टिटवाळा हे गावच, पण पालिका हद्दीत असल्याने विविध नागरी सुविधा या भागालाही मिळत आहेत. त्यामुळे हळूहळू एक गाव आता मिशन सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे टिटवाळा. मुंबई-नाशिक आग्रा महामार्गापासून अवघ्या अध्र्या तासावर असलेले हे गाव वाढत्या नागरीकरणामुळे शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रेल्वे, वाहनाने मुंबईपासून एक ते दीड तासाच्या अंतरावर हे शहर असल्याने नागरिक टिटवाळा शहरात घरे घेण्यास अलीकडे सर्वाधिक पसंती देत आहेत. वाढती वस्ती आणि त्यामुळे वाढत्या नागरी सुधारणा टिटवाळा परिसरात होत आहेत. रस्ते, पाणी, वीज, रुग्णालय, शाळा या सुविधा जागीच उपलब्ध असल्याने आपले कायमचे बस्तान टिटवाळा असाच निश्चय करून या ठिकाणी घर घेण्यास पसंती देत आहेत. टिटवाळ्यात येऊन महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी धावणारा भाविक आता घरे घेण्यासाठीही या भागात धावताना दिसत आहे.
मुंबई परिसरातील नागरिकांनी कल्याण परिसरातील वस्ती वाढली आहे. त्यामुळे लोक टिटवाळा येथे घरे घेण्यास उत्सुक आहेत. येथे अनेक बांधकाम प्रकल्प विविध भागांत सुरू आहेत. सध्या वर्तमानपत्राच्या पान पान जाहिराती टिटवाळा भागातील बांधकाम प्रकल्पांच्या प्रसिद्ध होत आहेत.
कल्याण-डोंबिवली शहरे आता जमिनी, जागांच्या दृष्टीने भरून गेली आहेत. त्यामुळे मोकळा श्वास घेण्यासाठी आणि गुंतवणूक म्हणूनही नागरिक टिटवाळा परिसराचा विचार करीत आहेत.
टिटवाळा म्हटले की पहिली उभे राहते ती श्रीमहागणपतीची भव्य मूर्ती. तेथील ऐतिहासिक महत्त्व. संकष्टी, अंगारकी आणि विनायकीला भाविकांची उसळणारी गर्दी. श्री गणेश मंदिर संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा मंदिर परिसरात उपलब्ध करून दिल्या आहेत. दर्शनमंडप, सभा मंडप, बाजूला प्रशस्त तलाव, भोवती बसण्यासाठी उद्यान, मोकळी जागा मन प्रसन्न करते.
टिटवाळा हे गावच, पण पालिका हद्दीत असल्याने विविध नागरी सुविधा या भागालाही मिळत आहेत. त्यामुळे हळूहळू एक गाव आता मिशन सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रस्ते, वीज, पाणी आदी सुविधा पालिकेकडून देण्यात येत आहेत. पाच ते दहा हजार लोकवस्ती असणारे गाव आता पन्नास हजारांच्या पुढे कधी गेले हे ग्रामस्थांना कळलेले नाही. एवढी लोकवस्ती या भागात वाढत आहे.
नागरी, आरोग्य सुविधा मुबलक प्रमाणात येथे उपलब्ध आहेत. टिटवाळ्याच्या विकासात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे विकासाच्या प्रक्रियेत अग्रभागी असलेल्या संस्थांना आर्थिक सहकार्य देऊ केले जाते. त्यामुळे टिटवाळ्याचा चेहरा दिवसेंदिवस बदलत चालला आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नगर जिल्ह्य़ांच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गाव असल्याने त्याचे माहात्म्य आणि महत्त्व तितकेच आहे. वाढत्या लोकवस्तीचा, लोकांच्या राहणीमानाचा विचार करून येथे आरोग्यविषयक प्रकल्प होऊ घातले आहेत.
मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयातर्फे टिटवाळ्यात रुग्णालय प्रकल्प राबविण्याचे चालू आहे. यामुळे कोणत्याही मोठय़ा उपचारासाठी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. बाजूलाच सरकारी ग्रामीण रुग्णालय आहे. शिक्षणाच्या सुविधा येथे मुबलक आहेत. बाजूलाच खडवलीजवळ सैनिकी शाळा आहे. महाविद्यालये आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यामुळे शिक्षणाचीही गैरसोय होण्याची सुतराम शक्यता नाही. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई, ठाण्याकडील नागरिक आपली घुसमट थांबविण्यासाठी जागा शोधत शोधत टिटवाळ्यात येत आहेत. यामुळे मुंबईतील कुटुंबीय, नातेवाईक यांच्याही सतत संपर्कात राहता येते. कंटाळा आला तर मुंबईतही झटकन जाता येते. विशेष म्हणजे रोज श्री गणेशाच्या मंदिरात जाता आले नाही तरी दरवाजाच्या पायरीवरूनच कळसाचे दर्शन घेतले मनाला शांती मिळते. आपले निवृत्तीचे जीवन आनंदात व निसर्गरम्य परिसरात घालविण्यासाठी अनेक मंडळी टिटवाळा परिसरात घर घेत आहेत. मोकळ्या जागेचा परिसर म्हणून सध्या टिटवाळ्याचा उल्लेख केला जातो. या मोकळ्या जागेत सध्या अनेक नामांकित बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. पंधरा लाखांपासून पुढे रकमा असतील तर आरामात या प्रकल्पांमध्ये घर घेता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2014 रोजी प्रकाशित
टिटवाळा निसर्गरम्य शहर..
टिटवाळा हे गावच, पण पालिका हद्दीत असल्याने विविध नागरी सुविधा या भागालाही मिळत आहेत. त्यामुळे हळूहळू एक गाव आता मिशन सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे टिटवाळा. मुंबई-नाशिक आग्रा महामार्गापासून अवघ्या अध्र्या तासावर …

First published on: 31-05-2014 at 02:37 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titwala nature fantasy city