंगभद्रेच्या खोऱ्यातला जिंजी हे दोन्ही दुर्ग तर तीन डोंगरांचे मिळून बनलेले आहेत. राजगड तर चक्क चार भागांचा मिळून बनलेला आहे. सभासदाने आपल्या बखरीत राजगडाचा तसा उल्लेखही केलेला आहे. मात्र अशा जोडदुर्गाची जागा कदापि मोकळी सोडली जात नसे. तिथे भक्कम दुर्ग बांधला जात असे. कारण शत्रुसन्यास अशी जागा साहाय्यकारी होऊन मुख्य दुर्गाचे स्वातंत्र्य धोक्यात येते अन् दुर्गाचे स्वातंत्र्य म्हणजे पर्यायाने राष्ट्राचेही स्वातंत्र्य. म्हणून मग ही खबरदारी घेणे ही अतिशय महत्त्वाची बाब असे. दुर्गाचा हा दोष टाळावा असे पंतअमात्यच म्हणतात!

दुर्गास एकच दरवाजा असणे हा दुर्गाचा सर्वात मोठा दोष मानला जाई. बहुधा देवगिरीचे उदाहरण तत्कालीन दुर्गस्थपतींच्या नजरेसमोर असावे. देवगिरी हा मध्ययुगातला एक अद्वितीय दुर्ग आहे. मध्ययुगीन दुर्गशास्त्राचा मुकुटमणी म्हणावा असाच हा गिरिदुर्ग आहे. मात्र एकुलता एक दरवाजा हा याचा सर्वात मोठा दोष ठरला. आणीबाणीच्या युद्धस्थितीसाठी उपयोगात येऊ शकेल असे, एकही अधिकचे द्वार या दुर्गाच्या बांधणीत रचलं गेलं नाही. अन् हीच या दुर्गाची मृत्युघंटा ठरली! असं कसं घडलं हे याबाबतीतलं कोडंच आहे. बहुधा इतका अभंग दुर्ग रचला. उभा कातळकडा तासून काढला, भुयारांची अभूतपूर्व अशी रचना केली, पाच तटबंद्यांचे कवच घातले. मग असे दुर्गशिल्प रचल्यावर आणखी दरवाजे काय उपयोगाचे असा दर्प त्या शिल्पींच्या मनी बहुधा उठला असावा अन् या महत्त्वाच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष झालं असावं. अर्थात हा माझा केवळ एक तर्क आहे. असे अनेक तर्क करता येतील. मात्र हे असं घडलं खरं. त्या काळातील कोणतीही राजधानी पाहिली तर एक-दोन नव्हे तर अनेक द्वारांनी ती युक्त असल्याचं आढळून येतं. केवळ देवगिरीसारख्या राजधानीच्या विख्यात अन् महत्त्वाच्या दुर्गातच ही उणीव कशी राहून गेली हे तो काळच जाणे! एक गोष्ट खरी की, या उणिवेनं दक्षिणेत मुसलमानांचं पाऊल रोवण्यात अतिशय महत्त्वाचा हातभार लावला. अल्लाऊद्दीन खिलजीनं केवळ हे द्वार रोखून ठेवलं अन् जणू नाक दाबल्यागत घुसमटलेल्या रामदेवराव यादवानं गुडघे टेकत शरणागती पत्करली. एकच वाट बंद झाल्यामुळे सन्य वा धान्य, अगदी कसलीच रसद त्याच्यापर्यंत पोहोचली नाही. खुंटायला मार्गच ठेवले नव्हते. श्वास घेणारं नाकही बंद होतं. राष्ट्रासाठी प्राण देण्याची धमकही उरली नव्हती, मग शेवट काय हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नव्हती. दोन-अडीचशे वर्ष जरबेनं वाढवलेलं यादव साम्राज्य खिलजीच्या एका तडाख्यात आठ-पंधरा दिवसांत भुईसपाट झालं! एका द्वाराने ही किमया घडवून आणली होती!

बहुधा याच कारणामुळे देवगिरीपूर्व काळात अन् उत्तरकाळातही दुर्गास एकापेक्षा अधिक दरवाजे प्रमाणभूत मानले गेले. मात्र चोरवाट ही बहुधा शिवकालीन खासियत ठरली. यामागचा विचार असा की, आक्रमण करणारं सन्यदळ जे काही दोन-तीन दरवाजे असतील त्यांवर एकवटणार, मग अशा निकरक्षणी तटांमध्ये लपवलेल्या चोरवाटा उपयोगास येतील. यांपैकी अगदी नेहमीच्या वापरास, सोयीसाठी हव्या तेवढय़ाच दिंडय़ा मोकळ्या ठेवून वरकड दिंडय़ा चिणून टाकीत. चिणून म्हणजे दगड एकमेकांवर ठेवून केलेलं कच्चं बांधकाम. म्हणजे वेळ आली की नुसते दगड ढकलून देताक्षणीच वाट मोकळी होत असे. या वाटा गडावर गुपचूपपणे रसद वा कुमक पोहोचवण्याच्या दृष्टीनंही उपयोगी पडत असत. आधारासाठी हातात धरलेली काठी तिसरा पाय म्हणून उपयोगी पडावी तसाच उपयोग या चोरवाटांचा होई. सर्वात आदर्श उदाहरण राजगडाचं ठरावं. स्वराज्याची ही पहिली राजधानी. अनेक वर्ष या दुर्गाचं बांधकाम सुरू होतं. शिवकालीन दुर्गशास्त्राचा प्रमाणभूत ठरणारा दुर्ग म्हणून या दुर्गाकडे सहजच बोट दाखविता येईल. तीन माच्यांची तीन, अधिक बालेकिल्ल्याचं एक अशी चार महाद्वारं अन् दहा चोरिदडय़ा असं अपूर्व स्वरूप शिवछत्रपतींनी राजगडास बहाल केलं. शिवछत्रपतींचा मुक्काम या दुर्गावर जवळपास पंचवीस वर्षांपर्यंत होता. या कालावधीत यावर आक्रमण झाल्याची कुठंही नोंद नाही. अपवाद फक्त मिर्झाराजा जयसिंगाच्या स्वारीच्या वेळी झालेल्या, पायथ्याच्या गावांच्या जाळपोळींचा. अन्यथा या दुर्गाचा हरएक चिरा शिवछत्रपतींच्या हयातीत अनाक्रमितच राहिला.

रायगड ही शिवछत्रपतींची, स्वराज्याची अभिषिक्त राजधानी. चारही बाजूंनी नैसर्गिकरीत्या तासलेल्या सुमारे पंधराशे फूट उंचीच्या कळकळत्या कडय़ांचं संरक्षण यास लाभलेलं आहे. त्यामुळे महादरवाजा, वाघदरवाजा, भवानी टोक अन् हिरकणी टोक अशा मोजून चारच ठिकाणी मानवनिर्मित तटबंदी सापडते. अन्यथा दरुलघ्य अशा कडय़ांची तटबंदी लेवूनच हा दुर्ग सजला आहे. मात्र अशा क्षणीही महाद्वारापासूनच्या टकमकाच्या दिशेला, उत्तरेकडल्या तटबंदीत चोरिदडीची योजना करण्यास शिवछत्रपती अन् त्यांचे शिल्पशास्त्री विसरलेले नाहीत!

दरवाजांच्या बांधकामाच्या बाबतीतही काही ठोस प्रमाणं शिवकाळातील दुर्गामध्ये अवलंबिलेली दिसतात. या काळातील दुर्ग म्हणजे एक तर गिरिदुर्ग वा जलदुर्ग. मात्र डोंगर चढून दुर्गाच्या वाटेला लागलं की, दुर्गाचा दरवाजा शोधून काढणं कठीण होतं. थेट दरवाजा कुठूनच दिसत नाही. अगदी तीच गत जलदुर्गाचीही आहे. दिसतात केवळ बुरूज अन् बुरुजांच्या सावलीत दाखल झाल्यावरच दिसतो- बहुधा उजव्या हाताच्या बांधणीचा, उजवीकडल्या बाजूस दोन बुरुजांच्या कुशीत लपलेला दरवाजा.

रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रात म्हणतात : ‘दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येता-जाता मार्ग बुरजाचे आहारी पाडोन, दरवाजे बांधावे. किल्यास येक दरवाजा हा ऐब (ऐब किंवा आईब म्हणजे दोष) थोरलाच आहे. याकरिता गड पाहून येक, दोन, तीन दरवाजे, तशाच चोरिदडय़ा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशास राबत्यास पाहिजेत तेवढय़ा ठेवून वरकड दरवाजे व दिंडय़ा चिणून टाकाव्या.’ शिवकालात रचल्या गलेल्या दुर्गामध्ये ही कल्पना पूर्णपणे अमलात आणलेली दिसते. राजगड, रायगड, प्रचंडगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग ही यांपैकी शिवछत्रपतींनी स्वत: रचलेल्या दुर्गाची काही उदाहरणे इथे नमूद करता येतील. या दुर्गाच्या द्वाररचना आज्ञापत्राच्या व्याख्येत अगदी चपखलपणे बसतात.

या सर्वाची तुलना करताना एक गोष्ट जाणवते, की प्रचंड आकाराच्या दुहेरी वा तिहेरी द्वाररचना, दोन द्वारांच्या मध्ये मोकळा चौक, त्याभोवती पहारेकऱ्यांच्या देवडय़ा, वरच्या अंगाला तटबंदीतून जंग्यांची रचना अशा रीतीने केलेली की, नजरेखालचा चौक माऱ्याच्या टप्प्यात यावा, भलेभक्कम अवाढव्य बुरुज, मोठी करोल तटबंदी, हे सारे अगदी यथायोग्य. अगदी जसे हवे तसे. द्वाररचनेचे आणिक एक वैशिष्टय़ या दुर्गामध्ये- प्रामुख्याने बहमनी व उत्तरकालीन भूदुर्गामध्ये- आढळते; ते हे की, यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, ते दार झाकण्यासाठी एक िभत वा तटबंदीची रचना केलेली दिसते. यामुळे द्वारावर थेट आक्रमण करणे कठीण झाले. ही गोष्ट जरी मानली तरीसुद्धा या पद्धतीचा एक मोठा दोष होता, तो म्हणजे जर हा तटबंदीचा भाग आक्रमकांच्या ताब्यात गेला तर ते दरवाजा जिंकण्याच्या फंदात न पडता थेट दुर्गात प्रवेश करू शकत. हा दोष मध्ययुगातील बहुतांश भूदुर्गाच्या बाबतीत आढळतो. कल्याणी, नळदुर्ग, पिरडा, विजापूर, नगर या साऱ्याच विख्यात मध्ययुगीन दुर्गाच्या द्वारांची बांधणी याच पद्धतीनं केलेली आढळते.

ही चूक शिवछत्रपतींनी सुधारून घेतली. तटबंदीला हे वाकडे शेपूट जोडण्यापेक्षा त्यांनी तो मार्गच वक्राकार करून द्वारांची रचना बुरुजांच्या कुशीत केली अन् जुन्या स्थपतींनी केलेली चूक वा रचनादोष त्यांनी नष्ट केला. हे या शिवकालीन दुर्गाचे एक आगळे असे वैशिष्टय़ ठरलं. द्वाररचनेचं हे शास्त्र उत्तरकाळात याहूनही परिपूर्णतेकडे झुकलं. याचं उत्तम असं उदाहरण म्हणजे, पवनमावळातला पवनेच्या अन् इंद्रायणीच्या बेचक्यातला लोहगड नावाचा दुर्ग. या दुर्गाच्या द्वाररचनेसारखी द्वाररचना महाराष्ट्रातील इतर कोणत्याही दुर्गावर आढळून येत नाही. हे अद्वितीय बांधकाम पेशवाईच्या काळात मुत्सद्दी नाना फडणीसांच्या खास देखरेखीखाली झालेलं आहे. येथल्या पहिल्या दरवाजात आणि गडावरल्या बांधीव तळ्याच्या भिंतीवर नाना फडणीसांचे नाव असलेला शिलालेखही आहे. दुर्गरचनेचं शास्त्र मराठेशाहीच्या उत्तरकाळातही तग धरून होतं. किंबहुना, नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याइतपत सक्षम होतं, हे शिवछत्रपतींच्या वारशास साजेसंच म्हणावयास हवं!

दुर्गावर येणारे मार्ग सोपे नसावेत याविषयी शिवकाळात कटाक्षानं काळजी घेतली जाई. याविषयी राज्यकर्त्यांनं जागरूक असायला हवं अशी अपेक्षा होती. याविषयीची विचारधारा अगदी स्पष्ट होती. ज्या परिस्थितीत शिवछत्रपतींनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवली, तो काळ अशा कोणत्याही प्रकारच्या हालचालींसाठी अतिशय प्रतिकूल होता. शस्त्रबळ नव्हतं. मनुष्यबळ नव्हतं. आर्थिक बळाची तर वानवाच होती. त्यामुळे जे आहे ते, जे मिळवलंय ते, हरप्रयत्ने राखायची वृत्ती बळावली होती. दुर्ग हे या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. बऱ्याच श्रमांनंतर अन् मनुष्यहानीनंतर पदरात पडलेला दुर्ग जर कुण्याही कारणामुळे हातातून गेला तर महसुलाची ती तेवढी जागा अन् अखत्यारित असलेला तो भौगोलिक प्रदेश राज्यातून कायमचा गेला अशी धारणा होती. त्यामुळे ताब्यात असलेलं स्थळ जिवेप्राणे राखलं जाई. त्यासाठीच्या अनेक उपाययोजनांपैकी गडावर येणारे मार्ग दुष्कर असावे असं एक मार्गदर्शक तत्त्व होतं. ते सोपे असतील तर ते मोडून कठीण केले जात. त्यांवरची झाडी जोपासली जाई. वाढवली जाई. झाडी नसली तर ती मुद्दाम लावली जाई. दुर्गापाशी येणं परक्या अन् अनोळखी आक्रमकांस जेवढं कठीण करता येतील तेवढं करता यावं असा यामागचा हेतू होता. एक तर हे सारे गिरिदुर्ग होते. तोफांसारखी जडशीळ शस्त्रसामग्री घेऊन तो एवढा भला थोरला पर्वत चढायचा, त्यात वरून दगडधोंडय़ांचा, बाणाबंदुकींचा वर्षांव होत असलेला अन् त्यात भरीस भर म्हणून अतिशय अवघड असे मार्ग, मग आक्रमकांची अवस्था दयनीय न झाली तरच नवल. मात्र दुर्ग राखणारी जी माणसे, ती सारी इथलीच. हे पर्वत त्यांस घरअंगणासारखे. मग हे मार्ग सोपे काय अन् कठीण काय, त्यांच्या लेखी काहीच फरक पडत नसे. त्यांच्या मुक्त हालचालींवर कसलेच निर्बंध पडत नसत. याशिवाय चोरवाटासुद्धा असत. त्या नेहमीच्या वापरात नसत. मात्र अधूनमधून रहदारी ठेवून त्या वापरण्याजोग्या राखत असत. अन्यथा आग लागल्यावर विहीर खोदायला निघाला असे व्हायला नको असा त्यामागचा उद्देश होता. आणीबाणीच्या क्षणी होऊ शकणारी धावपळ टाळावी हा यामागचा उद्देश होता.

दुर्गाच्या पायथ्याशी, परिसरात अन् अंगाखांद्यावर असलेली अरण्यं नीट निरातीनं, आस्थापूर्वक जोपासली जात. ही अरण्यं म्हणजे दुर्गाच्या संरक्षणासाठी असलेलं जणू चिलखतच अशी धारणा होती. म्हणून ही रानं अगदी प्रयत्नपूर्वक जोपासावी, त्यांतली झाडी हरप्रयत्ने राखावी अन् वाढवावी, या रानातली एक काठीही कुणास तोडू देऊ नये अशी सक्त आज्ञा होती. या अरण्यांमध्ये पहाऱ्याच्या चौक्या असत. तीरकमानी चालवणारे, गोफणगुंडे फिरवणारे वा बंदूकधारी हशम या चौक्यांमध्ये वास्तव्यास असत. गडाच्या संपूर्ण घेऱ्यात ही हशमांची गस्त अहोरात्र सुरू असे. दुर्गावर अन् खालच्या रानात ही गस्तीची व्यवस्था असे. अगदी पावसाळ्यातदेखील यामध्ये खंड नसे. पेशवेकाळातील रायगडावरच्या काही धाऱ्यांची – नियमांची – वर्णने आहेत. यांत पहारेकऱ्यांस पावसाळ्यातील रात्रीच्या गस्तीसाठी घोंगडय़ा व चुडी दिल्या, त्यांचेही हिशोब मांडलेले आहेत. या रानास ‘कलारग्याची झाडी’ असेही म्हणत. बचावाची पहिली फळी या दृष्टीने ही अरण्यं व त्यातील सन्याचा उपयोग दुर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशयच महत्त्वाचा होता. प्रथमग्रासे मक्षिकापात: असं म्हणणं भाग पडलेल्या आक्रमकांच्या मानसिक खच्चीकरणाची ही पहिली पायरी म्हणायला काहीच हरकत नाही.

गिरिदुर्गाकडे येणारे हे मार्ग या अरण्यांमधूनच येत. हे मार्ग म्हणजे जणू त्या दुर्गाच्या नाडय़ाच. ही अरण्यं राखली नाहीत तर दुर्ग निष्प्राण व्हायला वेळ लागणार नाही याबाबत दुमत नव्हतं. दुर्गाच्या घेऱ्यात कुठंही इमारतीचं घर वा दगडांचं कुंपण घालायला बंदी होती. याचा उपयोग शत्रूसन्यास आडोसा म्हणून होऊ शकेल असाही कदाचित यामागचा विचार असावा. गडाच्या घेऱ्यात तटबंदी असलेला वाडा वा गढी कुणीही बांधू नये अशा सक्त आज्ञा होत्या. ज्यांनी हे ऐकलं नाही त्या देशमुख, देशपांडे, पाटलांच्या गढय़ा शिवछत्रपतींनी जमीनदोस्त केल्याचे उल्लेख आहेत.

प्रवेशद्वार म्हणजे दुर्गाच्या अंतरात शिरायची जागा. तिथे येरागबाळ्याला प्रवेश नाहीच. त्यामुळे ते कसोशीनं राखलं गेलं. त्यात नवनवीन प्रयोग केले गेले. ते देखणे कसे दिसेल यावरही विचार केला गेला. महाराष्ट्रापुरता विचार केला तर मुसलमानी अमलात येऊ पाहणाऱ्या आक्रमकांना थेट छातीवर घेणारी, महाकाय बुरुजांच्या मुठीत असणारी, भव्य-दिव्य दिसणारी महाद्वारे, त्याला खेटून असणारे नक्षीदार सज्जे, कमळपाकळ्यांच्या आकाराचे पत्थर माथ्यावर मिरवीत असलेली तटबंदी आदींचा या देशी प्रवेश झाला. तोपावेतो या देशींचे दुर्ग सह्याद्रीच्या उन्नत मस्तकांवर आपला ठाव मांडून होते. बा अलंकरण कमी मात्र अंतरंग वज्राचे असावे तसे रूप घेतलेल्या या गिरिदुर्गानी ये देशीची संस्कृती जितीजागती ठेवली. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव अशा भीमपराक्रमी घराण्यांनी दुर्गशास्त्राचा वारसा जिवंत ठेवला. मात्र, शिवछत्रपतींच्या राज्यकाळात ही परंपरा न भूतो न भविष्यति फळीफुली वोळून आली. देशाचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरली!