येथील कॉटन मार्केटच्या यार्डात शेतक ऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे भिजल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक ऱ्यांनी शनिवारी बाजार समिती कार्यालयावर हल्लाबोल करून मोडतोड केली. या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी एक तास आधीच मालाचा लिलाव सुरू झाल्याने वातावरण निवळले.
दरम्यान, यापुढे आडत्याला विचारूनच मोंढय़ात माल विक्रीला आणावा, अशी सूचना बाजार समितीने शेतक ऱ्यांना दिल्याने समिती व्यापाऱ्यांची बटीक बनल्याची टीका शेतकरीवर्गात होत आहे. बाजार समितीने शेतक ऱ्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी भव्य टीनशेड उभारले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्या या शेडमध्ये लावल्या जातात. परिणामी शेतक ऱ्यांचा माल रस्त्यावर टाकला जातो. त्यामुळे बऱ्याचदा पावसात शेतक ऱ्यांचा माल भिजला जातो. शेतक ऱ्यांनी या बाबत वारंवार तक्रारी करून लक्ष वेधले. परंतु बाजार समितीने याची कोणतीही दखल घेतली नाही. उलट समिती व्यापाऱ्यांची पाठराखण करीत असल्याची टीका शेतक ऱ्यांनी केली.