प्रा. जयंत नारळीकरांच्या संशोधनकार्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. पण विज्ञानाच्या एका मराठी विद्यार्थ्याच्या नजरेतून नारळीकरांना पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतर अनेक पैलूही समोर येतात. नारळीकरांशी माझा पहिला ‘परिचय’ झाला तो त्यांच्या विज्ञानकथांमधून! ‘अंतराळातील भस्मासुर’, ‘प्रेषित’ या त्यांच्या पुस्तकांनी इतकं भारावून टाकलं होतं की जेव्हा ‘वामन परत न आला’ आणि ‘आकाशाशी जडले नाते!’ प्रकाशित झाली तेव्हा त्या त्या आठवड्यातच ती विकत घेऊन वाचून काढली होती. ते ‘कोणीतरी मोठे वैज्ञानिक आहेत’ असं पुसटसं माहिती होतं, पण त्यापेक्षाही ‘माझे सर्वात आवडते मराठी लेखक आहेत’ ही भावना जास्त होती. पुढे १९९५च्या सूर्यग्रहणाच्या वेळी मी ग्रहणाबद्दल एक कविता लिहिली आणि नारळीकर एका समारंभात दिसल्याबरोबर त्या कवितेची एक प्रत त्यांच्या हातात दिली. मग काही दिवसांनी त्यांचं एका पोस्टकार्डावर उत्तर आलं ‘‘तू दिलेली कविता वाचली. आवडली.’’ बास. पण अस्मादिकांना स्वर्ग दोन बोटे उरला.

पुढे महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकताना कधीतरी त्यांच्या स्थिर स्थिती सिद्धान्ताबद्दल वाचलं, त्यांची इंग्रजी भाषेतली खगोलशास्त्राबद्दलची पुस्तकंही वाचली. पण अप्रूप याच गोष्टीचं होतं की इतका मोठा शास्त्रज्ञ असूनही वेळात वेळ काढून मराठीत पुस्तकं लिहितो. या शतकाच्या सुरुवातीला भारत सरकारच्या शिक्षणमंत्र्यांनी टूम काढली होती की ‘विद्यापीठांमधून फलज्योतिष शिकवा.’ अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञ ठामपणे त्याविरोधात उभे राहिले आणि त्यांनी शिक्षणमंत्र्यांना अर्धवट का होईना माघार घ्यायला भाग पाडले. या मोहिमेतही नारळीकर आघाडीवर होते. त्यामुळे ‘फलज्योतिषाविरोधात न घाबरता उघडपणे बोलणारे’ ही ओळख मनात तयार झाली.

माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली ती २००३ साली. मी पोट्सडाम (जर्मनी) इथे शिकत असताना अचानक एक दिवस कळलं की गावातल्याच दुसऱ्या संशोधन संस्थेत नारळीकरांचं व्याख्यान आहे. गेलो ऐकायला! प्रेक्षकांत मी एकटाच भारतीय होतो. व्याख्यानानंतर सहज विचारलं तुम्हाला या गावातली प्रेक्षणीय स्थळं पाहायची आहेत का? ते ‘हो’ म्हणाल्यावर दुसऱ्या दिवशी नारळीकर पती-पत्नी आणि मी बसने गावभर फिरलो. दुपारी कोणतेही आढेवेढे न घेता ते घरी येऊन जेवले.

भारतात परत आल्यावर कामानिमित्त भेटी होतच राहिल्या. भारतीय खगोलशास्त्राचा पुराव्यानिशी शाबित होणारा खरा इतिहास, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, फलज्योतिषाला ठाम विरोध, आणि महत्त्वाचे म्हणजे मराठीतून विज्ञानप्रसार असे अनेक समान दुवे असल्याने अनेक चर्चा झाल्या. त्यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या साथीने फलज्योतिषाला संख्याशास्त्राच्या मदतीने नापास करणारा शोधनिबंध तर विख्यात आहेच. पण डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासणी करण्यासाठी जे काही प्रयत्न झाले, त्या सर्व प्रयत्नांना नारळीकर दाम्पत्याने सक्रिय पाठिंबा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखक होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात संशोधक आणि विज्ञान प्रसारक आहेत.)