भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांची वर्णी लागली आहे. निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीची मुदत संपली होती. त्यामुळे या समितीच्या जागी आज ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन समितीची नियुक्ती करण्यात आली. यात एमएसके प्रसाद यांची अध्यक्षपदी वर्णी लागली, तर माजी क्रिकेटपटू देवांग गांधी, जतिन परांजपे, सरणदीप सिंग आणि गगन खोडा यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, आशिष कपूर यांना ज्युनिअर निवड समितीत स्थान देण्यात आले आहे.