वैष्णवी वैद्य

गूढकथांचा विषय निर्विवादपणे वळतो तो रत्नाकर मतकरी आणि नारायण धारपांच्या लेखनाकडे. या लेखनाचं किंबहुना लेखकांचं वैशिष्टय़ म्हणजे हे साहित्य वाचत असताना एक प्रकारचं वलय आपल्या भोवताली निर्माण होतं आणि नकळत आपण त्या कथानकातलं पात्र होऊन जातो. ती गोष्ट आपलीच आहे किंवा आपल्याच भोवती घडते आहे, असं जाणवून देणारा अदृश्य घटक आपल्याच कल्पनाशक्तीतून निर्माण होतो. माणसाचे अंतर्मन फार चमत्कारिक असते. त्याचे गूढ आजतागायत कोणाला उलगडलेले नाही. तिथेच तर भीती, रहस्य या सगळ्यांचे मूळ दडलेले असते.

याच धर्तीवर आपल्या गूढकथांचे चित्र मनाच्या अंतररूपी कॅनव्हासवर चितारणारे आजच्या पिढीचे लेखक हृषीकेश गुप्ते. त्यांची राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली कादंबरी ‘दंशकाल’ ही याच आशयाची आहे. कोकणातल्या घरंदाज देशमुख परिवाराची कहाणी. या कादंबरीचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मनोवेधक केलं आहे. एका प्रचंड खोल विहिरीतून खाली जाणारा दोरखंड, त्याला लटकत असलेला लामणा, त्याच्या आधारे वर येणारी माणसं आणि त्याच्या तळाशी दडून बसलेला भयंकर प्राणी!

हे त्या कादंबरीचे चित्रदर्शी वर्णन. कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठावरून त्याच्या गूढत्वाचा अंदाज वाचकाला येतो. याच कु तूहूलतेने आपण पानं उलटतो आणि या कालचक्रात अडकतो. या कथेतला नायक तुम्हाआम्हांसारखा सर्वसाधारण मुलगा आहे, ‘अनिरुद्ध’. तो स्वत:ची, त्याच्या घरातल्यांची, भुगावांत कोण्या एकेकाळी प्रतिष्ठित असणाऱ्या देशमुख वाडय़ाची कथा सांगतोय. कथेतील काळानुरूप घडणाऱ्या विचित्र घटना आणि घरातल्यांसकट प्रशस्त अशा देशमुख वाडय़ाची क्रमश: होत जाणारी वाताहात अस्वस्थ करते. अनिरुद्ध ऊर्फ नानू हा देशमुखांचा वारस आणि पेशाने मानसोपचारतज्ज्ञ.

ही कादंबरी प्रथमपुरुषी लिहिली आहे त्यामुळे सुरुवातीच्या प्रत्येक घटनेत वर्णन केलेला गच्च काळोख हासुद्धा त्यातील एक पात्रच बनून जातो. नायकाच्या बालपणापासून अगदी प्रौढ वयापर्यंतच्या कालखंडातील प्रत्येक व्यक्ती, वास्तू, प्रसंग एका गडद गुंत्यात अडकले आहेत. या कथेची सुरुवात अशाच एका विचित्र घटनेनी होते. हीच जणू त्या रहस्यमय कालचक्राची सुरुवात ठरते. लेखनाचा आशय भय अथवा गूढतेचा असला तरी कादंबरीची कथा वेगवेगळ्या घटनांतून जणू नवरसच आपल्यासमोर आणते, हेच या कादंबरीचे वेगळेपण आहे. यातील पात्रांची ओळखसुद्धा घडणाऱ्या घटनांमधूनच होते.

ही कथा वर्तमानकाळातली असली तरी एखाद्या वास्तू, वस्तू किंवा व्यक्तीबद्दल भूतकाळातील संदर्भ, आठवणी अनेक ठिकाणी डोकावतात. कथेत वावरणाऱ्या व्यक्तींसोबतच काही अनामिक, गूढ पात्ररूपी शक्ती अर्थातच आहेत. फक्त काळोखात जाणवणाऱ्या आणि वावरणाऱ्या या शक्तींचे वर्णन अतिशय वास्तववादी वाटते. ‘रात्रीच्या काळोखात घरातल्या भिंतींनासुद्धा जीव येतो आणि त्या जणू सूक्ष्म हालचाल करत असतात’, याच कल्पनेतून जन्माला आलेलं कथेतलं अनामिक रहस्याचं दर्शन लेखकाने वाचकांना घडवलं आहे.

माणूस म्हटलं की भय, क्रोध, लोभ, मैथुन अशा अनेक बीभत्स भावनासुद्धा मनात घर करून असतात. कथेतही वेगवेगळ्या पातळ्यांवर या अगदी उघडपणे मांडल्या आहेत, कदाचित हाच घटक वाचकाला कथेशी घट्ट जोडून ठेवतो. अफाट कल्पनाशक्ती आणि समृद्ध शब्दसंपदेचा वापर यामुळे यातील प्रत्येक घटना ज्या तीव्रतेने वाचकाला उमजायला हवी तशीच उमजते. मुख्य म्हणजे कथेतील प्रत्येक घटनेचा फक्त विचार लेखकाने मांडला असून, निष्कर्ष वाचकावर सोडला आहे. मग ती नायकाच्या आईच्या मृत्यूची घटना असो, भानुकाकाचे वेडेपण असो, अण्णा आणि रेवा काकूचे अनैतिक संबंध असोत किंवा घरात वावरणारी ती अनामिक शक्ती असो.

भरल्या, नांदत्या घराचा अक्षरक्ष: आपल्यासमोर झालेला अंत जितका नायकाला भेडसावून टाकणारा आहे तितकाच वाचकालाही अचंबित करणारा आहे. या कथेतील सगळीच माणसं, नानू (नायक), अनू (नायकाची बायको), आई, अण्णा, भानूकाका, काकू, नंदाकाका, आजी आणि इतर साहाय्यक पात्र या सगळ्यांनाच अनेक शेड्स आहेत. म्हणूनच ती खरीखुरी वाटतात. अनिरुद्ध हा स्वत: एक प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ आहे. जेव्हा आपल्याच माणसांबद्दल इतक्या चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समजतात तेव्हा निश्चितच सगळ्या भावनांचा कल्लोळ अंतरंगी दाटून येतो आणि त्याचं परिमाण करणं अवघड होतं. असंच काहीसं अनिरुद्धचं या कथेत होतं. त्याची दुसरी बाजू म्हणजे, तो मानसोपचारतज्ज्ञ आहे म्हणूनच कदाचित प्रत्येक घटनेचं विश्लेषण करून त्याच्या अधिकाधिक खोलात जाणं हे तत्त्व कथेत दिसून येतं. अनिरुद्ध उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरात येतो, पण या विळख्यात तो नकळत अडकलेला असतो, विविध कारणांनी या घटनांशी त्याचा संबंध येत असतो. काळानुरूप त्याचा डोंबिवलीत प्रशस्त बंगला होतो आणि देशमुखांची उरलीसुरली मंडळी तिथे स्थायिक होतात. हा बंगला अगदी भूगावच्या वाडय़ासारखा हवा असा अनूचा आग्रह तो समजून घेतो आणि पुन्हा जुन्या घटनांचा मागोवा घेतो.

भानुकाकाला लागलेल्या वेडाचा फायदा घेऊन देवधर्माचा बाजार, अपत्यप्राप्तीच्या माफक अपेक्षेने मठात येणाऱ्या स्त्रिया व त्यांच्याबरोबर होणारे गैरव्यवहार, भानुकाकाच्या अंगात येणाऱ्या दोन व्यक्ती या घटना वाचताना वास्तवाचा भास होतो. या सगळ्या प्रसंगांच्या पाश्र्वभूमीवर शेवटी एक भकास शांतता लेखक दर्शवतो पण तीसुद्धा मृगजळासारखी वाटते. त्यातूनही अनपेक्षित वळणं समोर येतात. कौटुंबिक नाटय़ात वावरणारी ही कादंबरी अचानक नैतिक-अनैतिक, सामाजिक पेच गुंतवते आणि सोडवतेसुद्धा!

कादंबरीतील प्रत्येक स्त्रीपात्र विलक्षण आहे. प्रत्येक घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकीचा संबंध असतो. यातल्या आईशी नायक अर्थातच जास्त जवळ असतो. आईच्या अनेक छटा, तिचे घरातले स्थान, घरातल्यांशी संबंध, आण्णा गेल्यावर तिच्यात होणारे असामान्य बदल हे बारकाईने मांडले आहेत. आईचा मृत्यू या घटनेचा नायकाच्या आयुष्यावर बराच परिणाम होतो. त्या घटनेचा ऊहापोहा नायकाच्या मनात शेवटपर्यंत असतो. आधी जिला घरात असामान्य असे महत्त्व नव्हते पण नंतर तिच्याच भोवती अनेक घटनांचे गारूड होते अशी नायकाची काकू. सुरुवातीला स्वत:च्या रूपाचा असणारा गर्व, शरीराची भूक भागविण्यासाठी घडलेले प्रसंग, अपत्यशोकामुळे बदललेले आयुष्य आणि काळानुरूप आलेले शहाणपण या अनेक घटनांमधून काकू वेगवेगळ्या रूपांत आपल्या समोर येते. शेवटी नायकाच्याच मनात अचानक घर करणारी काकूबद्दलची लालसा ही पुन्हा नैतिक-अनैतिकतेच्या विळख्यात वाचकांना अडकवते. मठाच्या गैरप्रकारांमुळे भानुकाकाची पसरलेली महती आणि मिळणारा पैसा याला आजीचा दुजोरा, पण नंतर आपल्याच डोळ्यासमोर एके क करून तिन्ही मुलांची कार्ये पाहिलेली आजी! स्वतंत्र विचारांच्या मुशीत वाढलेली अनू या सगळ्या प्रसंगांचा तर्कसंगतीने आकलन करते, अनेक प्रसंग तिला माहितीही नसतात. पण तिचं पात्र हे अत्यंत खंबीर स्त्रीपात्र आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडलेल्या आत्यावरसुद्धा अनेक संकटं येतात, पण ते पात्र फार प्रकाशझोतात आणलेलं नाही.

कथेचा नायक काही अंशी दुबळा, मोहाला बळी पडणारा आहे. कित्येकदा काही घटना यामुळेच घडल्या आहेत. पण तो देशमुखांचा वंश आहे, वंशाला वाचवणारा एकमेव आधार आहे, मुख्य म्हणजे एक यशस्वी मानसोपचारतज्ज्ञ आहे. या गोष्टी त्याला हे सत्य मान्य करू देत नाहीत. मधल्या काही भागात विषय आखूड होतात आणि कथा खेचली जाते असे वाटते, पण एखादं अनपेक्षित वळणं येतं आणि पुन्हा आपण त्यात गुंतून जातो. काही घटनांचं वर्णन करणारी भाषा अक्षरक्ष: थरकाप उडवेल अशी आहे, पण या दंशकालात आपणही नकळत अडकलेले असतो, आपल्याला अर्धवट सोडणे अशक्य असते.

हृषीकेश गुप्ते हे नाव तरुण वाचकांमध्ये मुख्यत: कोकणातून इतरत्र स्थायिक झालेल्या तरुण वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. ‘दंशकाल’सोबतच त्यांची ‘चौरंग’ कादंबरी आणि ‘घनगर्द’ कथासंग्रह आहे. आतापर्यंत अशा आशयाचे लेखन, वाचन मतकरी, धारप इथपर्यंतच सीमित होते, पण यासोबतच हृषीकेश गुप्ते यांच्या लेखणीची स्वतंत्र शैली वाचकांना नक्की भावेल यात शंकाच नाही.

viva@expressindia.com