कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील १९ गावांत तातडीने सौरऊर्जेवरील पथदिवे बसविण्याचे आदेश पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात टप्प्या-टप्प्याने या योजनेचा फायदा मिळणार आहे.
वीजकपात व वीजबिल या दोन अडचणींतून या १९ गावांची मुक्तता होणार आहे. मसला (खुर्द) येथे १३, सांगवी (मार्डी) ३, कामठा ४, आपसिंगा १२, सावरगाव १०, वडगाव काटी ७, जळकोटवाडी २, गंजेवाडी ४, सुरगाव ४, तामलवाडी ८, कदमवाडी २, गोंधळवाडी ३, पिंपळा (खुर्द) ७, पिंपळा (बुद्रुक) १२, कोरेवाडी ३, देवकुरळी ६, धोत्री ६ याप्रमाणे सौरऊर्जा संच बसविले जाणार आहेत.
याशिवाय पाणीटंचाईचे तीव्र स्वरूप लक्षात घेता येत्या काळात त्यासाठी २८ कोटी खर्च केले जाणार आहेत. पाण्याची पातळी वाढण्यासाठी, तसेच पाणीटंचाईवर युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
कुलस्वामिनी सूतगिरणीचे अध्यक्ष अशोक मगर, पंचायत समिती उपसभापती प्रकाश चव्हाण, जि. प. सदस्य काशिनाथ बंडगर, सूतगिरणीचे संचालक दिलीप भोकरे, रसिक वाले, माजी सरपंच बाबासाहेब धोंगते, नारायण जाधव आदी उपस्थित होते.