शहरातील नागजी चौफुली भागात मंगळवारी सकाळी मालमोटारीने दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर मालमोटारचालकाने पळ काढला.
या अपघातात सिकंदर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. वडाळा गावातील काद्रीनगर येथे वास्तव्यास असलेले शेख सकाळी नऊच्या सुमारास सायकलवरून निघाले होते. नागजी चौकात ते आले असताना समोरून भरधाव आलेल्या मालमोटारीने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर मालमोटार चालकाने पळ काढला. स्थानिकांनी धाव घेऊन शेख यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मोठी वस्ती असलेल्या भागातील हा चौक अतिशय वर्दळीचा आहे. पावसामुळे बहुतांश रस्त्यांची आधीच दुरवस्था झाल्यामुळे अपघात घडत आहेत. काठे गल्ली चौकातून मुंबई नाक्याकडे जाणारी तसेच वडाळा गावातून द्वारका चौकाकडे येणारी वाहतूक नागजी चौकातून होते. खबरदारीचा उपाय म्हणून चौकात गतिरोधक बसविण्यात आले आहे. मालमोटार चालकास त्याचा अंदाज आला नाही आणि त्याने सायकलस्वारास धडक दिली. या प्रकरणी लतिफ सुलेमान शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.