वैद्य विक्रांत जाधव शरीर थकून विश्रांती घेतं, इंद्रिये आपलं काम काही काळापुरतं थांबवतात, त्या क्रियेला निद्रा असं म्हटलं जातं. या शांत अवस्थेत शरीराचं पोषण होत असतं. निद्रा म्हणजेच सामान्य भाषेत झोपणे. डोळे बंद करून झोपण्यापेक्षा डोळे बंद होऊन शरीर एक संथ अवस्था धारण करते आणि शरीरस्थ क्रिया संथपणे मनात सुरू ठेवते ती क्रिया. निद्रा हा शरीराचा धर्म आहे. शरीराच्या पोषणासाठी निद्रा अत्यावश्यक असून ती शरीराच्या त्रिस्तंभांपैकी एक आहे. आहार, निद्रा व ब्रह्मचर्य हे शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले त्रिस्तंभ आहेत. या त्रिस्तंभांचा एकमेकांशी असणाऱ्या दृढ संबंधातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. शरीर थकते तेव्हा निद्रा जागृत होते. मनुष्याची शरीरस्थ इंद्रिये त्यांच्या कार्याने थकतात. मनही थकून विश्रांती घेते. इंद्रिये आपल्या कार्यापासून अलिप्त होतात, त्या शरीरस्थ अवस्थेला निद्रा म्हणतात. या अवस्थेमध्ये शरीराची पोषण क्रिया घडते, शरीरक्षीणतेच्या क्रियेवर उपक्रिया घडते आणि पोषण क्रिया सुरू होते म्हणून निद्रा ही पोषण करणारी अवस्था मानली जाते. म्हणूनच निद्रेला शास्त्राने ‘भूतधात्री’ असे म्हटले आहे. यामधून शरीर धारण करणारी, पोषण करणारी अवस्था स्पष्ट होताना दिसते. यातून निद्रा निश्चित व नेमकी नियमित असणे किती आवश्यक आहे हे दिसते. निद्रा या अवस्थेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. ती रात्रीच का येते, तिचा संबंध दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विचार, अपेक्षा यांच्याशी आहे का? निद्रा सवयीने निर्माण होते का? निद्रा अवस्थेमध्ये शरीर कसे असायला हवे? श्वासवेग, शरीरक्रिया कशा असतात? कशा असायला हव्यात? निद्रा प्रकार, तिच्या अवस्था यांचे वर्णन करता येईल. निद्रेच्या डुलकी लागणे, पेंगणे, झापड येणे, वामकुक्षी झोप अशा अवस्था दिसून येतात. यामध्ये झोप ही नियमित येणारी दीर्घकालीन शांत अवस्था म्हणता येईल. झापड ही अत्यंत अल्पकालीन, तर डुलकी आपत्कालीन असते. आयुर्वेद शास्त्राने जे वेग कधीच धारण करू नये, असे सांगितले आहे, त्यामध्ये निद्रा हा वेग आहे. हा वेग धारण केल्यास म्हणजे अडवल्यास शरीरावर दुष्परिणाम संभवतात. निद्रा कफाच्या आधाराने येणारी असून कफ हा धारणीय दोष निद्रेला कारणीभूत आहे. उत्तम निद्रा म्हणजे श्वास संथ असणे, डोळे बंद असणे, शरीरस्थ स्नायू, मांसपेशी शिथिल होणे (म्हणूनच अचानक केलेल्या हालचालीने पायात गोळे येणे हे लक्षण निर्माण होते), निद्रेमध्ये शरीराचे तापमान जागेपणापेक्षा कमी असते, तर इंद्रियांचा संपर्क होत नसल्याने मनही या अवस्थेमध्ये संथपणे कार्य करत असते. (या ठिकाणी स्वप्न या मीमांसेचा जन्म होतो) निद्रा ही कफाच्या अधिकारात असते. रात्रीचा पहिला प्रहर कफाचा असल्याने गाढ निद्रा लागते, आयुष्याच्या पहिल्या प्रहरात म्हणजे बालवयात निद्रा अधिक असते, तर वात वाढल्यास प्राकृत निद्रेवर परिणाम होऊन निद्रानाश ही अवस्था येताना दिसते. निद्रावस्थेवर आहार तसेच सत्त्व, रज आणि तमोगुणाचे प्राबल्य असते. त्या तरतमभावाने निद्रेची अवस्था निर्माण होताना दिसते. तमोगुणाची वृद्धी ही आहारविहार, प्रकृती (बाह्य़ वातावरण ऋतू) यांच्याशी निगडित असते. तमोगुणी निद्रा ही कधीही येताना दिसते, तर रजोगुणी निद्रा आहार-विहारीय कारण नसताना येते, तर सत्त्वगुणी निद्रा ही रात्री येणारी शांत निद्रा आहे. निद्रेचा विचार करताना ती लहान वयात अधिक, मध्यवयात मध्यम (पण थकव्याने अधिक येते, त्याला सवय ही कारणीभूत आहे.) तर उतार वयात अल्प दिसून येते. कफाचे प्राबल्य कमी झाल्यास निद्रा कमी होते. नैसर्गिक निद्रा आणणे कष्टसाध्य असून ती सवयीने येत राहते. निद्रा का लागते यावर आधुनिक शास्त्रात संशोधन झाले असेल, पण आयुर्वेदाने, धर्मशास्त्राने त्याचा अचूक ऊहापोह केलेला दिसून येतो. शरीरपोषणासाठी शरीराने घेतलेला निर्णय हे त्याचे उत्तर असू शकते. निद्रेचे तर्कशास्त्र समजल्यास त्याच्या ऱ्हासाची कारणे व उपाय सहज लक्षात येतात. निद्रा किती असावी याचे उत्तर मात्र शरीर किती झिजते त्यावर अवलंबून आहे, असे म्हणता येईल, मात्र निद्रा योग्य काळापुरती असावी म्हणजेच पाच ते आठ तासांची असावी हे शास्त्रसिद्ध आहे. अधिक निद्रा घेणारे अधिक उत्तम आरोग्यदायी राहतात, असे दिसून येते असे नाही हेही सत्य! निद्रा प्राकृत करणारा आहार : निद्रकार आहार : निद्रा ही कफ प्राधान्यामुळे येणारी असल्याने कफवर्धक आहार हा ढोबळमानाने निद्राकर मानता येईल, पण प्रत्येक वेळी कफवर्धन झाल्यास निद्रा निर्माण होईल असे म्हणता येणार नाही. कारण आयुर्वेदानुसार कफाचे कफ निर्माण एवढेच कार्य नव्हे. मधुर रसाचे, थंड (शीत गुणाचे), गुरू (पचायला जड पदार्थ, द्रव्य, स्निग्ध यांमध्ये स्नेह असलेले तेलकट, तुपकट, चरबीयुक्त, मज्जायुक्त येतात), मंद गुणाचे म्हणजे शरीरामध्ये मंदत्व निर्माण करतात असे सर्व पदार्थ, खाद्य हे निद्राकर ठरतात. म्हणूनच आपल्याला गोड खाल्ल्यानंतर, जेवणानंतर, अति थंड खाल्ल्यानंतर झोप येते. जलकर जागी असणाऱ्या पक्ष्यांचे मांस, कोंबडीचे मांस, डुकराचे मांस निद्राकर आहेत. मद्य, इतर व्यसनेही विकृत निद्राकर आहेत. वाढलेल्या कफामुळे शरीरक्रिया मंदावतात आणि त्याचा परिणाम मनावर होतो, तमोगुण वाढतो आणि निद्रा ही क्रिया घडते, या निद्रेला कफज निद्राही म्हणता येईल. शास्त्रकारांनी निद्रा आणि कफ यांची सांगड घातली आहे. मात्र ती घालताना पदार्थ द्रव्यांचा उल्लेख न करता ती व्यक्ती, प्रकृती व तिच्या कफ निर्माण करणाऱ्या प्रक्रियेवर निद्रा घडते असे सांगितलेले दिसते. दूध हे उत्तम निद्राकर आहे म्हणूनच रात्री झोपताना दूध सेवन करण्यात येते, पण पूर्वीच्या काळी जेवण सूर्यास्ताच्या वेळी होत असे हेही विसरायला नको. दूध व दुग्धजन्य पदार्थ हे निद्राकर असतात. त्यातही गोड पदार्थावर पाणी प्यायल्याने हमखास निद्रा येते, आइस्क्रीमवर पाणी प्यायल्याने झोप लागते अन् ते पचायलाही जड होते. दह्य़ाचे पाणी (किलास), ताजे दही (मोरट) तसेच चीक ( पहिले दूध) हे पदार्थ निद्राकर आहेत. याबरोबर पचायला जड, अति प्रमाणात आंबवलेले पदार्थ खाणे (इडली, उत्तपा इ.) हेही निद्राकर आहे. हल्ली सेवन केले जाणारे कार्बयुक्त पदार्थ, अंडी ( पिवळा बलक), अति थंड जेवण हे निद्राकर आहे. अग्नी कमी असताना अधिक खाल्ल्यास पोट जड होते, पचन कठीण होते. त्यामुळे तेसुद्धा निद्राकर आहे. कफ हा दोष असून निद्रा हे त्याचे कार्य आहे. निद्राकर कर्म : शरीर अभ्यंग, विशेषत: जोरात मालीश, शिरोभ्यंग, टाळू भरणे, डोक्याची मालीश (चंपी) चेहऱ्यावर सुगंधी लेप, तसेच विस्तीर्ण शय्या हे निद्रा उत्तेजित करतात. चिंतामुक्त, कामरहित असणे, मन शांत असणे या क्रिया उत्तम निद्रा देतात. उत्तम निद्रा का हवी? उत्तम निद्रा असल्यास सुख, पुष्टी, बळ, ज्ञान, आरोग्य वृषता, पुस्तशक्ती उक्तात्ता, मन प्रसन्नता, इंद्राय प्रसन्नता, उत्तम वर्णप्राप्ती मिळते. म्हणूनच निद्रेला शरीराचा एक स्तंभ म्हटले आहे. आत्मा, मन आणि शरीर क्रिया निद्रेवर आधारित आहेत. वरील गुण तसेच कर्माच्या गुणांच्या विरुद्ध पदार्थ आणि कर्म हे निद्रानाश करणारे आहेत हे शास्त्राने वेगळ्या दिशेने अधोरेखित केले. तिखट, तुरट, खारट, आंबट हे पदार्थ व द्रव्य अधिक घेतल्यास निद्रानाश होतो वा निद्रा कमी होते. अति उष्ण पदार्थही निद्रा कमी करतात. कफाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जेवणानंतर गरम पाणी घेतल्याने निद्रेचा वेग कमी होतो. निद्रा निर्माण करणारे हेतू, कारणे योग्य असतील तर योग्य निद्रा मिळेल. अति असतील तर अति होईल आणि कमी असतील तर निद्रा कमी मिळेल. निद्रेवर रात्रीचा प्रभाव असतो. अनेक वेळा गार हवमुळे झोप येते. गार हवामानात झोप अधिक उत्तम येते. निद्रा संस्कारांनी ठरते. काही देशांमध्ये रात्रकाळ मोठा असतो. तेथील लोकांनी काळाप्रमाणे निद्रा घेण्याची सवय केलेली दिसते. रात्रकाळ निद्रेला उत्तेजित करतो. आज या रात्रकाळावर संस्कारांनी म्हणजेच सवयीने मात करून रात्रनिद्रेवर नियंत्रण मिळवले असले तरी ते स्वाभाविक नाही. निद्रा नाश या क्रियेत वाताची वृद्धी दिसून येते. सर्व व्यसनेही तात्काळ वाताची वृद्धी करून शरीर धातूचा क्षय करतात हे लक्षात घ्यायला हवे. अति निद्रा, अंगदुखी, उत्साह नसणे, शरीर जड होणे, वजन वाढणे, सूज, ग्लानी, तंद्री, पचनाचे विकार, सर्दी, मधुमेह, स्मृती बुद्धीनाश, डोळ्यांचे विकार, इंद्रिय क्षीणता दौर्बल्य निर्माण करते. शिरोविरेचन, उपवास, वमन, विरेचन, कफघ्न क्रिया, रक्तमोक्षण वातवर्धक क्रिया व चिकित्सा व व्यायाम हे अति निद्रेवर आयुर्वेदीय उपाय व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे, जाणकारांच्या सल्ल्याने घ्यावेत. मनस्ताप, क्रोध, अति आवाज, अति थंड पाण्याने आंघोळ, वार्धक्य, कार्यमग्नता, अतिचिंता, विविध व्याधी, उलटी, दम, खोकला, वेदना, फिट्सचे विकार, निद्रा येणारी औषधे अतिप्रमाणात सेवन करणे हे निद्रा नाश करतात. व्यक्तीमध्ये हे विकार अनेक दिवस असल्यास यावर निश्चित व नेमकी उपाययोजना करायला हवी. त्यातील सूक्ष्म मुद्दे लक्षात घेऊन आहार, औषध, योगशास्त्र, मंत्रचिकित्सा, व्यायाम अशा विविध चिकित्सा पद्धतींचा उपयोग करावा. अन्यथा निद्राविकृती शरीरस्थ व्याधी निर्माण करते. निद्रेविषयी आयुर्वेदाचे नियम : अपवाद वगळता दिवसा झोपू नये! तसे झोपल्याने आलस्य, तंद्री, मोह, दुर्बलता, कफवृद्धी, वजन वाढणे, स्रावांमध्ये बदल होणे अशी लक्षणे निर्माण होतात. रात्रीचे जागरण आरोग्याला हितकारक नाही. वाताच्या विकृतीमुळे, चिडचिड होणे, भ्रम होणे, अशक्तपणा, निर्णयक्षमता कमी होणे, नराश्य येणे, पचनशक्ती कमी होणे असे परिणाम घडतात. त्याद्वारे पित्तज, वातज विकार होण्याचा संभव असतो दिवसा झोपण्याला शास्त्राने अपवाद ठेवले आहेत. मद्यपान करणारे, गाणारे (या ठिकाणी कफज विचार आहे), भरपूर चालणारे, जुलाब, खोकला झालेले, दम, उचकी लागणारे, तसेच बालक, वृद्ध, अशक्त, दु:खीकष्टी, रागावलेले, रात्री जागरण करणारे विद्यार्थी, तसेच रात्र पाळी करणारे (जागरणाच्या अर्ध वेळ झोपावे), जुने आजार असणारे, या सगळ्यांना ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसा झोपल्याने विकृत दोषांची वृद्धी होत नाही. जेवणाअगोदर झोपल्याने पचनशक्ती वाढते हेही विशेष. वामकुक्षी हा शब्द दिवसा झोपण्यासाठी सरस वापरला जातो. वामकुक्षी ही संकल्पना आयुर्वेद व योगशास्त्राने अवलंबली आहे. वामकुक्षी ही जेवणाच्या पचनाला गती देण्यासाठी सांगितली गेली असून ही क्रिया उत्तम घडण्यासाठी उजव्या कुशीवर, म्हणजे पोटाच्या विरुद्ध बाजूने त्या कुशीवर, ३२ श्वास होईपर्यंत झोपावे, नंतर ६४ श्वास पोटावर झोपावे मग १२० श्वास होईपर्यंत वामकुक्षी म्हणजे पोटाच्या बाजूने डाव्या कुशीवर १३-१५ मिनिटे झोपावे. ९ शास्त्राने २१५-१८ श्वास सांगितले आहेत त्यावरून झोपावे. १-३-४ तास झोपणे म्हणजे वामकुक्षी नव्हे. स्त्रीवर्ग, घरातील वृद्ध, तसेच जे लवकर सकाळी उठतात त्यांनी वामकुक्षी नक्की घ्यावी. काही सोपे उपाय : आहाराचा विचार करताना प्रकृती विचार करावा. लहान मुलांमध्ये निद्रानाशांवर मालकांगणी तेल, ज्योतिष्मती तेल, शतावरी तेल, वेखंड चूर्ण टाळूमध्ये भरणे यासोबत नेत्रतर्पण यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा. त्याचा फायदा होतो. काजळ घालणे हे निद्रेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने त्याचा उपयोग निद्राविकृतीमध्ये करता येतो. विविध आसन क्रिया या श्वासाशी संबंधित असून प्राणायाम व योग्य शवासन हे निद्राविकृतीवर उपयोगी ठरते. योगाभ्यास व साधना यांचा उपयोग उत्तम होतो. मदानी व्यायाम, मदानी खेळ, धावणे निद्रेसाठी उपयोगी ठरतात. निद्रेसाठी बठय़ा खेळांपेक्षा मदानी खेळ अधिक गुणकारी ठरतात. आजच्या काळात मुले मोबाइल व संगणकाच्या सान्निध्यात अधिक काळ राहतात. नेत्र, आरोग्य, विचार आणि निद्रा तसेच पंचज्ञानेंद्रियांवर त्याचा दुष्परिणाम होताना दिसत आहे. त्यांचा वापर कमी करणे, तसेच प्रार्थना, पाठांतर (हल्ली पाठांतर खूप कमी झाले आहे) विविध मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा, तसेच गायत्री मंत्र यांचा युक्तिपूर्वक अभ्यास निद्रा उत्तम ठेवण्यास मदत करतो. विविध पद्धतीच्या संगीत श्रवणाचा निद्रेवर चांगला परिणाम होतो. काही शास्त्रीय संगीत प्रकार विशेष करून मालकंस आणि इतर राग तसेच विविध वाद्यांचे संगीत, बासरीवादन, सतारवादन, तंबोऱ्याचे सूर, सारंगीवादन अशांचा उपयोग निद्रा प्रकृतीसाठी तसेच मन प्रकृतीसाठी गुणकारी ठरतो. याला संगीत चिकित्सा असेही म्हणता येईल. निद्रा उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा गुणकारी ठरते. शिरोधारा, शिरोलेप, नस्य, अभ्यंग, कर्ण पुरण, नेत्र बस्ती या पंचकर्माचा अभ्यास केल्यास फायदा होतो. मणी चिकित्सा ही एक वैशिष्टय़पूर्ण भारतीय चिकित्सा आहे. त्यात निद्रेसाठी प्रकृतीनुसार विविध मण्यांचा वापर करता येतो. लसण्या, पुष्कराज, मोती यांचा वापर तसेच या मण्यांचे पाणी शरीरस्थ वातावर व मनावर तसेच वात नाडय़ावर गुणकारी ठरते. मणी धारण हे मात्र दीर्घ काळासाठी उपयुक्त ठरते. चांदी हा धातू निद्रा उत्तम आणताना दिसतो, इतर धातूंपेक्षा रजत, ताम्र यांचा वापर पाणी पिण्यासाठी तसेच क्षीर (दूध) सेवनासाठी करावा. भारतीय आहारविहार पद्धती, आयुर्वेद शास्त्र यांनी आरोग्याबद्दल सांगताना निद्रेवर विशेष भर दिला आहे. निद्रेला दैनंदिन कार्यात स्थान देऊन योग्य प्राकृत निद्रेसाठी म्हणजेच शरीर व मनाच्या आरोग्यासाठी प्रयत्न केले आहेत. निद्रा हा स्वभाव आहे, प्रकृती आहे तिला संस्कारांनी योग्य करता येते, असे आयुर्वेद सांगते. response.lokprabha@expressindia.com