शिवसेनेने नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहायला पाहिजे होते, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. मंत्रिपदासाठी अनिल देसाईंच्या नावाचा प्रस्ताव पाठवल्यानंतर ऐनवेळी राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्याला शिवसेना अनुपस्थित राहते, ही गोष्ट दुर्देवी असल्याचेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले असताना, पुढील सर्व बाबी योग्य रितीने होतील याबद्दल शिवसेनेने विश्वास बाळगण्याची गरज होती. याशिवाय, राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देताना तात्विक मुद्द्यांवरच चर्चा होणे गरजेचे असून, मंत्रिपदे आणि खातेवाटपाच्या गोष्टी दुय्यम असायला हव्यात असे त्यांनी सांगितले.