टोलविरोधी आंदोलनांतर्गत शनिवारी मॉर्निग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. राजकीय नेत्यांसह हजारो नागरिक या महापदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळच्या प्रहरी झालेल्या या आंदोलनामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले. टोल नाक्यावर जाऊन वाहनधारकांना टोल देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. महापदयात्रेच्या सांगतेवेळी खासदार राजू शेट्टी, कॉ.गोविंद पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. लोकशाहीमध्ये कोणालाही अभिमान वाटावे अशाप्रकारचे टोलविरोधी आंदोलन असणार आहे. सनदशीर मार्गाने टोलविरोधी आंदोलन केले जात असताना ते दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी आंदोलकांनी गनिमी काव्याचा वापर करावा. आयआरबी कंपनीला पडद्याआडहून पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनी आंदोलकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला.