लक्ष्मी पूजनाला विद्युत रोषणाईसोबत घरोघरी आणि व्यावसायिक संकुलांमध्ये फुलांची आरास केली जाते. झेंडूच्या फुलांचे वेगळे महत्त्व आहे त्यामुळे बाजारात झेंडूच्या फुलासोबत अन्य फुलांना चांगली मागणी आहे. दिवाळीच्या दिवसात विदर्भामध्ये किमान तीन ते चार कोटीची उलाढाल होत असल्याचा अंदाज फुल विक्रेत्यांनी व्यक्त केला.
सीताबर्डीमधील नेताजी मार्केटमधील फुलांच्या बाजारात गेल्या पंधरा वीस दिवसांपासून झेंडू आणि शेवंतीसह विविध फुलांची आवक वाढली असली भाव मात्र कमी झालेले नाहीत. गेल्यावर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव १५ ते२० टक्क्क्यांनी वाढले आहेत. विदर्भ फूल विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय वेखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यंदा शेवंती व झेंडूच्या फुलांचे भाव चांगलेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले  असले तरी त्याला मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. फूल कितीही महाग असले तरी त्याची खरेदी मात्र करीत असतात. गेल्या काही दिवसात फुलांचे मार्केट वाढले आहे. जिल्ह्य़ातील अनेक फू ल विक्रेते नागपुरात येऊ लागल्यामुळे विक्रेत्यांची संख्या वाढल्यामुळे जागा कमी पडायला लागली आहे. नागपुरात कोलकाता, हैदराबाद, बैतुल, पुणे आणि बंगलोरमधून माल येतो. दिवाळीच्या दिवसात २५ ते ३० ट्रक माल येत असल्याचे वेखंडे यांनी सांगितले.
यात पांढरा गुलाब, टोरो, जरबेरा या फुलांचा समावेश आहे. साधारणत: गणेशोत्सवापासून शेवंती व झेंडूची आवक सुरू होते. गुलाब, अष्टर व गुलछडीचीही आवक यावेळी चांगली आहे. झेंडूची विक्री १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे तर अष्टर, जरबेरा या फुलांची अनुक्रमे ८० ते ९० व १०० ते १२०रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे. टोरो गुलाबाची २५ फुले १५० रुपयांना विकली जात आहेत. फुलांचे भाव तिप्पट असले तरी काही नागरिक किमतीचा विचार न करता फुलांची खरेदी करीत असतात. पहाटेच्या सुमारास फुल बाजारात माल येत असल्यामुळे ठोक स्वरुपात खरेदी करण्यासाठी बाहेरील व्यापारांनी आज मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. शेवंतीच्या राजा वाणाला ९०-१०० रुपये किलो भाव असून, अष्टर १०० रुपये, झेंडू (कोलकाता वाण)८०त ९० रुपये, गावरान झेंडू २०-२५ रुपये, रतलाम (झावरा) ४०-५० रुपये, तर गलांडा ५०-५५ रुपये किलो भाव आहे. मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत विदर्भात मात्र फुलांचे भाव कमी आहेत. उत्सवाचे वातावरण आणि खरेदीची धूम यामुळे फुलांचा बाजार सध्या दरवळून गेला आहे.