मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे या दीर्घकाळच्या प्रलंबित मागणीवर सकारात्मक निर्णय होण्यासाठी केंद्रीय कायदा मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज, अॅग्रो अँन्ड एज्युकेशन (वेसमॅक) चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. वेसमॅकतर्फे केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांना निवेदन देण्यात आले आहे.    
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्य़ांतील सर्वसामान्य जनता या मागणीसाठी आग्रही असून सहाही जिल्ह्य़ातील वकील गेल्या जवळपास महिनाभरापासून आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनाला राजकीय पक्ष, जनता, विविध संघटना यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन तापत जाऊन कोर्टाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे शासनाचा हजारो कोटी रुपयांचा महसुल बुडला आहे. या प्रश्नी ललित गांधी यांनी कायदामंत्री कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा केली. सिब्बल हे शुक्रवारपासून चार दिवस रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले असून दौऱ्यावरून आल्यानंतर या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे गांधी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.