मुंबईतल्या वांद्रे उपनगरातला प्रसिद्ध बॅण्ड स्टॅण्ड म्हणजे प्रेमी युगुलांचा अड्डा. गर्दीचे ठिकाण असूनही जोडपी समुद्रालगतच्या खडकांवर प्रणयाराधनेत मग्न असतात. त्यांना दुरून बघणारे आंबटशौकीनही इथे मोठय़ा संख्येने असतात. मागील आठवडय़ात अशाच एका जोडप्याचा नको त्या अवस्थेतील एक फोटो कुणीतरी क्लिक केला आणि हा फोटो व्हॉटसअ‍ॅपवर फिरू लागला. त्यातच कुणी तरी या मुलाला आणि मुलीला फेसबुकवरून शोधून काढले आणि त्याचाही फोटो ‘हाच तो मुलगा’ म्हणून पुन्हा फिरू लागला. अर्थात मूळ फोटोतील मुलं वेगळी असतीलही. पण या मुलाचीही नाहक बदनामी होऊ लागली. या मुलाच्या ‘फेसबुक’ वॉलवर तर शिव्यांचा, टिंगलटवाळीचा भडिमार झाला. नंतर उघडकीला आलं की, त्याच्या एका मित्रानेच गंमत म्हणून त्याचा फोटो एडिट करून पसरवला होता. त्या मित्राने दिलगिरी व्यक्त केली. पण तोपर्यंत या मुला-मुलीची बदनामी होत राहिली. अशा पद्धतीने फोटो काढणे, ते सोशल मीडियावर पसरवणे किती गंभीर गुन्हा आहे, याची गंमत म्हणून असं करणाऱ्यांना कल्पना नसते. जे पीडित असतात त्यांना कुठे तक्रार करायची तेदेखील माहीत नसतं.
सध्या प्रत्येकाच्या हातात चांगल्या प्रतीचे (चांगल्या मेगापिक्सलचे) कॅमेरे असलेले स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे कुठेही, कधीही, कुणाचेही फोटो काढले जातात. मुलींचे फोटो काढण्याची आणि ते पसरविण्याची विकृती त्यामुळे वाढीस लागली आहे. सोशल मीडियामध्ये तर असे प्रकार सर्रास घडत असतात. पटापट फोटो काढण्याची आणि ते सोशल साइट्सवर अपलोड करण्याची क्रेझ असते. आपल्या प्रेयसीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढण्याची विकृतीही तयार होते आहे. मग हे फोटो केवळ गंमत म्हणून मित्रांना पाठवले जातात. तेथून मग ते ‘व्हायरल’ होत जातात. आपण काय करतोय याची असे फोटो पाठविणाऱ्यांना कल्पना नसते. मुलींनादेखील आपल्याला ‘व्हिक्टिम’ बनवले जातेय याची कल्पना नसते. पिकनिक, पार्टीच्या वेळी बेसावध क्षणाचे फोटो काढले जातात. मग हे एमएमएस काही क्षणातच जगभर पसरतात. आपला कुणी फोटो काढलाय याची त्या मुलींना कल्पनाही नसते. अशा वेळी काय करायचं हेसुद्धा त्यांना माहीत नसतं. खरं अशा प्रकरणाबाबत तक्रार करणं खूपच सोप्पं असतं. अगदी घरबसल्या आपण तक्रार करून हे प्रकार थांबवू शकतो. अशा तक्रारी वाढतील तशी जरब वाढेल गैरप्रकार कमी होतील.
सायबर गुन्हेतज्ज्ञ अ‍ॅडव्होकेट प्रशांत माळी यांनी सांगितले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी कायद्यात अगदी सखोल आणि प्रत्येक गुन्ह्य़ाबाबत तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. एखाद्या मुलीची बदनामी केली दर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल होतो. कुठल्याही मुलीचा तिला न विचारता साधा फोटो काढला आणि तिने तक्रार केली तर भादंवि संहितेच्या कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल होतो. एखाद्या मुलीचा विवस्त्रावस्थेतील फोटो काढला तर कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल होतो. हाच फोटो जर सोशल साइट्सवर, व्हॉटसअ‍ॅपवर पसरवला तर कलम ३५४ बरोबर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल होतो. यामध्ये विना वॉरंट अटक करण्याची तरतूद असते. एखाद्या जोडप्याचा सेक्स करताना फोटो, व्हिडीयो काढला आणि प्रसारित केला तर माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल होतो. त्याला ५ वर्षे कारावासाची शिक्षा आहे. हे जोडपे जर अल्पवयीन असेल तर ६७ (ब) नुसार गुन्हा दाखल होतो. त्याला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

या गंभीर गुन्ह्य़ांखेरीज सोशल साइट्सवर मुलींना त्रास देण्याचे प्रकारही खूप होतात. मेसेजेस पाठवणे, फेसबुकवर कमेंट करणे, ट्विटरवर फॉलो करत त्यांना त्रास दिला जातो. मुलीच्या इच्छेविरोधात विविध सोशल साइटवर रिक्वेस्ट पाठवली जाते. तिची इच्छा नसताना मैत्री करावी, तिने चॅट करावं म्हणून आग्रह केला जातो. इंग्रजीत त्याला ‘स्टॉकिंग’ असं म्हटलं जातं. मुलीने अशा व्यक्ती विरोधात तक्रार दिली तर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३५४ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली जाते. अशा गुन्ह्य़ासाठी ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे.

cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
Girl brutally killed by boyfriend in Mankhurd
मानखुर्दमधील तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, स्थानिकांमध्ये संताप
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण

विकृतांना धडा
एखादी महिला पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेली की लगेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठलेही गुन्हे असो त्वरित पोलिसांकडे जायला हवं. हा सायबर गुन्हा आहे, असे म्हणून कुठलेही पोलीस ठाणे तुमची तक्रार नाकारू शकत नाहीत. आपल्या फोटोचा कुणी गैरवापर करत बदनामी केली, कुणी ते फॉरवर्ड केले तर त्यांना पकडणार कसं? तंत्रज्ञानामुळे त्यांना पकडणं शक्य असतं. सायबर पोलीस थेट फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल या अमेरिकास्थित कंपन्यांना संपर्क करून त्यांच्या सव्‍‌र्हरमधून माहिती मिळवतात. ते फोटो, वेबपेज तेथून डिलीट केले जातात. गुन्हेगारही सापडू शकतात आणि विकृतांनाही चांगलाच धडा मिळतो.

तक्रार कधी करावी
* कुणी सोशल मीडियावर आपली बदनामी करत असेल तर
* कुणी आपला फोटो एडिट करून गैरवापर करत असेल तर
* आपले फोटो परवानगीशिवाय कुणी पसरवत असेल तर
* कुणी अनोळखी क्रमांकावरून सतत मेसेजेस पाठवून त्रास देत असेल तर

हे लक्षात ठेवा
* महिलांसंदर्भात कुठलीही तक्रार असल्यास मुंबई पोलिसांची हेल्पलाइन आहे – १०३
* घरबसल्या केवळ एसएमएसद्वारे तक्रार करायची असेल तर ७७३८१३३१३३ आणि ७७३८१४४१४४ या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतो.
*  मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.

तक्रार कशी आणि कुठे करावी
vt03सोशल मीडियावर सतत मागे लागून त्रास देणे, मॉर्फ केलेला फोटो टाकून बदनामी करणे असे प्रकार मुलींच्या बाबतीत सर्रास होत असतात. अशा वेळी कुठे तक्रार करायची हे माहीत नसतं. पण ही तक्रार करणं अगदी सोप्पं आहे आणि घरबसल्याही तक्रार करता येते. मुंबईच्या कुठल्याही पोलीस ठाण्यात जाऊन अशा सायबर गुन्ह्य़ासंदर्भातील तक्रार देता येऊ शकते. प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सायबर गुन्हे हाताळण्याबाबत खास प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र डेस्क असून तेथे महिला पोलीस अधिकारी असतात. त्यामुळे तुमची तक्रार महिला पोलीसच नोंदवून घेत असते. वांद्रे येथील बीकेसीमध्ये स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे आहे. मुंबईत कुठेही एखादा सायबर गुन्हा घडला तरी या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देता येते. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाइनही तक्रार करता येते. प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेता येते. तरी कुणीही आमच्याकडे येऊन कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्य़ाबाबत तक्रार देऊ शकतो, असे सायबर सेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी सांगितले. ०२२-२६५०४००८ हा बीकेसी सायबर पोलीस ठाण्याचा क्रमांक आहे.
मुंबई गुन्हे शाखेचा विशेष सायबर सेल क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस मुख्यालयात आहे. तेथे जाऊनही तक्रार देता येते. मुलींनी आपल्याबाबत असा प्रकार घडला तर निर्भीडपणे पुढे यायला हवं. त्यामुळे होणारी बदनामी टळेल आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकेल, असे मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितलं.

व्हायरल व्हिडीओविषयी तुम्हाला काय वाटतं?
‘बदलापूर’, ‘हंटर’ या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री राधिका आपटे गेल्या आठवडय़ात एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली. तिची न्यूड व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही क्लिप अनुराग कश्यपने दिग्दíशत केलेल्या एका शॉर्ट फिल्मचा भाग आहे आणि संदर्भाला सोडून नुसताच एक तुकडा विकृतपणे लीक केल्याची तक्रार अनुरागने पोलिसांत केली आहे. एक अभिनेत्री म्हणून या प्रकरणी राधिकाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण प्रश्न मुळात हा आहे की, असे व्हिडीयोज सोशल मीडियावर शेअर केले जाण्यामागे काय कारणं असावीत? सोशल मीडियावर सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह तरुण पिढीच असते, मग असे व्हिडीयोज शेअर करताना तरुणाई नेमका काय विचार करते? ही विकृती म्हणावी, तर संपूर्ण पिढीच विकृत म्हणायची का? का हा पब्लिसिटी स्टंट आहे? ज्या व्यक्तीच्या संबंधित हा व्हिडीयो असतो त्या व्यक्तीची सामाजिक प्रतिमा, कौटुंबिक आयुष्य याचा विचार केला जातो का? त्या व्यक्तीचा अनादर होत नाही का? तुम्हाला काय वाटतं? या ई-मेल आयडीवर viva.loksatta@gmail.com  तुमचं मत नाव, पत्ता, कॉलेजचं नाव किंवा प्रोफेशन यासकट पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये इ- सेन्सिटिव्हिटी असं जरूर लिहा.
सुहास बिऱ्हाडे