पनवेल – ठाणे लोकलने प्रवास करणाऱ्या तुषार जाधव याच्यावर लोकलमध्ये झालेल्या हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला. प्रवाशांवर चोरीच्या उद्देशाने होणारे हल्ले नित्याचे झाल्याने वाशी-ठाणे-पनवेल रेल्वे मार्ग धोक्याचा ठरत आहे. यापूर्वी चोरटय़ांनी महिलांवर हल्ले केले होते. यात एक महिला लोकलमधून कोसळल्याने तिला जीव गमवावा लागला होता. या घटनांमुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना असुरक्षित वाटत असून या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस मात्र अपयशी ठरत आहेत.
लोकलमध्ये नायजेरियन नागरिकांची दादागिरी पाहण्यास मिळते. अनेकदा विकलांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात हे नायजेरियन घुसखोरी करतात. त्यांना प्रवाशांनी जाब विचारल्यास नायजेरियन हाताघाईवर उतरतात. यातच जीआरपीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास तो होत नसल्याने या प्रवाशांना मुकाटय़ाने त्रास सहन करावा लागत असल्याचे सत्य आहे. याचबरोबर विक्रेते, भिकारी आणि गुर्दल्यांचा मुक्त वावर लोकलमध्ये पाहायला मिळतो. सानपाडा, घणसोली, तुर्भे, सीवूड आदी ठिकाणी लोकलच्या दरवाजांजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांची बॅग, घडय़ाळ, मोबाइल आदी हिसकावण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असतात. गेल्या वर्षी सानपाडय़ाजवळील दत्त मंदिराजवळ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटय़ाने खेचल्याने ती महिला लोकलमधून खाली पडली होती. त्याचप्रमाणे घणसोली रेल्वे स्थानकानजीक चोरटय़ाने एका महिलेच्या हातातील बॅग हिसकावल्यामुळे ती महिला लोकलमधून खाली पडली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनांनंतरही रेल्वे पोलिसांनी बोध न घेतल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.