खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
उस्मानाबाद, हातकणंगले

रायगडावरील भगवा कायम राहणार?
रायगड जिल्ह्य़ातील चार, तर रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली आणि गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेनेचा भगवा फडकला होता. वास्तविक रायगडने नेहमीच माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना साथ दिली. प्रत्येक निवडणुकीत ही माझी शेवटची निवडणूक असे भावनिक आवाहन करीत अंतुले मतदारांना आपलेसे करीत. पण गेल्या वेळी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले विधान अंतुले यांना चांगलेच महागात पडले. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे अनंत गिते यांना चांगले मताधिक्य मिळाले. अंतुले आता थकले असून, तब्येत साथ देत नसल्याने त्यांचा रायगडशी पूर्वीएवढा संपर्कही राहिलेला नाही. शेकापशी असलेली युती शिवसेनेला रायगड मतदारसंघात फायदेशीर ठरते. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये शेकापची चांगली ताकद आहे. मतदारसंघात कुणबी मतदारांचे असलेले मोठे संख्याबळही शिवसेनेचे गिते यांना उपयुक्त ठरते. आघाडीत हा मतदारसंघ कोणाकडे राहतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गिते यांच्याशी सामना करण्यासाठी तेवढय़ाच तोडीचा उमेदवार काँग्रेसकडे नाही. राष्ट्रवादीचा या मतदारसंघावर डोळा असला तरी जलसंपदामंत्री सुनील तटकरे स्वत: लोकसभा लढण्यास फारसे उत्सुक नाहीत. पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी लढण्याची तयारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. कारण जाधव यांचा गुहागर मतदारसंघ हा रायगडमध्ये समाविष्ट होतो. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा मतदारसंघ : रायगड
विद्यमान खासदार : अनंत गिते, शिवसेना
मागील निकाल :  कॉँग्रेसचे उमेदवार बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांचा पराभव
जनसंपर्क
दांडगा लोकसंपर्क. संसद अधिवेशनाचा काळ वगळता आठवडय़ातील दोन दिवस मतदारसंघातील लोकांसाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न.

मतदारसंघातील कामगिरी :
*पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सुधारणा कामास मंजुरीकरिता यशस्वी पाठपुरावा.
*आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांसाठी लोकसभेच्या याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून ठोस निर्णय.
*एमआयडीसी आणि रिलायन्स पेट्रोकेमिकल लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी पाठपुरावा.
*कोकणातील खाण प्रश्नाचा पाठपुरावा.
*खासदार निधीअंतर्गत रायगडमध्ये ११ कोटी ३९ लाख, तर रत्नागिरीत सहा कोटी ९४ लाख रुपयांची कामे.
लोकसभेतील कामगिरी
एकूण उपस्थित केलेले प्रश्न १०, तारांकित १, अतारांकित ९, ६७ वेळा चर्चेत सहभाग. एकूण हजेरी २४६ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*रत्नागिरीतील खेड येथील पुलाचे रुंदीकरण करणे
*जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत प्रश्न
*भाववाढ तसेच पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या दरांचा प्रश्न उपस्थित केला.
*नियोजन आयोगाकडून गरिबीची व्याख्या ठरवण्याच्या निकषांसंदर्भातील मुद्दा
एकही लक्षवेधी काम नाही
गेल्या पाच वर्षांत या निष्क्रिय खासदारांना एकही लक्षवेधी काम करता आलेले नाही. उलट केंद्र सरकारच्या विविध पाणीपुरवठा योजनांतील भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम त्यांनी केले. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाला मान्यता मिळवून घेणेही त्यांना शक्य झाले नाही. कोकण रेल्वेच्या जलद गाडय़ांना रायगडमध्ये थांबा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत.     – माणिक जगताप, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस    

निधीचा पुरेपूर वापर
खासदार निधीच्या २० कोटींपैकी १८ कोटी ३४ लाख रुपयांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. बाकीचे कामही लवकरच पूर्ण होईल.  खासदार निधीतून ग्रामीण भागातील रस्ते, साकव, समाजमंदिर यासारख्या किमान नागरी सुविधा पुरवण्यावर मी भर दिला.  रायगडमधील मतदार माझ्या कामगिरीवर समाधानी असतील असा विश्वास आहे.
अनंत गित़े