अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेशासाठीचा ओढा आटल्याचा ‘ट्रेंड’ पाहता राज्यात या अभ्यासक्रमाच्या ६० हजारांहून अधिक जागा रिकाम्या राहतील अशी चिन्हे दिसत आहेत. तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५५ हजार जागांसाठी ९३ हजार विद्यार्थी पहिल्या फेरीत सहभागी झाले आहेत. याचाच अर्थ दुसऱ्या फेरीपर्यंत सुमारे ६२ हजार जागा रिकाम्या राहतील. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना या फेरीत सामावून घेतले जाईल, तर आणखी २ हजार विद्यार्थी आयआयटी, एनआयटी आणि वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या इतर राज्यांतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य देतील. या वर्षी फक्त दोन महाविद्यालयांची भर पडून त्यांची एकूण संख्या ३६६ झाली असतानाही, गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या २० हजारांनी जास्त आहे.याहीवर्षी फार मोठय़ा संख्येने जागा रिकाम्या राहणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी मान्य केले. मात्र ही संख्या ६० हजार नाही, तर ४० हजार राहील असे प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर दिसते. हा आकडा गेल्यावर्षीइतकाच राहील, कारण या वर्षी सुमारे साडेसात हजार जागा रद्द करण्यात आल्या असे ते म्हणाले. तथापि, या मुद्यावर कुठलाही तातडीचा तोडगा नजरेला पडत नसून, अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेनेच (एआयसीटीई) स्वत:च्या धोरणांमध्ये बदल करणे आणि नव्या महाविद्यालयांना सरसकट परवानगी न देणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.आम्हीही या संदर्भात स्वत:चा भविष्यकालीन आराखडा तयार केला असून त्यानुसारच नव्या महाविद्यालयांना परवानगी देऊ. मात्र ज्यांना विद्यार्थी मिळत नाहीत अशी अनेक महाविद्यालये त्यांच्या शाखा बंद करण्यासाठी पुढे येत आहेत. खरे तर किमान विद्यार्थ्यांसह महाविद्यालये चालवणे अनेकांना शक्य नसल्यामुळे त्यांनी ती बंद केली आहेत, अशीही माहिती महाजन यांनी दिली.या ‘ट्रेंड’चा फार मोठा फटका नागपूर विभागाला बसणार असून अभियांत्रिकीच्या १० ते १२ हजार जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या ५८ महाविद्यालयांमधील २५ हजारांहून अधिक जागांसाठी फक्त १५ हजार अर्ज आले आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.ज्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील जागांवर सुमारे १० वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या उडय़ा पडत होत्या, तेथील विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचा महाविद्यालयांवर विपरित परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे मूलभूत सुविधांचा आणि शिक्षकांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांवर एआयसीटीईने कडक कारवाई केल्यामुळे तेथील प्रवेशही थांबले आहेत. राज्यात अशा अनेक महाविद्यालयांनी कामकाज बंद केले असून, लोणारा येथील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि वर्धा येथील बाबूराव अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील सध्याच्या तुकडय़ा उत्तीर्ण झाल्यानंतर ती बंद होणार आहेत. ‘सेंट्रल इंडिया’ महाविद्यालय एका प्रख्यात शिक्षणसमूहाला विकण्यात आले असून त्यांची त्या जागेवर एक शाळा उघडण्याची योजना असल्याची माहिती संबंधितांनी दिली. एआयसीटीईने कामठी येथील आयटीएम महाविद्यालय, ठाण्याचे के.सी. कॉलेज आणि मुंबई येथील वसंतदादा पाटील या तीन अभियांत्रिकी महाविद्यालयांतील पहिल्या वर्षांचे प्रवेश यापूर्वीच थांबवले आहेत, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील विद्याशाखानिहाय महाविद्यालये जागांची संख्याअभियांत्रिकी ३६६ १,५५,४६४पदविका ४८२ १,७३,४६७वास्तुशास्त्र ५९ ३,६६७फार्मसी १५३ १०,५६५हॉटेल व्यवस्थापन १० ५३०