नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची मोठय़ा प्रमाणात आवक होत असल्याने सध्या नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा मिळणे ग्राहकांना दुर्मीळ झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने काही व्यापाऱ्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल केले. परंतु, एकूणच बाजारात येणारा माल आणि या विभागाचे बळ यात ताळमेळ बसण्याची शक्यता नसल्याने ग्राहक अडचणीत सापडला आहे. कार्बाईड पावडरची मदत घेऊन बहुतेक आंबे पिकविले जात असल्याचे अनेक ठिकाणी आढळून येते. या आंब्याचे स्वरूप केवळ दिसायला देखणे असते. चव, गंध आणि दर्जा या आंब्याला नसतो. आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या या आंब्याची पारख करून तो खरेदी करू नये, नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा महाग असला तरी तोच घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.मनमाडसह जिल्हय़ातील इतर भागांत इंदूर, मालेगाव, गुजरात, जळगाव, नाशिक, मुंबई येथून शेकडो क्विंटल आंबा विक्रीसाठी येत आहे. अनेकदा हा आंबा वरून दिसायला आकर्षक, गुलाबी, पिवळसर असतो. मात्र, कापल्यानंतर त्याचे खरे स्वरूप उघड होते. हा आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा उपयोग होत असल्याने त्याचा मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी रत्नागिरी हापूसच्या नावाने कमी दराच्या मद्रास हापूसची विक्री होत आहे. काही विक्रेते रत्नागिरी हापूसच्या नावाने मद्रास हापूस ग्राहकांच्या माथी मारत आहे. या दोन्ही आंब्यांच्या दरात मोठी तफावत आहे. लालबाग आंबा केरळमधून तर बदाम हैदराबाद येथून तर हलक्या दर्जाचा हापूस मद्रासहून येतो. अक्षय्यतृतीयेनंतर नागरिकांनी आंबे खाण्यास सुरुवात केली. कार्बाईडने पिकविलेले आंबे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडणे, जुलाब होणे, घशाला खवखव सुटणे, तोंड येणे, घशात फोड येणे आदी प्रकारही सुरू झाल्याच्या तक्रारी आहेत. बाजारपेठेत मद्रास हापूस १०० ते १२० रुपये किलो, लालबाग ४० ते ५० रुपये, बदाम ५० ते ६० रुपये तर रत्नागिरी हापूस ३०० रुपये किलो दराने विकला जात आहे. गुजरातचा केशर ८० ते १०० रुपये किलो असा भाव आहे. परंतु, यापैकी बहुतांश आंबा हा कार्बाईड पिकविलेला असल्याच्या तक्रारी वाढत आहे. नाशिक शहरात रासायनिक पद्धतीने आंबा पिकविणाऱ्या काही व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पण, येणारा माल आणि या विभागाचे बळ यांचा ताळमेळ बसण्याची शक्यता नाही. प्रत्येक ठिकाणी ही यंत्रणा काटेकोरपणे नजर ठेवू शकत नाही. त्याचा लाभ व्यापारी उचलत आहे.कसा ओळखता येईल फरक ?नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या हापूस व इतर आंब्यांचा रंग गुलाबी, पिवळा असतो. कार्बाईड अथवा अन्य रसायनांमध्ये पिकविलेल्या आंब्यांचा रंग हा अतिशय गडद व पिवळाधमक असतो. नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे पिवळे आणि देठ मात्र हिरवे असते. कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याचे देठही पिवळे दिसते. रत्नागिरी हापूसची कोय लहान व दशी नसलेली पातळ सालीची असते. एका पेटीत अथवा एका ठिकाणी ठेवलेले सर्व आंबे जर एकसारखे एका आकारात आणि पिवळेधमक असतील तर ते कार्बाईडने पिकविल्याची शक्यता अधिक असते. चांगल्या नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या आंब्याची साल संपूर्ण तुटत नाही. रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या आंब्याची साल मात्र कुठूनही तुटते. रत्नागिरी अथवा इतर दर्जेदार हापूसचा रस कोईपासून संपूर्ण निघतो. कोईजवळ व सालीजवळ रस शिल्लक राहत नाही. रासायनिक आंब्याचा रस गुठळ्यांच्या स्वरूपात शिल्लक राहतो. कार्बाईडविरहित आंब्याला त्याचा स्वतंत्र सुहास असतो. अधिक आंबे असल्यास हा सुवास परिसरात दरवळतो. मात्र, कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याला सुवास नसतो. या आंब्यांना गोडीही नसते.