जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने बुधवारी सकाळी विश्रांती घेतली. मात्र, आकाशात काळ्या ढगांची गर्दी कायम आहे. कयाधू, पेनगंगा नद्या दुथडी भरून वाहात आहेत. ऊध्र्व पेनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने १६ पैकी ११ दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी आठपर्यंत ७७.३८ टक्के पावसाची नोंद झाली. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी वाढत आहे. कृषी विभागाकडून पीक नुकसानीचा अहवाल आल्यानंतर पाहणी करून पंचनामे करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येलदरी धरणात १९.३९ टक्के, तर सिद्धेश्वर धरणात ६९.९३ टक्के पाणीसाठा जमा झाला. सकाळी ८ वाजता पावसाची नोंद मिमीमध्ये, कंसात आतापर्यंत पडलेला पाऊस – हिंगोली ८५.४२ (७२१.४२), वसमत ४६.५७ (६२०.५८), कळमनुरी ७४.६६ (६३१.०५), औंढा नागनाथ १०८.२५ (८००.१२), सेनगाव ११६.५० (६३६.५८), एकूण ४३१.४०. सरासरी ६८१.९९, टक्केवारी ७७.३८.
पैनगंगा धोक्याच्या पातळीवर, गोदावरीही दुथडी
हदगावात पुरामुळे एकाचा मृत्यू
वार्ताहर, नांदेड
गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसाने बुधवारी विश्रांती घेतली. मात्र, विदर्भ तसेच गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने नांदेडचा धोका कायम आहे. पनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, तसेच गोदावरीही दुथडी भरून वाहात आहे. दरम्यान, हदगाव तालुक्यातील उमरी खुर्द येथील बाबुराव दळवी याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात आठ दिवसांपासून कमी-अधिक पडणाऱ्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली. मध्यरात्रीपासून थांबलेल्या पावसाने नांदेडकरांना आठ दिवसांनंतर सूर्यदर्शनही घडले. गेल्या २४ तासात माहूर, हिमायतनगर व हदगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. गोदावरी, पनगंगा नद्या दुथडी भरून वाहात आहेत. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यातून ११६४ क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसरीकडे इसापूर धरणाचेही १३ दरवाजे उघडले आहेत. त्यातून मोठा विसर्ग सुरू असल्याने किनवट, माहूर व हदगाव तालुक्यातल्या अनेक गावांना धोका कायम आहे. विदर्भात पावसाची संततधार कायम असून जिल्हा प्रशासनाने या तिन्ही तालुक्यांना सतर्कतेचे आदेश दिले. हदगाव तालुक्यातील उमरी खुर्द येथील बाबुराव दळवी नाला ओलांडत असताना पुरात वाहून गेल्याने मंगळवारी मरण पावला.