सुचित्रा साठे

सहवासाने, वारंवार भेटीने तिचं योग्यवेळी खाद्यसंस्कृतीशी सख्य जुळून आलं. काही पदार्थ अगदी गळय़ातच पडले. काहींनी ओळख वाढविण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न केला आणि तिच्याही नकळत ते तिच्या घरात शिरले. तिच्या घरातील जेवणाच्या पानाचे कायमस्वरुपी सदस्य बनून गेले. तिच्या घराची ‘चव’ बदलत गेली.

wardha lok sabha constituency, sharad pawar ncp , tutari symbol, different identity, different name, vidarbha, find new solution, avoid confusion, amar kale, wardha news, wardha ncp, lok sabha 2024,
तुतारी टोचाची की फुकाची? मतदारांना पडलेला प्रश्न अन् त्यावर शोधले मग ‘हे’ उत्तर
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…

‘घर’ म्हटलं की त्याचा स्वत:चा असा ‘स्व-भाव’ असतो, रंगरूप असतं. चेहरा-मोहरा असतो, राहणीमान असतं आणि खास ‘चव’ही असते. त्यातील पदार्थाचे ‘मेनूकार्ड’ असते. पदार्थातील घटक, त्यांचं कमी-जास्त प्रमाण, आवडीनिवडी, आजूबाजूचे पर्यावरण आणि तो करणारी व्यक्ती यावर ती ‘चव’ अवलंबूनअसते. एखाद्या घरातील पदार्थाचा रंग लालतिखटाच्या प्राधान्यामुळे लालभडक रंगाकडे झुकतो, तर एखाद्या घरात हिरव्या मिरचीचा वरचष्मा. काही ठिकाणी लाल मिरची असो वा हिरवी मिरची असो, ती शोभेसाठीच! काहींचे साखर किंवा गूळ याच्याशी अति सख्य. काही जण गोड पदार्थ मिष्ट गोड करणार तर तिखट पदार्थांत गोडाची ढवळाढवळ निषिद्ध मानणार. आईच्या हाताखाली शिकून तयार झालेल्या लेकीने किंवा सूनेने तोच पदार्थ केला तरी त्याचा तोंडवळा वेगळाच होतो. एकाच घरात ही पिरिस्थती, मग घराच्या उंबरठय़ाबाहेर पाऊल टाकलं किंवा राज्याची सीमा ओलांडली गेली तर त्या घराच्या अंतरंगात आमूलाग्र बदल झालेला दिसणारच ना!

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात कशाला.. अशाच एका अनुभवाचं साक्षीदार झालो तर.. झालं काय तर एका महाराष्ट्रीय तरुणीचं पदवीधर होताच लग्न ठरलं. गावातच सासर मिळालं म्हणून तिचे जन्मदाते खूश झाले. परिचयाचे धागे विणले. त्यांच्याकडे जात असताना लक्षात आलं की सासरची पाळंमुळं बडोद्यात रुजली आहेत. ‘आमच्या बडोद्यात’ हा राग सतत आळवला जातोय. लग्नासाठी सगळं वऱ्हाड फक्त बडोद्याहूनच आलं. लग्नाचं सूप वाजल्यावर आलेल्या प्रत्येक पाहुण्याने ‘आवजो’ म्हणून तिला बडोदाभेटीचं निमंत्रण दिलं. नव्याची नवलाई होतीच. कधी कारणाने तर कधी कारणाशिवाय पंढरपूर वारीसारखी तिची बडोदावारी सुरू झाली. जास्त करून बंगलेवजा घरं, मातीचा गुण म्हणून असेल गुजराती छापाची चेहऱ्याची ठेवण असलेले नातेवाईक, मराठी भाषेचा बदललेला लहेजा.. याच्या जोडीला वेगळय़ा चवीच्या खाद्यसंस्कृतीला तिला सामोरं जावं लागलं.

पहिल्याच भेटीत ‘पोळय़ा खुटल्या’ या शब्दप्रयोगाने गोंधळलेली, भांबावलेली तिच्यातील नवी नवरी पोळय़ा करण्यासाठी पुढे सरसावली. पण ‘फुलके करशील का?’ म्हटल्यावर तिच्यावर मूग गिळून बसायची पाळी आली. तिने पाहिलं की जवळजवळ प्रत्येक घरातील पोलपाटाचा आकार लहान, पण त्याचे पाय उंच आणि लाटणं अगदी निमुळतं, नाजूक. फुलके करण्यात सरावलेल्या हातांकडे ती कौतुकाने बघतच राहिली. पोळीपेक्षा लहान गोळा असूनही पापडासारखा गोल गोल लाटत अगदी कंपॉसने काढलेल्या वर्तुळासारखा तो गोल होत होता. मग झटक्यात तव्यावर टाकला जायचा. फार डागाळायच्या आधीच परतला जायचा. छान गुलाबी मण्यांची नक्षी उमटली की झटक्यात तवा गॅसवरून उतरवून फुलका गॅसवर तेल तूप लावून घेत डब्यात जाऊन बसायचा. बघता बघता फुलक्यांची चळत तयार व्हायची. फुलकाकर्तीची ही हातचलाखी बघून तिच्या घडीच्या पोळीची ‘घडी’ विस्कटलीच गेली नाही. फुलकाक्लास मात्र चालू झाला.

जेवणातल्या या मेनकोर्सच्या ओळखी पाठोपाठ बारशाला ‘गाकर’ करण्याचा मंडळींचा बेत शिजला. तिला हे नावही अनोळखी होतं. कणकेत थोडा बारीक रवा व तेलाचे मोहन घालून भिजवून ठेवण्यात आलं. थोडय़ावेळाने त्याचे जरा जाडसर आणि आकाराने छोटे पुरीसारखे फुलके केले गेले. गोडय़ा वरणात मीठ, तूप घालून त्याच्याबरोबर गाकर खाण्याच्या बेतावर सगळे लट्टू झालेले ‘याचि देही याचि डोळा’ ती बघतच राहिली. जेवताना आमटीचं ‘खाटी डाळ’ हे नामकरण ऐकून तिला कसंसच वाटलं. या आमटीच्या जागी कधी ‘ओसामण’ हजर व्हायचं. हिंग, जिरं, ओवा, कढीलिंब घालून केलेल्या तुपाच्या फोडणीत मुळय़ाचे उभे तुकडे घालायचे. साधं वरण घोटून आमसूल, आलं घालायचं. वरण कमी व पाणी जास्त, असं हे पाणीदार ओसामण तिलाही चविष्ट वाटलं.

कोकणातील ओलं खोबरं बडोद्यात पोहोचेपर्यंत जणू सुकं होत असावं. त्यामुळे ओल्या खोबऱ्याऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर स्विकारताना तिला थोडं जड गेलं. भिजलेली चण्याची डाळ तळून कुरकुरीत करून त्यात भाजलेलं सुकं खोबरं, तीळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून केलेली ‘चिवडाचटणी’ पानातील डावी बाजू चुरचुरीत करत सगळय़ांच्या कौतुकात न्हावून निघायची. ती आश्चर्याने बघतच राहायची. लग्नकार्यात कवठाच्या चटणीचं इतकं अप्रूप तिने पहिल्यांदाच अनुभवलं. मीठ, तिखट, जिरं, गूळ घालून वाटलेल्या आंबटगोड चटणीवर सर्वजण तुटून पडत होते. बाठीसकट कापून घेतलेल्या मोठय़ा फोडींच्या लोणच्याच्या बरण्या नाहीत, असं घर सापडलं नाही. याची पानांत लक्षणीय उपस्थिती असायचीच. त्याच्या जोडीला भोकराचं लोणचंही आब राखून असायचं. खरं तर भोकराचं लोणचं घालण्याची प्रक्रिया तशी थोडी किचकटच. भोकरांना चीर देऊन आतही बुळबुळीत बी काढून टाकायची. ते करतांना हाताची बोटं अतिशय चिकट होतात म्हणे. मग त्या भोकरांना मीठ लावून त्यात लोणच्याचा मसाला, कैरी गूळ आणि फोडणी किंवा नुसतं तेल गरम करून घालायचं. परंतु अशा चिकट कामाला चिकटून ते करण्यातही अहमहमिका दिसायची. कैरीच्या किसात मीठ, तिखट, जिरेपूड घालून ऊन खाऊन तयार झालेला छुंदा कानामागून येऊन तिखट, नव्हे गोड व्हायचा. पहिल्या बोटाने चाटत, मिटक्या मारत त्याच्या उपस्थितीला नेहमी वन्समोअर मिळायचा. ती ही त्यात हळूच सहभागी झाली.

सगळय़ा घरांतून आदरातिथ्य करून घेतांना ती ‘डावीकडे’ झुकली होती. आणि अचानक फरसाण या व्यापक शब्दाशी ती अडखळली. वेगवेगळृया जाडीची, रंगाची शेव, तळलेल्या डाळी, दाणे, बुंदी, अळणी पापडी, गाठी यांचं मिश्रण म्हणजे फरसाण जे फक्त बाजारातूनच आणायचं असतं, घरी करायचं नसतं असं समीकरण तिच्या मराठी मनात फिट बसलेलं होतं. पण बडोद्याच्या वास्तव्यात फरसाण शब्दाचं वेगळं रूप पानात पडलं. फरसाण या एकाच कुटुंबात अनेक सदस्य होते. तेलाशी भावपूर्ण मैत्री असलेले त्यातलं ‘दंडगेलं’ केलं की लहान-थोर सगळेच आपला हात जगन्नाथ म्हणत ताव मारतात, याचं प्रात्यक्षिकच तिला बघायला मिळालं. तांदुळाच्या निम्मी तुरीची डाळ, त्याच्या निम्मी चण्याची डाळ असं भिजत टाकून, वाटून दही, आलं, लसूण, मिरच्या तेलाचे मोहन घालून एकत्र करायचं. आठ-दहा तासांनी फुगलेलं मिश्रण जाड बुडाच्या पातेल्यात फोडणीचा टाकायचं. फोडणीत तीळ, ओवा घालायचं. मिश्रण न हलवता वरती झाकण ठेवायचं. (कोळसे वगैरे ठेवले तर फारच छान म्हणे) फुगून आलेल्या खरपूस केकच्या वडय़ा कापायच्या आणि खातच सुटायचं. रसभरीत वर्णासह प्रत्येक घरातील वेगळय़ा चवीचं दडगेलं तिच्याही मनात भरलं. कधी रात्रीच्या जेवणात डाळढोकळी पान व्यापून टाकायची. गोडसर वरणात टाकलेली तिखट शंकरपाळी साजूक तुपाच्या धारेबरोबर अलगद घशाखाली सरकायची. ‘आमटीपोळीच की ही!’ असं म्हणत तिने चिडवायचा प्रयत्न केला पण तिची डाळ शिजली नाही. मटकीच्या पीठाचे पापड तळून डब्यात भरून ठेवले की ‘तोंडात टाकायला काहीतरी दे ना’ हा प्रश्न विचारण्यापुरतासुद्धा तोंडांना वेळ मिळत नाही. यावर सर्व मातांचे झालेले एकमत ऐकून तिला गंमत वाटली. चवीचवीने ती सतत ऐकत राहिली. मेथी चिरून त्यात वेगवेगळी पीठं, मीठ, तिखट, तेल घालून मुटकुळी वळायची आणि भरपूर फोडणी करून त्यावर टाकायची. झाकण ठेवून आसडून चांगली वाफ आणायची. मोहनरावांना झुकतं माप दिलं की मुटकुळी तोंडात विरघळलीच समजा सगळय़ा जणींचा तिच्याभोवती किचनकल्ला व्हायचा. गोटाभजी बाकरवडी, फुलवडी, खाकरा, ठेपले, लीलो चिवडो या फरसाण वस्तू संध्याकाळी फेरफटका मारून येताना खायच्या असतात. असा मोलाचा सल्लाही तिला मिळाला. साधं खमण, मसाला खमण या बडोद्याच्या खास प्रकाराला ढोकळा हा प्रतिशब्द होऊच शकत नाही. इतकं तिला ते लाजवाब वाटलं. कसंही केलं तरी बाहेरच्या सारखं घरी होतच नाही हा तिथल्या प्रत्येकीचा अनुभव तिला शहाणं, सजग करून गेला.

झटपट होणारा प्रकार म्हणून दुधपाकाशी तिची ओळख झाली. तांदळाचा रवा भाजून थोडय़ाशा आटवलेल्या दुधाला लावायचा. रवा शिजल्यावर साखर व किसमिसने सजवायचा. सण, लग्नसमारंभ असले की उदंड तुपाचे मोहन असलेल्या मोहनथाळशिवाय पान हलायचं नाही. रवाळ डाळीचे पीठ भरपूर साजूक तुपात खमंग भाजून खव्याबरोबर साखरेच्या पाकात मुरू द्यायचं. छान घनाकृती वडय़ा चारोळय़ाने नटवायच्या. हा श्रीमंत पदार्थ लाडवांनाही वरचाढ ठरतो आणि आग्रहाशिवाय पानात जागा पटकावतो हे मात्र तिच्या नजरेतून सुटलं नाही. बडोद्याचा पेढा व रवाळ मावाबर्फी याला मात्र तोड नाही. अगदी या सम हाच! ते खाण्याची संधी ती कधीच चुकवणार नव्हती.

उंधियो ही भोगीला करतो तशी मिश्रभाजी, तिला पक्वान्नाचा दर्जा बहाल केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यासाठी घरातल्या स्त्रीने घेतलेल्या कष्टाला आणि मेहनतीला तिने भरभरून धन्यवाद दिले. या ओळखपरेडमध्ये तिला प्रकर्षांने जाणवले की खवय्येगिरीला आव्हान देणारे अनेक पदार्थ समोर असले तरी लहान-थोर बडोदेकर एक दिलाने पसंती देतात ती खिचडीच्या बेताला. आधण पाण्यात तूरडाळ घालून मग तांदूळ घालायचे. मीठ हिंग हळदीने रंग भरायचे. सोबत लोणचं, पापड खिचडीवर वरून घ्यायला लसणीची फोडणी आणि गोडसर कढी किंवा कांदा बटाटा रस्सा. झोपेतही विचारलं तरी हा मेनू ऐकून पानावर हजर होतील आणि तृप्ततेची ढेकर देतील. ‘‘हा काय साधं वरण-भात तर आहे. आमची मराठमोळी मुगाच्या डाळीची खिचडी खाऊन तर बघा.’’ असा खालच्या पट्टीतला सूर तिने लावून पाहिला, पण तेव्हापासून अगदी आत्तापर्यंत तिला गप्पच बसावं लागलं. तिच्या बडोदा भेटीचा सिलसिला चालूच राहिला. सहवासाने, वारंवार भेटीने तिचं योग्यवेळी खाद्यसंस्कृतीशी सख्य जुळून आलं. काही पदार्थ अगदी गळय़ातच पडले. काहींनी ओळख वाढविण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न केला आणि तिच्याही नकळत ते तिच्या घरात शिरले. तिच्या घरातील जेवणाच्या पानाचे कायमस्वरुपी सदस्य बनून गेले. तिच्या घराची ‘चव’ बदलत गेली.