हे घर म्हणजे सुंदर वास्तुरचना आहे असे वाटते. पूर्वी या घराच्या सर्व िभती मातीच्या होत्या. आणि सर्व आतील खोल्या शेणाने सारवल्या जायच्या, पण आता सर्व िभती चिऱ्याच्या म्हणजेच दगडाच्या आहेत.
मालवणमधील कातवड नावाच्या छोटय़ाशा गावात असलेले हे आमचे घर माझ्या पणजोबांनी म्हणजेच रघुनाथ सामंत यांनी जवळजवळ ८० वर्षांपूर्वी बांधले आहे. या घराचा नंबर १ आहे. या घरात सुरुवातीला माझे पणजोबा, पणजी, आजोबा, आजी, माझे सर्व काका, आत्या वगरे राहत होत्या. पण आता फक्त आमचेच कुटुंब राहते. म्हणजेच माझे आई बाबा, भाऊ आणि त्याची बायको राहतात. बाकीचे काका, आत्या वगरे येऊन-जाऊन असतात. आम्हा भावंडांचे पदवीपर्यंतचे (B.Com.)  शिक्षण या घरातच झाले.  पदवीधर झाल्यानंतर मी नवी मुंबईला माझ्या मामाकडे उच्च शिक्षण घेण्यासाठी आलो.
या आमच्या घरात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. या घरात पहिल्यापासून गावातील माणसांची ये-जा आहे, ती अजूनपर्यंत आहे. या घराला गावात एक वेगळाच आब आहे. या घराकडे सर्व गाव आदराने पाहते. हे घर संपूर्ण कौलारू आहे. या घराला एक मुख्य खोली, एक स्वयंपाकघर, आणि चार खोल्या आहेत. तसेच दोन पडव्या व प्रवेशद्वारापाशी एक मोठी एल आकाराची खोली आहे. त्याला आम्ही पुढची खोली म्हणतो. हे घर डोंगरा (छोटीशी दरी)  मध्ये, सपाटीपासून थोडे खाली आहे. त्यामुळे वरून (म्हणजे घाटीवरून) संपूर्ण आजूबाजूच्या हिरवळीमध्ये या घराचे दृश्य खूप छान दिसते.
 आतमध्ये पोटमाळा असलेले हे घर भव्य आहे. साधारणत: या घरात २० ते २५ माणसे राहू शकतात. घरात प्रवेशद्वारापाशी एक खोली आहे, ही खोली देवखोली म्हणून बांधली असावी, पण त्याचा उपयोग देवखोली म्हणून आजपर्यंत केला गेला नाही. आमच्या घरातील देव स्वयंपाकघरात ठेवले आहेत आणि त्याची पूजा तिथेच होते.
या घरात वर्षांतील सर्व मुख्य उत्सव अगदी मोठय़ा भक्तिभावाने साजरे केले जातात. आणि मुख्यत्वेकरून गणेशोत्सव खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो. घराच्या मुख्य खोलीत जिला आम्ही मालवणीमध्ये वांछी म्हणतो, त्या खोलीत गणपतीची आरास करून पूजा केली जाते.
गणपतीची पूजा अगदी पारंपरिक पद्धतीने केली जाते. एका मोठय़ा टेबलावर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून त्याच्या वर लाकडाची मांडवी अगदी नसíगक पानाफुलांनी सजवली जाते. मांडवीला सर्व बाजूंनी तोरणांची सजावट लावून सजावट केली जाते. कधी पाच दिवस तर कधी सात, तर कधी कधी अकरा दिवस गणपती आमच्या या घरात राहतो.
हे घर म्हणजे सुंदर वास्तुरचना आहे असे वाटते. पूर्वी या घराच्या सर्व िभती मातीच्या होत्या. आणि सर्व आतील खोल्या शेणाने सारवल्या जायच्या, पण आता सर्व िभती चिऱ्याच्या म्हणजेच दगडाच्या आहेत. तसेच दोन-चार खोल्यांना मार्बलची  लादीही बसवलेली आहे, पण अजूनही बाकीच्या खोल्या तसेच या घराला असलेले मोठे अंगण शेणानेच सारवले जाते. या घरात जाण्यासाठी एका वाटेने गेल्यास घाटी (पायऱ्या) उतरून जावे लागते. तर दुसऱ्या बाजूच्या वाटेने गेल्यास घाटी चढून जावे लागते. पावसाळ्यात या घराच्या अंगणात पडवळ आणि काकडी अशा भाज्यांचे मांडव घातलेले दिसतील, पण दिवाळीनंतर मात्र घराचे अंगण स्वच्छ शेणाने सारवलेले दिसेल. तर असे हे माझ्या आठवणीतले सुंदर घर कायम माझ्या मनात कोरले गेले आहे.