चालू हंगामात मे महिन्याच्या मध्यापासून अनेक भागात पाउस पडत असून हंगामाच्या सुरूवातीलाच चांगला पाउस झाल्याने खरीपाचा पेरा यंदा लवकर झाला आहे. खरीपात पेरलेले पीक आता पुढील पंधरा दिवसात काढणीला येणार आहे. तर काही शेतकरी विशेषता बार्शी, मंगळवेढा, जत, सांगोला भागात केवळ रब्बी हंगामाच घेण्यात येतो. या भागात जिरायती क्षेत्र जास्त असल्याने या ठिकाणी रब्बी ज्वारी म्हणजेच शाळूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आता मोकळ्या रानात रब्बी हंगामातील शाळूची पेरणी सप्टेंबर मध्यापासून करता येउ शकेल. यंदा पाउस झाला असल्याने आणि करलाट माती चांगली खोलवर भिजली असल्याने रब्बी हंगामासाठी तयारीला लागणे आवश्यक आहे.
दोन वर्षापुर्वी पावसाने ओढ दिल्याने बाजारात शाळू ज्वारीची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शाळूचे दर किलोला ७५ रूपयांपर्यंत पोहचला होता. चालू वर्षी समाधानकारक शाळूचे उत्पन्न असले तरी बाजारात शाळूचा दर ४० ते ५० रूपये किलोपर्यंत टिकून आहेत. यामुळे शाळूला मागणी कायम असल्याचे स्पष्ट आहे. केवळ बागायती म्हणजे नगदी पिके घेउन पोटआग भागवता येणार नाही. यासाठी तृणधान्यही महत्वाचे आहे. या तृणधान्यामध्ये ज्वारी हे महत्वाचे पिक मानले जाते. कारण प्रत्येकाच्या ताटात भाकरीही असतेच. विशेषत: दख्खनच्या पठारावरील मुख्य अन्न म्हणून ज्वारीचीच गणना केली जाते.सांगलीचा जत, सोलापूर, बार्शी, मंगळवेढा हा रब्बी ज्वारीसाठी प्रसिध्द असलेला भाग. पुढील महिन्यात परतीचा पाउसही परतणार असून यानंतर ऑयटोंबर हिटची जाणीव सगळीकडे होणार आहे. जर तत्पुर्वी शाळूची पेरणी झाली तर पिकाला एखादा पाउसही उपयुक्त ठरू शकतो. सप्टेंबर 15 नंतर शाळू पिक पेरणीचा हंगाम सुरू होईल. मात्र यासाठी पावसामुळे तणाने माजलेली राने स्वच्छ करायला हवीत, तसेच खरीप हंगामात करण्यात आलेली कडधान्याची पिके, सोयाबीन ही पिके काढणीचा हंगामही आणखी पंधरा दिवसात सुरू होत आहे. खरीप पिकांच्या काढणीनंतर रान स्वच्छ करून, तण बाजूला काढून रब्बी पेरणीसाठी रान तयार करणे गरजेचे आहे.
दख्खनच्या पठारावर काळया, करलाट जमिनीतील कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून रब्बी ज्वारी म्हणजेच शाळू ओळखले जाते. राज्यातील सुमारे एक तृतियांश उत्पादन सोलापूर, मंगळवेढा, जत सांगोला या भागात होते. गव्हापेक्षा पचनास हलके आणि कसदार धान्य म्हणून शाळूची गणना केली जाते. सामान्यातील सामान्य माणसाच्या ताटातही सहजरित्या उपलब्ध असलेली भाकरी यावर्षी अपुर्या पुरवठ्यामुळे महाग झाली.परिणामी चटणी-भाकरी सामान्याच्या ताटातील रोजची गरज आज श्रीमंतांच्या ताटातील मेजवाणी बनू लागली आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
शाळू पिकाला साधारणत। २७ ते ३२ अंश सेल्सियस तापमान लागते, परंतु काही प्रकार ३८ ते ४४ अंश सेल्सियस तापमानातही वाढू शकतात. हिवाळी हंगामातील प्रकारांना १६ अंश सेल्सियस पर्यंत किमान तापमान चालते. सर्वसाधारणपणे हे पीक सपाट प्रदेशात वाढणारे आहे, परंतु कर्नाटकात काही प्रकार ९०० मी. उंचीवरील प्रदेशातही लागवडीखाली आहेत. वार्षिक ५० ते १०० मिलीमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात ज्वारीचे पीक चांगले येते.
ज्वारीचे पीक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या अगर दुमट जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत हे पीक वाढू शकते. मात्र ज्या ठिकाणी कमी पाउस असतो अशा ठिकाणी करलाट म्हणजे दहा ते पंधरा फूट जमिन काळ्या मातीची आहे अशा जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होते. एकदा का जमिन चांगली गरगरीत पावसाने भिजली की पुन्हा केवळ कोळपणीवर हे पीक हमखास उत्पन्न देते. अशीच जमिन मंगळवेढा, सांगोला, बार्शी, जत या भागात पाहण्यास मिळते. यामुळे या परिसरात या रब्बी ज्वारीचे पिक पारंपारिक मानले जाते.या पिकाकरिता जमीन दर वर्षी नांगरीत नाहीत. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. मे महिन्यात दोन-तीन वेळा १०-१२ सेंमी. खोलीपर्यंत जमीन कुळवाने मोकळी करतात.
शाळू पिकाची पेरणी प्रामुख्याने हस्त नक्षत्र संपल्यानंतर म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात केली जाते. जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे जमीन चांगली भिजून वाफसा आल्यावर पाभरीने बी पेरतात. यात पावसाचे पाणी शक्य तितके मुरवून नंतर जमिनीची मशागत करून पाभरीच्या दोन फणांत ४५ सेंमी. अंतर ठेवून बी पेरतात. काही ठिकाणी टोकन पध्दतीचा वापरही केला जातो. जमिनीत पुरेशी ओल होऊन वाफसा आला म्हणजे ४५ बाय ४५ सेंमी. अंतरावर सरळ ओळीत ५-६ सेंमी. खोल (ओलीपर्यंत) भोके पाडून त्यांमध्ये प्रत्येकी ६-८ ज्वारीचे दाणे टाकून ओल्या मातीने ती भोके झाकून टाकतात. बी उगवल्यावर बी विरळणीच्या वेळी प्रत्येक टोकणीच्या जागी दोन-तीन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात. पेरणीसाठी निवडक बी वापरतात. त्यासाठी बी चाळून पाखडून घेतात. पिकात पुढे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग उद्भवू नयेत म्हणून पेरण्यापूर्वी बियांना पारायुक्त कीटकनाशक अथवा गंधक चोळून घेतात. त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारलेल्या प्रकारांचे बी वापरणे आवश्यक असते. धान्याच्या पिकासाठी हेयटरी ९-१० किलो आणि वैरणीच्या पिकासाठी ५०-६० किलो बी वापरावे लागतात.
पेरणीनंतर (अगर बी टोकल्यानंतर) सुमारे तीन आठवड्यांनी पिकाला कोळपणी देतात. निंदणी करून ओळीतील तण काढून घेतात. पुढे तर पंधरा दिवसांनी पिकाला कोळपणी देतात. पिकात तण वाढू देत नाहीत. कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही, पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो. एकूण ३-४ कोळपण्या व दोन-तीन खुरपण्या देतात.
खत
ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात. हेक्टरी ८० किलो नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ. सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात.
कोरडवाहू पिकाला सर्व नायट्रोजन आणि फॉस्फोरिक अम्ल एकाच हप्त्यात पेरणीपूर्वी देतात. बागायती पिकाला नायट्रोजनाची निम्मी मात्रा आणि फॉस्फोरिक अम्ल आणि पोटॅश यांची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी आणि नायट्रोजनाची राहिलेली निम्मी मात्रा पेरणीनंतर ३०-४५ दिवसांनी (पीक ५०-६० सेंमी. उंच झाल्यावर) देतात. ज्या भागात पाऊस खात्रीचा असतो आणि जमिनीतील ओल ज्वारीच्या पिकाची गरज पुरी होईपर्यंत टिकेल अशी शाश्वती असते किंवा पिकाला खत दिल्यानंतर पाणी देण्याची सोय असते, अशा ठिकाणीच रासायनिक खते (वरखते) देणे श्रेयस्कर असते.
ज्वारीचे पीक तयार व्हावयाला किमान १३० ते १४० दिवस लागतात. पीक काढणीलायक होण्याच्या आधी २०-२५ दिवस त्याच्या ताटांवरील खालची बुंध्याकडची दोन-चार पाने काढून घेतल्यामुळे पिकात हवा खेळती राहून अकार्यक्षम पानांमध्ये जाणारा अन्नरस वाचून त्याचा ताटाला उपयोग होऊन कणसात दाणे चांगले भरतात.
जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान (अथवा पाणी पुरवठ्याची साधने), खताची मात्रा आणि मशागत यांवर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते. कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ६५० ते ७५० किग्रॅ. असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न १२०० ते १८०० किग्रॅ. असते. भारी जमिनीत ते हेक्टरी ४००० किग्रॅ. पर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी २० टन आणि भारी जमिनीत ३० ते ३५ टन मिळते.
नेहमीच्या आहाराचा एक प्रमुख भाग म्हणून ज्वारीचा भारतात, विशेषत। कमी पर्जन्यमानाच्या भागात, उपयोग करतात. शिवाय कणसे काढून घेतल्यावर राहिलेली वाळलेली ताटे (कडबा) यांचा जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होतो. दाण्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात अथवा लाह्या, हुरडा व लापशी या स्वरूपांतही दाण्याचा वापर करतात. दाण्यापासून माल्ट’ तयार करतात व त्याचा उपयोग लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी अथवा बिअर तयार करण्यासाठी करतात. दाण्यातील स्टार्च पासून किण्वनाने (आंबवून) एथिल अल्कोहॉल, सिटोन व ब्युटिल अल्कोहॉल तयार करतात. ज्वारीचा स्टार्च मक्याच्या स्टार्चप्रमाणे असून त्याचा खाद्य पदार्थांच्या उद्योगांत आणि कापडधंद्यात खळीसाठी उपयोग होतो. कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगातही ज्वारीच्या स्टार्चचा खळीसाठी वापर होतो.