बारावीच्या निकालात लातूर विभागाने राज्यात चौथे, तर विभागात अग्रस्थान पटकावले. दहावीपेक्षा बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी २० टक्क्यांनी प्रगती केली. वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी बारावीच्या गुणापेक्षा सीईटीच्या गुणांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेकडे विद्यार्थी फारसे लक्ष देत नाहीत. लातूरच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेतही चांगली प्रगती केल्यामुळे लातूरची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली.
या वर्षी क्रीडा विषयातील २५ गुण न मिळाल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम नवीन होता. यात ७० गुण लेखी परीक्षेला, तर प्रात्यक्षिक परीक्षेला ३० गुण होते. अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक असतात. गतवर्षी अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहात असल्यामुळे ५० टक्क्यांची अट शिथिल केली होती. या वर्षी ही अट पुन्हा शिथिल होणार की ५० टक्क्यांची अट कायम राहणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सीईटी परीक्षेच्या निकालाला आणखी काही दिवस असले तरी पालक आतापासूनच आपल्या पाल्याच्या प्रवेशाच्या तयारीला लागले आहेत.