मोहन गद्रे

नाना तऱ्हेच्या नाना आकाराच्या नाना कारणांसाठी उपयुक्त अशा फणसांची मांदियाळी मागच्या पडवीत त्याच्या उग्र पण गोड वासासकट भरलेली असायची. पुढला जवळजवळ महिनाभर खास फणसासाठी ही जागा राखीव.

When will Pitru Paksha start in 2024
Pitru Paksha 2024 Date: २०२४ मध्ये कधी सुरू होईल पितृपक्ष? तिथीनुसार जाणून घ्या, १६ श्राद्धांच्या तारखा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Rahu Gochar 2024 Rahu's nakshatra transformation
भरपूर पैसा कमावणार; राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Gold Silver Price
Gold-Silver Price: सणासुदीच्या दिवसांत घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत वाढ, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत
Sun Transit 2024
Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्याच्या राशी परिवर्तनाने चमकणार’या’ तीन राशींचे नशीब, मिळेल बक्कळ पैसा
Surya nakshatra gochar 2024 From August 16 Sun enter in Magha Nakshatra
१६ ऑगस्टपासून नुसता पैसाच पैसा; सूर्याच्या मघा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या मान-सन्मात अन् संपत्तीत वाढ
Loksatta viva Raksha Bandhan 2024 Fashion rakhi various type Trends
परंपरेतून नावीन्य साधणारा धागा
rain, Mumbai, rain update mumbai,
मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता

कोकणातल्या घरअंगण, त्यात पुढचं अंगण, मागच अंगण,  मधे ओटी,  पडवी, त्यात पुढची पडवी, मागची पडवी,  माजघर, बाळंतीणीची खोली, स्वंयपाक घर अशा वेगवेगळ्या जागा असत, (अजुनही काही घरात आहेत) पण त्यातल्या काही जागा या तात्पुरत्या नावांनी ओळखल्या जात असत. आमच्या आजोळी, मागची पडवी मे महिन्यात फणसाची पडवी म्हणुन ओळखली जायची. कारण किती तरी फणस तेथे आणून ठेवले जायचे. आणि त्याचे फणस पुराण तेथेच पुढे काही दिवस  सुरू असायचे.

मे महिन्याच्या शेवटा शेवटाला कोकणात दिवसभर उकड हंडी होऊन संध्याकाळी पूर्वेला आकाशात काळे ढग गोळा होऊ लागतात. बघता बघता दिवसभर कुठे तोंड घेऊन गेलेला वारा एकदम अंगणात, कौलावर, मोठमोठय़ा झाडांच्या शेंडय़ावर दंगामस्ती करू लागतो. ‘आज पाऊस येऊन गेलाय ना, आता उकाडय़ाचं बघायला नको,’ असं म्हणत म्हणत कंदिलाच्या प्रकाशात रात्रीची जेवणे उरकू लागतात.

असे दोन-तीन दिवस लागोपाठ होऊन जाते आणि फणसाच्या झाडावर लगडलेले एक दोन चांगले जून फणस, मागल्या पडवीच्या आश्रयाला कोणी तरी आणून टाकतो. आणणारा, ‘फणस आता काढायला झालेत हो,’ म्हणून आजोबांना वर्दी देतो आणि  मग एक दिवस आजोबांचा एखाद्या गडय़ाला आदेश निघायचा. त्यापूर्वी आजोबा मुंबईहून कोण कोण कधी कधी यायचेत याची एकदा उजळणी करून घ्यायचे, आणि मग स्वत: गडय़ाबरोबर जाऊन, दोरीची काढणी लावून फणस आपल्या देखरेखीखाली काढून घ्यायचे. बघता बघता मागल्या पडवीत नाना तऱ्हेच्या, नाना चवीच्या फणसांचे जणू संमेलन भरायचे.

फारच मागास, म्हणजे मोसमात फार उशिराने पिकणाऱ्या फणसाचे एखाद दोन पारेसुद्धा खास भाजीसाठी आणले जायचे. कच्च्या फणस गऱ्यांच्या भाजीचे किती तरी वेगवेगळे प्रकार, अगदी कोवळ्या फणसाची कूस भाजी, त्यानंतर थोडे मोठे गरे ज्यात आठळ्या अजूनही कोवळेच आहेत अशा फणसाची भाजी, जून मोठे गरे त्यात आठळ्या, पण जूनच अशा फणसाची भाजी, नुसत्याच मोठय़ा किंचित पिकलेल्या कच्च्या गऱ्यांची भाजी,  मुंबईहून कोण कोण कधी कधी येणार आहेत, त्यात जावई माणसे कोण, येणाऱ्या मंडळीची फणस भाजीची म्हणजे फणसाचीच, पण कुठल्या प्रकारची भाजी ती आवड लक्षात ठेवून, त्या प्रमाणे फणसाची बेगमी करून ठेवली जायची.

पिकलेल्या फणसाचा वेगळा विभाग, त्यात अगडबंब देहाचे, अर्थातच बरके फणस एकदोन दिवसात पिकतील असे, खास सांदणे आणि साठे घालण्यासाठी वापरायचे, काही मध्यम आकाराचे साधारण आठवडाभराच्या आत पिकतील असे, बरके आणि कापे खाण्यासाठी. काही तळलेले गरे करण्यासाठी, काही गऱ्यांचे उपवासाचे पीठ करण्यासाठी गरे काढून ते सणसणीत उन्हात अंगणात सुकत टाकण्यासाठी. काही कापे पिकलेले गरे वाळवून त्याची फणस क्यान्डी (हे नाव नुकते नुकते मिळालेले) करण्यासाठी.

अशा या नाना तऱ्हेच्या नाना आकाराच्या नाना कारणांसाठी उपयुक्त अशा फणसांची मांदियाळी मागच्या पडवीत त्याच्या उग्र पण गोड वासासकट भरलेली असायची. पुढला जवळजवळ महिनाभर खास फणसासाठी ही जागा राखीव.

आम्ही पाच-सहा नातवंडे मुंबईतून आमच्या आयांसह आठ-दहा दिवसांपूर्वीच आजोळी दाखल झालेलो असायचो. सर्व मुले पास होऊन वरच्या वर्गात गेली हे वर्तमान कळविणारे पोस्ट कार्ड येऊनसुद्धा आठवडाभर उलटून गेलेला असायचा. कच्च्या आंब्याचे पन्हे, राताम्बीचे कोकम सरबत, आठ दहा रायवळ आंबे, फणसाची भाजी, कधी गावठी लाल चणे घालून, कधी शेंगदाणे घालून, कधी पावटे घालून अशी चार-पाच वेळा आतापर्यंत खाऊन-पिऊन झालेले असायचे. आणि आता खरी कोकणातल्या आंबे-फणसाची चंगळ यापुढे सुरू व्हायची. कारण कलमावर, रायवळ आंब्यावर, आणि फणसांच्या झाडावर आंबे- फणस पिकू लागलेले असायचे. त्याचा संमिश्र वास आणि त्याच बरोबर केमरी पिंगा घालू लागलेली असायची. कावळे चोची मारू लागलेले असायचे.

आजीने सकाळी ‘न्याहारीला चला रे,’ अशी हाक दिली की, न्याहारी म्हणजे गुरगुटय़ा भात, किंवा मऊ भात किंवा काही ठिकाणी त्याला आटवल पण म्हणत म्हणजे, घरगुती अप्रतिम चवीच्या तांदळाचा मऊ भात, मीठ मेतकूट, आणि बरोबर मुरलेल्या लिंबाच्या लोणच्याची फोड, नुकतेच उडदाचे पापड घालून झालेले असतील तर मग त्याचे ताकातले डांगर, किंवा ताजा उडदाचा पापड. अशी रोजची सकाळची न्याहारी हे जवळजवळ ठरून गेलेले, लहान मुलांनी कोंडाळं करून बसायचे, कोणीतरी बडबड करत असायचे, मग आजोबांचा आवाज यायचा, गप्पागोष्टी नकोत पटापट उरका, मग खाली मान घालून गरम गरम, भुर्के मारत पटापट तो भात जेवायचा, चड्डीला हात पुसायचे  आणि अंगणात धाव घ्यायची. पण मामा किेवा आजोबा सकाळी न्याहारीला हाक मारत तेव्हा आम्ही सर्व समजून जात असू आजच्या न्याहारीला रसाळ फणसाचे गरे असणार. सर्वानी चला मागल्या पडवीत अशी आजोबांनी किंवा मामांनी हाक मारली, की आम्ही सर्व मागील पडवीत जाऊन बसायचो. आमचे आजोबा म्हणायचे, ‘‘आज हिरण्यकश्यपुचा वध आहे रे बाबांनो, लवकर चला.’’ आम्हाला या पाठीमागची गंमत माहीत झाली होती. मामा किंवा आजोबा, दोन्ही हाताला खोबरेल तेल चोळत चोळत, मागच्या पडवीत हजर व्हायचे, उकिडवे बसून, फणसाच्या राशीतला, चांगला पिकलेला फणस कोणता आहे हे त्यावर टिचक्या मारून पाहायचे आणि त्याला समोर ओढायचे. त्याला समोर अडवा ठेवून, मधोमध कोयतीच्या टोकांनी चारी बाजूने चीर मारून घ्यायचे आणि म्हणायचे, ‘आता बघा नाटक हिरण्यकश्यपुचा वध,’ असं म्हणून आपले दोन्ही हाताचे तेल लावलेले पंजे, त्यात खुपसून टराटरा फणसाचे पोट फाडल्याचा अभिनय करायचे. आम्ही मुले थक्क होऊन तो सर्व प्रकार पाहत राहायचो. आमच्या समोर केळीच्या पानाचा एकेक फालका ठेवलेला असायचा. आणि पटापट आमच्या पानावर पिवळे जर्द, रसाळ गरे पडू लागायचे. मधेच कोणाचीतरी आई सांगून जायची, ‘आज दुसरं काही नाहीये, गरे खा पण, बेताने.’ मामा किंवा आजोबा म्हणायचे, ‘तू उगीच घाबरवू नको गं, कायसुद्धा होणार नाही, ती सगळी आजारपण तिकडे तुमच्या मुंबईत, इकडे कायसुद्धा होणार नाही. खा रे पोरांनो, पण मेल्यांनो पाणी नका हा पिऊ, नायतर रात्री मला उठवाल.’ कोणी नवीन भिडू आलेला असेल त्याला ते लिबलिबीत गरे धड खाता यायचे नाहीत, घशात अडकायचे, तो घाबरा घुबरा व्हायचा आणि तोंडात बोट घालून गरा काढून टाकायचा. पण बाकीच्यांचे मात्र गरे मटकावणे आणि आठळ्या अलगद तोंडाबाहेर फेकणे सुरू असायचे. मधेच मामी येऊन सांगून जायची, आठळ्या इकडे तिकडे फेकू नका रे, नीट बाजूला ठेवा. बघता बघता प्रत्येकाच्या पानाजवळ २०-२५ आठळ्या जमून जायच्या.

पडवीच्या एका टोकाला दुसरा पिकलेला महाकाय बरका फणस आडवा केलेला असायचा. आणि त्या समोर बसलेली, काकू, मावशी मामी किंवा कधी कधी आजी, आतले रसाळ गरे अलगद काढून बाजूच्या परातीत टाकत राहायची. तिच्याच बाजूला एका मोठय़ा पातेल्याच्या तोंडावर चाळणी धरून त्यातल्या गऱ्यांचा रस काढायला एखाद्या मावशीने घेतला असायचा.

आमची न्याहारी उरकून आम्ही सर्व डोणीवर हात धुवायला गेलो की मामांनी पिकलेला कापा फणस सोलायला घेतलेला असायचा. ‘बरका परवडला गो, पण या काप्याची उस्तवारी करणं नको गो,’ म्हणत हातातल्या सणसणीत धार असलेल्या कोयत्याने फणसाची भाकल करून ठेवलेली असायची. आणि मग मोठय़ा कौशल्याने, त्या चारखंडात लपून बसलेले कापे गरे बाहेर पडून मोठय़ा ताटात गोळा होऊ लागायचे.

मध्ये मध्ये कोणीतरी मोठय़ाने ओरडत असायचे, ‘ती केमरी बघ कोण ती, नको केल्येने, आता हे फणस पुराण संपेपर्यंत यांचा उच्छाद बघायला नको. फोडलेल्या फणसाचा वास तोपर्यंत गोठय़ातल्या गुरांच्या नाकापर्यंत जाऊन पोचलेला असायचा आणि तेथून त्यांचे घराकडे तोंड करून, फुत्कार आणि ऑय ऑयचा जप सुरू झालेला असायचा, कोणी तरी मग म्हणायचे, ‘कोणी तरी चारखंड नेऊन घालारे त्यांच्या पुढय़ात, खाऊदेत.’ मग आम्ही उत्साहाने कुठल्यातरी पानात  चारखंड घेऊन गोठय़ाकडे पळायचो. पण गुरांपुढे जायची हिंमत मात्र व्हायची नाही. मग कोणी तरी ‘मेल्यानो घाबरता कसले,’ म्हणत घरातला मुलगा ती चारखंड गुरांची गदगदा हलणारी शिंग, ओढाळ माना यांना लीलया टाळून त्यांच्या पुढय़ात नेऊन ती चारखंड त्यांना खाऊ घालायचा. ती सर्व झटापट पाहून आमची मात्र इकडे घाबरगुंडी उडालेली असायची. तो मुलगा मात्र अगदी सगळं सहज उरकून एक दोन गुरांच्या पाठीवर थाप टाकून गोठय़ाबाहेर यायचा. मग आमच्यातल्या कोणी तरी विचारायचे, ‘तुला म्हशीची भीती नाही वाटत?’ तो ऐकलं न ऐकल्यासारखा करून निघून जायचा.

बाहेर अंगणात पडवीच्या कौलांच्या सावलीत दोन मोलकरणी मोठे लांब रुंद पाट आणि त्याला काळी कुळकुळीत रुंद पाते असलेल्या विळीवर बसून कच्चे गरे काढून बाजूच्या मोठय़ा रोळीत टाकत असायच्या. घरातली मावस बहीण, मामे बहीण, त्या गऱ्यांच्या सळ्या करू लागलेली असायची, बाजूला तीन चिरे मांडून चूल करून त्यात मोठ मोठी लाकडे सारून ठेवलेली असायची. वर मोठी कढई त्यात खोबरेल तेल उकळायला ठेवलेले असायचे आणि बाजूला मोठा झारा भिंतीला लागून उभा करून ठेवलेला असायचा.  बाजूला मोठी रोळी, त्यात कागद घालून ठेवलेली असायची. बाजूला छोटे स्टूल किंवा लाकडी भक्कम असा ओंडका. थोडक्यात तेथे थोडय़ाच वेळात गरे तळण्याचा कार्यक्रम सुरू होणार असायचा. त्याच्याच बाजूला केळीचे चांगले लांब रुंद हिरवेगार लखलखीत पुसलेले पान पसरून ठेवलेले, तळलेले गरे, कढईतून काढून त्यावर उपसायचे.

या सर्व माणसांच्या जवळ निरनिराळ्या रंगाचे आणि डिझाईनचे, चहाचे रिकामे कप सरळ, काही कलंडलेले असे आपले अस्तित्व कसेबसे सांभाळत पडलेले असायचे. बाजूलाच तेलाच्या वाटय़ा आणि बाजूला तरटाचे तुकडे. फणसाच्या चिकाचे हात पुसायला.

मध्ये मध्ये आजोबा फेरी मारून जायचे. त्यांची अनुभवी नजर सर्वावर फिरत असायची, कोणा कोणाला समजावत, कोणाला फर्मावत, कोणाला थोडी मदत करत असे त्यांचे मध्ये मध्ये येणे-जाणे चालूच असायचे. मधेच ते कोणाला तरी म्हणायचे अगो, मंगळवारी सुशी जायच्ये हो, तो पर्यंत तळलेले गरे पुरे होऊन्देत. पिकला आहे त्यातला कापा अर्धा फणस लेल्याकडे नेऊन दे रे, त्यांचे जावई यायचेत, लेल्यांकडे कापा फणस आहे कुठे, गुदस्ता लावलान आहे, पण त्याचे काय खरं नाही गो, काप्याला कापाच लागेल याची हमी कोण देऊ शकत नाही.

आजी मधेच येऊन सांगून जायची चांगली उन्हे आहेत तोपर्यंत केशवा गऱ्यांच्या पिठासाठी कच्चे गरे तेव्हडे काढून ठेवायला हवेत रे, बाबा. केशव म्हणायचा तुझ्या चिपळ्या काकूला हवे असेल नाय गो, तिच्याकडे उन्हे पडत नाहीत आणि फणस तर नावाला नाहीत. दर वर्षी गणू म्हणतो आमच्याकडे फणस खायला माणूस नाय, आणि गऱ्याचे पीठ पाठवायचं. आजी म्हणायची, ‘जाऊ दे रे केशवा, आता ती माझी एकटीच काकू आहे, पुढल्या वर्षी कोणी बघितलाय.’

मग दीड दोन वाजले की, आजोबांची पूजा आटोपायची आणि त्यांची खणखणीत हाक, पडवीत येऊन पोचायची. ‘जेवायला चला, आहे ते सर्व राहुंदे, नंतर जेवल्यावर बघू. पण विळ्या कोयत्या, नीट बंद करून उठा. या वानर सेनेचा काय नेम नाही. कुठे तरी धडपडतील, धडय़ा बोलांनी एकदा मुंबईला पोचुदेत.’

हे सर्व फणस पुराण मग पुढे आठवडाभर चालायचं, कधीतरी फणसाचे सांदणे नारळाच्या दुधाबरोबर यथेच्छ खायले जायचे, त्यावेळी कोणी पाहुणा पंक्तीला असायचा. आजोबा त्याला आग्रहाने खाऊ घालायचे. एखाद दिवस आठळ्या घालून अळूची भाजी व्हायची. नुसत्या आठळ्यांची खेड म्हणजेच भाजी व्हायची.

मागच्या पडवीच्या कोपऱ्यात चंदेरी साले असलेल्या आठळ्यांचा ढीग तोपर्यंत बऱ्यापैकी उंची गाठून असायचा.

तळलेल्या गरे, वाळवलेले पिक्के गरे, आंब्या फणसाची साठे, मेतकूट, घरचे कुळीथ, कुळथाचे जात्यावर दळलेले पीठ, आंबोशी, ताजे लोणचे, यांच्या पंच्याच्या तुकडय़ात बांधलेल्या पुडय़ा आणि बरण्या मुंबईकरांच्या सामनाजवळ हळूहळू जमा होऊ लागायच्या. आंब्याच्या करंडय़ा, मुंबईला गेल्यापासून चार-पाच दिवसात खायला होतील अशा अंदाजाने भरून पडवीत तयार ठेवायच्या. मुंबईला न्यायचे फणस जायच्या आदल्या दिवशी गडय़ा करवी काढून, अंगण्याच्या कट्टय़ावर आडवे ठेवून दिलेले असायचे. मुंबईकर निघताना, त्याला सुंभ बांधून ज्याच्या त्याच्या ताब्यात द्यायचे.

gadrekaka@gmail.com