सत्तेच्या राजकारणामुळे काँग्रेसच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ‘आदर्श’ गैरव्यवहार प्रकरणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात भ्रष्टाचारविरोधी कारवाई करु शकतो नाही, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे ‘हे सरकार भ्रष्टाचारी असल्याचे भाजपचे आरोप सिध्दच झाले असल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी केले आहे.
विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री आदर्शप्रकरणी अडचणीत आले होते. त्यांच्याविरोधात कारवाई केली असती, तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष उध्वस्त झाला असता. सिंचन गैरव्यवहाराचे आरोप झालेले जलसंपदा मंत्री अजित पवार यांची फौजदारी चौकशी किंवा न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्याऐवजी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला गेला. माझे हात बांधलेले होते व मी आघाडी सरकार चालवत होतो. त्यांना आपण क्लीन चीट दिलेली नाही. त्यांना मंत्रिमंडळातून काढले असते तर सरकार कोसळले असते, असे मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत म्हटले असल्याचा उल्लेख रुडी यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या कबुलीमुळे सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झाले असल्याचे रुडी यांनी स्पष्ट केले.
युती तुटल्यासंदर्भात आपण कर्जत येथे केलेल्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आलेला आहे, असे रुडी यांनी सांगितले.