शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्रात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजेल अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरमधील सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नैसर्गिकरित्या भ्रष्टवादी पक्ष असून हा पक्ष उदयास आल्यापासून ते आतापर्यंत पक्षामध्ये काहीच बदलले नाही त्यांचे नेतेही आहे तेच राहिलेत, असेही मोदी म्हणाले.
राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळावरही मोदींनी यावेळी कोटी केली. ते म्हणाले की, “राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमी १० वाजून १० मिनिटे दाखवतात म्हणजे, गेल्या १० वर्षात त्यांनी आपल्या भ्रष्टाचारी उपक्रमांमध्ये १० पटींनी वाढ केली असा याचा अर्थ आहे.”
शेतकऱयांनी कधीच सरकारकडे बंगला, गाडी मागितली नाही, शेतीसाठी पाणी मिळावे एवढी माफक अपेक्षाही काँग्रेस-राष्ट्रवादी पूर्ण करू शकले नाहीत. गेल्या पंधरा वर्षांत शेतकऱयांची पाण्याची गरज भागवण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला यंदाच्या निवडणूकीत त्यांची जागा दाखवून द्या, असेही मोदी म्हणाले.