अमेय हाटे, दुबई, संयुक्त अरब अमिराती

अमिराती लोकांच्या आयुष्यावर भारतीय लोकांचा बऱ्याच क्षेत्रांमध्ये खूप मोठा प्रभाव आहे. त्यांना बॉलीवूड चित्रपट खूपच आवडतात. भारतीय जेवण, प्रामुख्याने बिर्याणी आवडणाऱ्या लोकांची संख्या इथे मोठय़ा प्रमाणात आढळते. पण दुबई किंवा करामा भागात गेल्यास जणू काही मुंबईत असल्याचाच भास होतो. वडापाव, पावभाजी, मिसळपाव आदी पदार्थ इथे सहज उपलब्ध असतात. त्याचबरोबर शॉपिंगसुद्धा मनापासून एन्जॉय करता येतं. भारत सरकार आणि दुबई सरकार यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत.

दुबई हे संयुक्त अरब अमिराती या देशातील एक सुंदर आणि छोटं शहर आहे. पण छोटं असूनही या शहरात छोटं असं काहीच नाही. सर्वात मोठं, सर्वात उंच, सर्वात वेगवान असं दुबईचं वर्णन केलं तर ते खोटं ठरणार नाही. माझी भारताबाहेरची ही सर्वात पहिली नोकरी होती आणि तीसुद्धा अरब देशात. म्हणून माझ्या मनात खूप कुतूहल होतं, पण चिंतासुद्धा वाटत होती की पुढे कसं निभावेल.. आज अकरा वर्षांनंतर मी आनंदाने आणि अभिमानाने सांगू शकतो की दुबईने मला एक चांगलं करिअर, सुबत्ता, यश, खूप चांगली जीवनपद्धती आणि सुखावह कौटुंबिक आयुष्य दिलं. नेमणुकीच्या वेळी ज्युनिअर पदावर काम करणारा मी आज एका जर्मन इंजिनीअरिंग कंपनीमध्ये मिडल ईस्ट विभागासाठी सेल्स डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. शिवाय एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट बोर्डवरसुद्धा माझी नियुक्ती करण्यात आली. अशा उच्चपदी बहुधा ‘गोरे’ लोक किंवा ‘अमिराती’ असतात. तरीसुद्धा या पदावर एका भारतीय माणसाची निवड करण्यात आली. कारण माझे जर्मन बॉस आणि प्रमुख ऑफिसमधल्या सर्व अधिकाऱ्यांना भारतीय माणसांच्या मेहनत आणि बांधिलकीवर पूर्णपणे विश्वास आहे. या गोष्टीमुळे माझा आत्मविश्वास कमालीचा उंचावला. भारतीय हे दुय्यम नाहीत आणि बढती मिळण्यासाठी एखाद्या विशिष्ट पासपोर्टची त्यांना गरज नाही हेही मी इथे अनुभवलं.

दुबईला एक अद्वितीय शहर म्हणता येईल. साधारणपणे ऐंशी टक्के लोकसंख्या बाहेरून आलेल्यांची आहे. मूळ अरबी नागरिक हे फार कमी आहेत. त्यांना अमिराती म्हणतात. सर्व गल्फ कंट्रीजमध्ये अमिराती लोक सर्वात प्रगत आणि उच्चशिक्षित लोकांपैकी मानले जातात. पुरुष मंडळी पांढऱ्या रंगाचा अंगरखा परिधान करतात. त्याला ‘कंदुरा’ म्हणतात. स्त्रिया काळ्या रंगाचा घोटय़ापर्यंत पोशाख परिधान करतात. त्याला ‘बुरखा’ किंवा ‘अबाया’ म्हणतात. अमिराती लोक अतिशय अभिमानाने त्यांचा मूळ पोशाख अगदी रोजच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा घालून त्यांची संस्कृती जपतात. ‘अरेबिक’ ही त्यांची राष्ट्रभाषा असून धर्म इस्लाम आहे. दुबईमध्ये साधारणपणे तीस टक्के भारतीय असून त्यापैकी ३० टक्के लोक केरळचे रहिवासी आहेत. यू.ए.ई.मध्ये तेलाचा शोध लागण्यापूर्वीपासूनच हे लोक कामासाठी इथे येऊन राहिले आहेत. वृद्ध अमिराती लोक अजूनही त्यांच्या चलनाला ‘दिराम’ म्हणायच्या ऐवजी ‘रुपया’ असंच म्हणतात. कारण दुबई उदयास आली तेव्हा भारतीय रुपया हे चलन म्हणून वापरलं जायचं. कालांतराने ‘दिराम’ हे चलन म्हणून वापरायला सुरुवात झाली.

दुबईच्या प्रगतीमध्ये भारतीय लोकांचा विशेषत: इंजिनीअर्सचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. इंजिनीअर्सना मानवंदना देण्यासाठी दुबई सरकारने ‘बुर्ज खलिफा’वर भारतीय ध्वजाच्या रंगसंगतीची रोषणाई केली होती. इंजिनीअर असल्याचा मला वैयक्तिक आयुष्यात खूप फायदा झाला. अकरा वर्षांपूर्वी मेडिकल टेस्ट आणि व्हिसा मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी एका मोठय़ा रांगेत मी उभा होतो. रांगेचा रागरंग बघून काम व्हायला अनेक तास लागतील, याची मला खात्री होती पण तिथल्या स्टाफपैकी एकाने माझा इंजिनीअर व्हिसा पाहून बाजूलाच इंजिनीअर व्हिसासाठी एक वेगळी रांग आहे, असं सांगितलं. इंजिनीअरला अमिराती लोकांकडून विशेष मान मिळतो. अमिराती लोकांच्या आयुष्यावर भारतीय लोकांचा बऱ्याच क्षेत्रांमध्ये खूप मोठा प्रभाव आहे. त्यांना बॉलीवूड चित्रपट खूपच आवडतात. भारतीय जेवण, प्रामुख्याने बिर्याणी आवडणाऱ्या लोकांची संख्या इथे मोठय़ा प्रमाणात आढळते. पर दुबई किंवा करामा भागात गेल्यास जणू काही मुंबईत असल्याचाच भास होतो. वडापाव, पावभाजी, मिसळपाव आदी पदार्थ इथे सहज उपलब्ध असतात. त्याचबरोबर शॉपिंगसुद्धा मनापासून एन्जॉय करता येतं. भारत सरकार आणि दुबई सरकार यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत.

सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे इथे असून अनेक सणवार दिमाखात साजरे होतात. अनेक चांगले सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. दुबईमध्ये शंभरहून अधिक राष्ट्रीयत्व असलेले नागरिक राहात असल्याने कॉस्मोपॉलिटिन संस्कृती असूनही सामंजस्याचं वातावरण आहे. इथे राहून मीही इतर संस्कृती आणि धर्माचा आदर करू लागलो. दुसऱ्यांच्या राजकीय मतांना मान देऊ  लागलो. त्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला लागलो. त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला. एकदा कामानिमित्त आमच्या क्लाएंट कंपनीच्या एम.डी.ला भेटायला गेलो होतो. तो मेक्सिकन होता. त्याच्या टेबलावर गणपतीची मूर्ती पाहून मी थक्क झालो. त्याने सांगितलं, ‘नवीन कंपनी चालू करताना गणेशाची पूजा करायची असते, म्हणून नवीन ऑफिस घेतल्यावर माझ्या मित्राला मी गणपतीची मूर्ती भेट द्यायला सांगितली’. हे ऐकून मी मनोमन म्हटलं, ‘बाप्पा मोरया..’

इथल्या प्रत्येक माणसाच्या संस्कृतीला खूप मान असल्याने त्यांच्या अन्नालासुद्धा तितकंच महत्त्व दिलं जातं. अरबी लोक प्रामुख्याने कमी तिखट खातात. खजूर आणि सुकामेवा त्यांच्या दैनंदिन जीवनातले मुख्य अन्नपदार्थ मानले जातात. दुबई मुळात वाळवंटी शहर असल्याने ऐंशी टक्के खाद्यपदार्थ हे प्रामुख्याने भारतातून मागवले जातात. जर्मन भाषा शिकायचं ठरवल्यावर मी जर्मन इन्स्टिटय़ूटमध्ये रांगेत उभा राहून एका मराठी मित्राशी बोलत होतो. तेव्हा अचानक मागून आवाज आला, ‘लवकर चला, पुढे चला..’ ते वाक्य चक्क एका अमिराती माणसाच्या तोंडून ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्यावर तो म्हणाला, ‘पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकल्यामुळे त्याला थोडंफार मराठी माहिती आहे’. माझ्या ओळखीतल्या बऱ्याच लोकांना भारतीय शिक्षणाचा आणि शिक्षणपद्धतीचा आदर वाटतो.

अमिराती स्त्रिया अनेक क्षेत्रांत ‘सीईओ’सारख्या उच्चपदी कार्यरत आहेत. अमिराती स्त्रियांना चांगल्या दर्जाची अत्तरं, परफ्युम्स आणि मेकअप किट खूप आवडतात. त्यामुळे प्रत्येक गल्लीत किमान दोन-तीन ब्युटिपार्लर बघायला मिळतात. त्यांना मेहंदी खूप आवडते. सगळ्यात कडक शिस्तीची आणि उच्च दर्जाची कायदा व सुव्यवस्था इथे बघायला मिळते. पहाटे तीन वाजतासुद्धा एकटी मुलगी रस्त्यात चालू शकते. कोणीही तिला त्रास देऊ  शकत नाही. पोलीस आणि न्याययंत्रणा एकदम तत्पर आणि कडक आहेत. कायदा तोडल्यास त्या व्यक्तीला खूप दंड भरावा लागतो. गुन्ह्याची तीव्रता अधिक असल्यास त्या व्यक्तीला दुबईतून हद्दपारसुद्धा केलं जाऊ  शकतं. स्त्रिया आणि लहान मुलांसाठी सगळ्या ठिकाणी वेगळी रांग तयार ठेवत त्यांना प्राधान्य देण्यात येतं, जेणेकरून त्यांना कसलाही त्रास होणार नाही. इथे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं म्हणजे जणू काही उच्च पदवी प्राप्त करण्यासारखं आहे.

दुबईत राजेशाही पद्धत अस्तित्वात आहे. दुबईचा राजा हा यू.ए.ई.चा पंतप्रधान तर अबुधाबीचा राजा हा यु.ए.ई.चा राष्ट्रपती आहे. दुबईची ई शासनपद्धती जगातील सर्व शहरांतल्या अग्रेसर शहरांपैकी एक आहे. बहुतांशी व्यवहार ऑनलाइन होतात. सरकारी कार्यालये सकाळी सात वाजता सुरू होतात. दुबईचा राजा कधी कधी तिथे अचानक भेट देतो आणि कुणी वेळेवर आलं नसल्यास किंवा कायद्याविरुद्ध वर्तन करत असेल तर कडक कारवाई करतो. इथली डेझर्ट सफारी पर्यटक मनापासून एन्जॉय करतात. बुर्ज खलिफा, दुबई मॉल, मिरॅकल गार्डन आदी अनेक गोष्टींचं दुबई माहेरघर मानलं जातं. चोवीस तास पाणी आणि वीज मिळते. पिण्याचं पाणी समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून मिळवलं जात असल्याने पाणी पेट्रोलपेक्षा महाग आहे. प्रत्येक इमारतीत स्विमिंग पूल, जिमची सोय असते. शुक्रवार-शनिवार सुट्टी असल्याने कुटुंबाला छान वेळ देता येतो. दुबई हे खरेदीचं मुख्य ठिकाण आहे. वर्षभर काही ना काही डिस्काउंट डील्स इथे चालूच असतात.

गेल्या दहा वर्षांत मी दुबईला उदयाला येताना बघितलं आहे. ‘वाळवंटात दुबई उभी राहू शकते तर काहीही होऊ  शकतं’, या वाक्यावर माझा प्रचंड विश्वास बसला आणि मनाचा आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, मेहनती वृत्ती अधिकच दृढ आणि बळकट झाली. अमिराती लोकांना चांगली गुणवत्ता असणाऱ्या गोष्टी, वेगवान पद्धतीने पण तेवढय़ाच चांगल्या उत्पादकतेच्या समोर हजर हव्या असतात. त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरवर खूप मोठा दबाव असतो. बाहेरच्या देशातून टॅलेंट आपल्या देशात आणणं, त्यांचा सुयोग्य वापर करून घेणं, त्यांना त्या बदल्यात चांगला मोबदला देणं आणि दुबईला अधिकाधिक प्रगत बनवणं, हे दुबईच्या राजाने अनेकदा सिद्ध केलं आहे. बाहेरून आलेल्या, व्यवसाय करू पाहणाऱ्या अनेक तरुणांना दुबईने चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. चांगल्या करिअरसह चांगली जीवनशैली अनुभवायची असेल तर दुबईसारखं दुसरं शहर नाही.

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com