उधारीचे पैसे चुकते केल्यानंतरही पैशासाठी धमक्या मिळत असल्याने या त्रासाला कंटाळून एका तरुण दाल मिल व्यावसायिकाने आत्महत्या केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यात किशोर कोठारी, सुनील कोठारी (रा. वर्धमाननगर), राजू शर्मा, शिव शर्मा आणि राहुल शर्मा यांचा समावेश आहे. हे पाचही जण पैशासाठी सौरभ मालानी यांना मोबाईलवरून वारंवार धमक्या देत होते. मालानी यांनी या लोकांकडून मालमत्तेच्या मोबदल्यात कर्ज घेतले होते. सर्व रक्कम परत केल्यानंतरही त्यांनी मालानी यांची कागदपत्रे परत दिली नव्हती. उलट पैसे मिळाले नसल्याचे सांगून मालानी यांचा छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून मालानी यांनी अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. परंतु, मालानी यांच्या पत्नीने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर या पाचजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मांढरे तपास करीत आहेत.