साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण वाङ्मय ग्रंथस्वरूपात प्रकाशित करण्यासाठी शासनाने एक प्रकाशन समिती गठित केली आहे. या साहित्याचे हिंदी व इंग्रजी भाषांतर केले जाणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. तुकाराम भाऊराव उपाख्य अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर प्रकाशित ग्रंथांना महाराष्ट्र, देशात तसेच विदेशातही मोठी मागणी आहे. फकिरा ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी. त्यांनी एकूण ३५ कादंबऱ्या, १३ नाटके, १३ वगनाटय़े, दहा पोवाडे, ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवास वर्णन प्रकाशित झाले आहे. वैजयंता, फकिरा, आवडी, अलगुज, चिखलातील कमळ, माकडीचा माळ, वारणेचा वाघ या कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही निघाले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या प्रकाशन समितीचे अध्यक्ष तर राज्यमंत्री उपाध्यक्ष राहतील. उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिव, नांदेडचे शिवाजी उर्फ शिवा खंडू कांबळे, औरंगाबादच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. संजय दासू शिंदे, बीड जिल्ह्य़ातील वडवणीच्या वैष्णवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव पोतलिंग गादेकर, अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ. प्रमोद भीमराव गारोडे, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाबुराव तानसाजी अंभोरे, नागपूर जिल्ह्य़ातील मांढळच्या लेमदेव पाटील महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अश्रू पुंजाजी जाधव तसेच शासकीय मुद्रणालय लेखनसामुग्री व प्रकाशन संचालक आदी या समितीचे सदस्य, उच्च शिक्षण संचालक तसेच आमदार रमेश बागवे, जालनाचे डॉ. दिलीप अर्जुने हे तिघे या समितीचे निमंत्रक तर कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र रायप्पा कुंभार सचिव आहेत. या समितीची मुदत प्रारंभी तीन वर्षे राहणार आहे. अण्णाभाऊ साठे यांचे अद्ययावत व सप्रमाण चरित्र लिहून, समग्र वाङ्मय प्रसिद्ध करून त्याचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर व प्रकाशन करणे, त्यांच्या जीवन कार्यावरील तसेच समीक्षापर साहित्य प्रकाशित करणे, अप्रकाशित साहित्याचे संकलन व संपादन करणे, प्रकाशित साहित्याचे संशोधन करणे आदी कार्य या प्रकाशन समितीला करावे लागणार आहे. या समितीच्या कामकाजासाठी एक संशोधन सहायक, दोन लिपिक व टंकलेखक व एक शिपाई आदी पदांची गरज असून उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधीनस्त असणाऱ्या शासकीय महाविद्यालये, विज्ञान संस्थांमधून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे किंवा कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर कर्मचारी नेमण्यास मंजुरीबाबतचे आदेश स्वतंत्र निर्गमित केले जाणार आहेत.अध्यादेश काढायला वर्षमुळात अशी समिती गठित करायला शासनाला एक वर्ष लागले. विधानसभेच्या गेल्यावर्षी (२०१३) पावसाळी अधिवेशनात यासंबंधी तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य प्रकाशनासाठी एक महिन्यात समिती गठित करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार समिती गठित करून तिला मंजुरी घेऊन अध्यादेश काढण्यासाठी एक वर्ष लागले. १६ जून २०१४ रोजी यासंबंधी अध्यादेश काढण्यात आला.