vv10नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरांचा किमयागार असं ज्यांचं वर्णन करता येईल, त्या स्वर्गीय मदन मोहन यांचा कालच्या गुरुवारी २५ जूनला जन्मदिवस असतो. इतक्या सुरेल चाली, इतकी सुमधुर गाणी एकच इसम देऊ  शकतो यावर खरे तर विश्वासच बसणे कठीण आहे. एखाद्या जादूगारालाच हे शक्य आहे! जादूगाराच्या पेटाऱ्यातून जसे एकेक आश्चर्यकारक, अद्भुत वस्तू निघतात, त्याचप्रमाणे मदनजींच्या प्रतिभेतून निघालेले एक एक गाणे असे की अंगावर शहारा आणेल. एक एक चाल अशी, की वेडे करून सोडेल.. आणि पुन्हा सगळी अस्सल भारतीय गाणी. एखाद-दोन चालींवर वेस्टर्न सिंफनीचा प्रभाव जाणवेलही, पण त्या चालींची गाणी अशी बनलीत की, पाश्चात्त्य संगीताची आठवणही होणार नाही.
‘तुम्हारी जुल्फ के साये में शाम कर लूंगा..’ कितीही वेळा ऐकले तरी दिल नाही भरत. ‘कर लूंगा..’ मध्ये जो काय निखळ लाडिक भाव भरला आहे, त्यातून रफीसाहेबांचा आवाज. मखमल! असेच अजून एक प्रेमाने ओतप्रोत भरलेले गाणे म्हणजे ‘तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है’. रफीसाहेबांचेच- ‘मेरी आवाज सुनो’ आणि माझे पर्सनल फेव्हरेट- ‘एक हसीन शाम को दिल मेरा खो गया’ हे गजल पठडीचे गाणे. रफी- मदन मोहन म्हटल्यावर एक गाणे विसरून चालणारच नाही- ‘तुम जो मिल गये हो’! मदनजींच्या नेहमीच्या स्टाइलपेक्षा थोडे वेगळे, काहीसे जॅझ स्टाइलचे हे गाणे आजही नवीन वाटते. तलत मेहमूदसाहेबांच्या तलम आवाजातले ‘फिर वोही शाम’ सुद्धा केवळ अप्रतिम!
मदनजींनी रफीसाहाब, लतादीदी, तलत मेहमूद यांच्या गळ्याच्या सुरेलतेचा जसा सुंदर वापर केला तसाच किशोरदा आणि आशाताई यांच्या खटय़ाळ, चंचल आवाजाचासुद्धा मस्त वापर केलाय. उदाहरणार्थ- ‘झुमका गिरा रे’,  ‘शौख नजर की बिजलीया’, ‘जरुरत है जरुरत है’.
अर्थातच सर्वात भन्नाट कॉम्बिनेशन म्हणजे मदन मोहन-लता मंगेशकर. ‘रूके रूके से कदम’, ‘उन्को ये शिकायत है’, ‘दिल ढुंढता है फिर वही’, ‘बय्या ना धरो’, ‘वो चूप रहे तो’, ‘नैना बरसे’, ‘वो भूली दासतां’, ‘आपकी नझरों ने समझा’, ‘जरा सी आहट’, ‘यूँ हसरतों के दाग’ आणि मला फार म्हणजे फारच आवडणारी- खुद्द मदन मोहनजी आणि लतादीदींचे- ‘माईरी मैं कासे कहु पीर अपने जियाकि’ (मदनजींच्या आवाजात कमालीचा दर्द आहे.), ‘हम प्यार में जलने वालोंको’- विशेषत: कडव्याची चाल..(मदन मोहनजींच्या गाण्याची खरी मजा तर कडव्यांमध्येच असते!), नंद रागातले-‘मेरा साया साथ होगा’ आणि कहर म्हणजे ‘लग जा गले’! निर्विवादपणे भारतीय संगीतातील, भारतीयच काय साऱ्या दुनियेतील सर्वात सुंदर गाणे! विषयच संपला!
viva.loksatta@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे  ऐकाच..
चाल बनवताना..
‘वीर-झारा’ या २००४ मध्ये आलेल्या चित्रपटात मदन मोहनजींच्या न वापरल्या गेलेल्या चाली वापरण्यात आलेल्या आहेत. इंटरनेटवर त्या मदनजींच्या आवाजात उपलब्ध आहेत. गंमत म्हणजे ‘तेरे लिये’ या रूपकुमार राठोर- लतादीदींनी गायलेल्या गाण्याची चाल खरे तर ‘दिल ढुंढता है फिर वही’साठी बनली होती. ‘तेरे लिये’च्या चालीत ‘दिल ढुंढता है फिर वही’ ऐकायला मजा तर येतेच, पण ‘दिल..’ची आज असलेली चाल आणि या चालीतला फरक पाहून, शब्दांचे खंड, लय, एकूण भाव यातील वेगळेपण पाहून मदनजी एकेका गाण्यावर किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून पाहत असतील याची कल्पना येते. तसेच मदनजी ‘तुम जो मिल गये हो’ची चाल बनवतानाचे रेकॉर्डिगसुद्धा यू-टय़ूब वर उपलब्ध आहे. सुरांच्या या जादूगाराला चाल बनवताना ऐकणे म्हणजे आनंदाची पर्वणीच!