|| नितीन भरत वाघ

कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेवरून साहित्य जगतात सध्या काहूर माजले आहे. ही कविता अश्लील असल्याचा आक्षेप विविध संघटनांनी घेतल्याने मुंबई विद्यापीठाने बीएच्या अभ्यासक्रमातून ही कविता रद्द केली. दुसरीकडे या कवितेतील ओळीचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे अनेक मान्यवर साहित्यिकांचे म्हणणे आहे. या वादंगानिमित्ताने ही कविता आणि अन्य मुद्दय़ांचा ऊहापोह करणारी टिपणे..

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

‘पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या निव्वळ पाण्यासारखा..’

या ओळीने जी कविता संपते त्या कवितेवरून वाद निर्माण व्हावा हे या कवितेचे दुर्दैव आणि भीषण विरोधाभास. कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमात लागलेल्या कवितेवर, खरं तर फक्त एका ओळीवर काही लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. या एका ओळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी साहित्य व्यवहारातील काही प्रश्नांना उबळ आली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, अश्लीलता वगरे, या सगळ्या मतमतांतरांत मला पडायचे काही कारण नाही. फक्त या कवितेपुरता किंवा ओळीपुरता मला सीमित राहायचं आहे.

‘पाणी’ हा विषय घेऊन दिनकर मनवर यांनी सामाजिक शोषणाच्या इतिहासाचा मोठा पटच त्यांच्या कवितांमधून मांडला आहे. भारतीय उपखंड काही भाग वगळता पाण्यासाठी कधीही दुíभक्ष नव्हता. बारमाही वाहणारे अनेक नद, नद्या भारतभर पसरलेल्या आहेत. जमिनीत पाणी आहे. असं असताना भारतीय समाजाच्या एका मोठय़ा भागाला (अस्पृश्यांना) अनेक शतके पाणी बहिष्कृत होतं. पाण्यासारखी जीवनावश्यक गोष्ट, जी निसर्गानेच उपलब्ध करून दिली आहे ती जेव्हा तहान भागवण्यापुरतीसुद्धा घेऊ दिली जात नाही तेव्हा ‘पाणी’ हे निव्वळ ‘पाणी’ उरत नाही तर ते माणसाला अस्पृश्यतेसारखं चिकटतं. पाणी स्वतंत्र अस्तित्व बनतं, ते वर्ग, जात, धर्म सगळं बनतं पण पाणी काही लोकांसाठी ‘पाणी’ बनत नाही. मग या पाण्याला त्याच्या खऱ्या रूपाला शोधायचं कसं? ओळखायचं कसं? कोणत्या प्रतिमा किंवा दृष्टांतकं वापरली म्हणजे ‘पाणी कसं अस्तं’ ते कळेल? जे ओठांपर्यंत पोहोचूनही ओठांची तहान मिटवत नाही ते पाणी कसं अस्तं? कोणत्याही संदर्भाशिवाय पाणी केवळ पाणीच असू शकत नाही का? दिनकर मनवर यांनी या पाण्याच्या अस्तित्वरूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे. या शोधात पाणी कसं असू शकतं याच्या प्रतिमा त्यांनी कल्पिल्या आहेत. कारण व्यवस्थेने पाणी कसं अस्तं हे कवीला कळू दिलेलं नाहीये.

ज्या ओळीबद्दल ‘आक्षेप’ घेतला आहे त्या ओळीबद्दल थोडा विचार करू. त्याआधी ‘आदिवासी’ या शब्दाच्या अर्थाविषयी. इंग्रजीत आदिवासी या शब्दाचे दोन मुख्य अर्थ आहेत : Aboriginal’ (प्राचीन/काळवाचक) आणि Indigenous (स्थानिक). या दोन अर्थानी आदिवासी हा शब्द वापरला जातो. जे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत ते Aboriginal आणि कोणत्याही दुसऱ्या समूहाच्या वसाहतीकरणाआधीच्या काळापासून एखाद्या प्रदेशात वास्तव्यास आहेत ते Indigenous, थोडक्यात देशी. भारतात अनुसूचित जमाती (Scheduled tribes) या प्रवर्गात सर्व आदिवासींना समाविष्ट करण्यात आलेले आहे, मात्र त्यांना आदिवासी (Aboriginal या अर्थाने) संबोधन नाही, तर प्राचीन पारंपरिक समूह (Primitive Ethnic group) असे म्हटले आहे. शिवाय पारंपरिक समूह कोणाला म्हणावे याविषयी सांगितले आहे.

आता या कवितेत जी ओळ आहे तिचा नेमका संदर्भ काय आहे ते पाहू. त्याआधी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, आदिवासींचे पारंपरिक समूह केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर सगळ्या जगभर आहेत आणि त्या-त्या ठिकाणच्या त्याबद्दलच्या व्याख्या व कल्पना स्पष्ट आहेत. दिनकर मनवर हे केवळ कवीच नाहीत तर नावाजलेले चित्रकारही आहेत ही माहिती अभ्यासक्रमातील कवीची ओळख या सदरात दिली असेलच. मनवर यांचा चित्रकलेचा अभ्यास आहे, चित्रकलेच्या सगळ्या महत्त्वाच्या चळवळींची, शैलींची त्यांना माहिती आहे. ते संदर्भ त्यांच्या कवितेत येणं अत्यंत साहजिकच आहे. व्यक्तीने पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या अनेक गोष्टी नेणिवेत संचयित होत असतात आणि कोणतीही कलाकृती स्वतंत्रपणे अवतरत नाही तर अनेक इतर कलांचा समुच्चयांच्या संदर्भासहित ती निर्माण होते. साधारणपणे ज्यांना कवितानिर्मितीची प्रक्रिया माहीत असते, त्यांना कळते की कवितेत संदर्भ कसे अवतरतात. आधी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रतिमा, संदर्भ विचारात अमूर्त स्वरूपात रुतून बसलेले असतात आणि अचानक कधी तरी ते शब्दरूप किंवा चित्ररूप धारण करतात. कलाकृतीमधील बाह्य़कलाकृतीच्या संदर्भाना आंतरसंहितात्मता (Inter-textuality) म्हणतात. साहित्यातील आंतरसंहितात्मता बऱ्याचदा अकॅडेमिक वादाचा मुद्दा असतात, म्हणजे साहित्यात आंतरसंहितात्मता असावी की नसावी. कारण आंतरसंहितेतले सगळेच संदर्भ वाचकास ज्ञात असतीलच असे नाही. आंतरसंहितात्मतेमुळे साहित्यकृतीचे आकलन, विश्लेषण संदर्भ न समजल्याने बऱ्याचदा दुबरेध आणि कठीण बनते. कवितेच्या बाबतीत तर शब्दरूपात कोणत्या संदर्भात काय अवतरेल हे कोणीच सांगू शकत नाही. दिनकर मनवर यांच्यासारखा चिंतनशील, गंभीर विचारी कवी जे काही लिहितो ते त्यांच्या विचारप्रक्रियेचा आणि चिंतनाचा भाग असतो. मनवरांसारख्या कवीची कविता जी ज्ञानेश्वरांच्या  ‘पसायदान’ मागण्याच्या वाटेवरची आहे, ती कविता कुणाला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दुखवू शकत नाही.

अश्लीलतेसंबंधात तळटीप : केवळ एका रंगाचा संबंध आणि संदर्भ ‘अश्लील’ वाटत असेल तर आपल्याला समाज म्हणून परिपक्व होण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे एवढंच म्हणता येईल. अश्लीलतेसंबंधात (तळ) तळटीप : अश्लीलता कशाला म्हणायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर कै. भास्कर कुलकर्णी यांच्या, ते वारली लोकांमध्ये जाऊन राहिले होते त्या काळातल्या डायऱ्या वाचाव्यात.