या जिल्ह्य़ातील जनतेने लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे आज या दोन्ही जिल्ह्य़ात विकासाची कामे होत आहेत. परंतु, खऱ्या अर्थाने जिल्ह्य़ाचा विकास कसा घडवून आणायचा आणि विकास कामे खेचून आणायचे हे आता आणखीच सोयीचे झाले आहे. त्यामुळे येत्या १० वर्षांत या दोन्ही जिल्ह्य़ांचा विकासाच्या दृष्टिने कायापालट होणार असल्याचा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
गेल्या १० वर्षांत गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्य़ात विकास खेचून आणला आहेत. त्यानुरूप विकासही होत आहे. सर्वागिण विकास म्हणजे शेतकऱ्यांपासून तर बेरोजगारांपर्यंत, तसेच तळागाळापर्यंत विकासाची चुणूक लागायला पाहिजे तरच सर्वागिण विकास ठरणार आहे. आज ज्या स्वप्नातून विकास पाहिला आहे तेवढा विकास अद्याप झाला नाही. परंतु, विकासाला गती मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्य़ात ‘अदाणी विद्युत निर्मिती प्रकल्प’ भंडाऱ्यात ‘भेल’ यासारखे उद्योग कारखाने या दोन्ही जिल्ह्य़ात सुरू झाल्याने विकासाला चालना मिळाली आहे. त्याचप्रमाणे सिंचनाच्या संदर्भातही गोंदिया-भंडारा हे दोन्ही जिल्हे राज्यातच नव्हे, तर देशातील इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत कितीतरी पटीने पुढे गेले आहेत. या जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी निधी खेचून आणला. धापेवाडा प्रकल्पाचे पूर्ण विकासासाठी आय.बी.पी.अंतर्गत केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात केंद्र सरकारचा जास्त हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. येत्या डिसेंबपर्यंत गोंदिया येथे लाखांदूरपेक्षा जास्त उत्पादन क्षमतेच्या साखर कारखान्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रस्तावित कंपनीचे अधिकारी या क्षेत्राची पाहणी करून गेले आहेत. दोन्ही जिल्ह्य़ातील रेल्वे प्रवाशांची समस्या असो, की इतर समस्या त्या सोडविण्याचे काम आपण प्राधान्याने केले आहे. त्यामुळेच जिल्ह्य़ात विकासाला गती मिळाल्याचे सांगून बिरसी विमानतळ विस्तारीकरण संदर्भात ते म्हणाले की, या विमानतळामुळे मोठे उद्योजक भविष्यात येथे दाखल होणार असल्याने या विमानतळाचा लाभ निश्चितपणे दोन्ही जिल्ह्य़ाला मिळणार आहे. बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काही प्रमाणातील अपूर्ण काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.  जिल्ह्य़ातील नागरिकांच्या वैयक्तिक समस्या देखील जनसंपर्काच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. परंतु काही लोकांच्या पोटात दुखणे सुरू झाले आहे. त्यामुळे अफवांचा बाजार गरम करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र, विकास कोण घडवून आणेल, हे जिल्ह्य़ातील नागरिकांना निश्चितपणे ठावूक  आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.