दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मतांनी विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केल्याचा आनंद येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि मिरवणूक काढून साजरा केला. केंद्रात भाजपप्रणीत सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने या विजयोत्सवाला अधिकच उधाण झाले. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या विजयाची त्यात भर पडल्याने या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन विजयीत्सवाची रंगत वाढली.
रेल्वे स्थानकात प्रवासी गाडय़ांमध्ये शिरून उत्साही कार्यकर्त्यांनी प्रवाशांना पेढे वाटप केले. शहरातील सर्व चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत घोषणाबाजी होत होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी..शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो..आले रे आले मोदी सरकार आले’ आदी उत्स्फूर्त घोषणांनी शहर दणाणून गेले.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहर प्रमुख नारायण पवार, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नाना शिंदे, शहर प्रमुख संतोष बळीद, कैलास अहिरे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवात सहभाग घेतला.
लोकसभा मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर मतमोजणीसंदर्भात अस्तित्वाची लढाई ठरलेल्या या निवडणूक निकालाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यासाठी महावितरणने किमान शुक्रवारी भारनियमन बंद ठेवावे अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु सकाळी १० पर्यंत तर दुपारी १२ ते तीन या वेळेत भारनियमन सुरूच राहिले. काही कार्यकर्त्यांनी महावितरणशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देत भारनियमन होणारच, वरूनच तसे आदेश असल्याचे सांगण्यात आले. केंद्र आणि राज्यात काँग्रेसचे पानिपत होत असल्यानेच महावितरणने राज्य सासनाच्या आदेशानेच भारनियमन केल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली.
निकाल ऐकणाऱ्यांमुळे बाजारपेठेत शुकशुकाट आढळून आला. रेल्वे तसेच बस स्थानकांवरही तुरळक गर्दी होती. अनेक शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी हक्काची सुटी घेत निकाल पाहिला.