गेल्या पाच वर्षांपासूनची कामोठेवासीयांची बससेवेची मागणी अखेर अनेक हुलकावण्यांनंतर पूर्ण होण्याची चिन्हे पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी लाल बावटय़ाचा हिसका दाखविल्यावर या बससेवेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कामोठे नोडमधील प्रवाशांना मानसरोवर रेल्वेस्थानकापर्यंत जाण्यासाठी बससेवा नसल्याने बससेवा ही मुख्य समस्या या वसाहतीमधील प्रवाशांची आहे. स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांनी काही वर्षांपूर्वी एनएमएमटीने सुरू केलेल्या बससेवेला विरोध केल्यामुळे ही बससेवा सुरू होतानाच बंद पडली. येथे बससेवा सुरू व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही अनेक प्रयत्न केले. आमदार ठाकूर यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा करून पनवेल येथून खांदा कॉलनी मार्गे खांदेश्वर रेल्वेस्थानक आणि तेथून मानसरोवर रेल्वेस्थानक अशी बससेवा सुरू केली. मात्र या बससेवेचा मार्ग प्रवाशांच्या सोयीचा नव्हता. त्यामुळे ही बससेवा महिन्याभरात बंद पडली. स्थानिक रिक्षा चालकांचा विरोध पाहता एनएमएमटी प्रशासन पोलिसांनी संरक्षण दिल्यानंतर बससेवा सुरू करू असा जप करत आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस उपायुक्त विजय पाटील आणि पोलीस उपायुक्त संजय येनपुरे, साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये बससेवा सुरू करण्याचे एनएमएमटीला लेखी कळविले. मात्र त्यानंतर पुन्हा एनएमएमटी प्रशासनाने घुमजाव करत रिक्षाचालकांशी बैठक घेऊनच विरोध मावळल्यानंतर येथे बस सुरू करण्याचा पवित्रा घेतला. स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे नेते करीत असल्याने वेळोवेळी एनएमएमटी प्रशासनाकडून बससेवा सुरू करण्यासाठी शेकापचा विरोध असल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र आमदार विवेक पाटील यांनी एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आधारवड यांच्याशी संपर्क साधून एनएमएमटीचा या दुहेरी चालढकलपणा समोर आणला आहे. आमदार पाटील यांनी कामोठेची बससेवा शेकापने रोखली नसून आपल्या बसचालकांचे थकीत पगार आणि नादुरुस्त बसमुळे प्रवाशी हैराण झाले असताना शेकापला का बदनाम करताय, अशी विचारणा केल्यावर व्यवस्थापक आधारवड यांनी येत्या काही दिवसांतच बससेवा सुरू करतो, असा पवित्रा घेतला. आधारवड यांनी दिलेला शब्द पाळून त्यानुसार वाहतूक नियंत्रकांना बसचे मार्ग ठरविण्यासाठीचे आदेश दिले आहेत. कामोठे नोडमधून सायन-पनवेल जोडणारा मार्गही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कामोठे थांबा ते मानसरोवर रेल्वेस्थानक या मार्गावर बससेवा सुरू झाल्यास २५ ते ३० हजार चाकरमान्यांना त्याचा फायदा होईल. कामोठे शहरासह कळंबोली नोडमधील रोडपाली येथील प्रवाशांनाही खारघर किंवा बेलापूर रेल्वेस्थानकापर्यंत पोहचविणाऱ्या वाहतुकीचा हा मोठा दुवा असेल.