वादळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाळा आणि पाणी टंचाईच्या काळात होऊ घातलेली १६ व्या लोकसभेची निवडणूक ही सातवी आहे. यापूर्वी लोकसभेच्या सहा निवडणुका भर उन्हाळ्यात झाल्या आहेत. यावर्षी विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून बसू लागलेला उन्हाचा तडाखा बघता एप्रिलमध्ये उन्ह चांगलेच तापणार असल्याची चिन्हे असून त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वषार्ंत लोकसभेच्या निवडणुका या भर उन्हाळ्यात झाल्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. १९७१ मध्ये पाचव्या लोकसभेसाठी झालेली निवडणूक १ ते १० मार्च या काळात झाली. १९७७ ची निवडणूक १६ ते २० मार्च या काळात झाली. १९९१ची सार्वत्रिक निवडणूक भर उन्हाळ्यात म्हणजे २० मे ते १५ जून याकाळात झाली. त्यानंतर १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकाही भर उन्हाळ्यात म्हणजे २७ एप्रिल ते ३० मे या काळात घेण्यात आल्या होत्या. २००४ मध्येही २० एप्रिल ते १० मे याकाळात निवडणुका घेण्यात आल्याने मतदारांना भर उन्हात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे लागले होते. सोळाव्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १० एप्रिलला विदर्भात मतदान होणार आहे.मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून दुपारच्यावेळी कडक उन्ह जाणवायला लागले असून उमेदवार आणि कार्यकर्त्यांना उकाडय़ामळे फिरणे कठीण झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर निकाल हाती येईपर्यंतची सर्व प्रक्रिया उन्हाळ्यातच पार पडणार असून त्याचा मतदानावर व पर्यायाने निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. रस्त्यावरील वर्दळ दुपारी १२ उन्हामुळे कमी होताना दिसते. डोक्याला स्कार्फ किंवा टोपी घालून लोक बाहेर पडायला लागले आहेत. घरोघरी कुलर बाहेर निघाले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी गारपीठ आणि वादळी पावसामुळे उन्हाळा उशिरा सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र, वातावरणात झालेल्या अचानक बदल झाल्याने लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षी १० एप्रिलला ४१.७ अंश सेल्सियस तापमान नोंदविले होते. यावर्षी विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या ठिकाणी मार्चच्या पहिल्या आठवडय़ात तापमानाने ३९ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये तापमान ४३ अंश सें. होते. यावर्षीच्या उन्हाळ्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीमध्ये उमटण्याची चिन्हे असून कडक उन्हाचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करताना ऐन उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात उन्हाचा परिणाम निश्चितच जाणवणार आहे. उन्हामुळे मतदार मतदानासाठी कसे बाहेर पडतील याची चिंता उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. निवडणुका जाहीर होऊनही उन्हाच्या तीव्रतेमुळेच अद्यापही निवडणुकांचे वातावरण जाणवत नाही. विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांत आणि शहरातील काही अनधिकृत लेआऊटमध्ये मार्च महिन्यापासूनच पाण्याची टंचाई दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदान केंद्रावर मंडप टाकण्यात आले नव्हते, त्यामुळे दुपारी १२ नंतर मतदान केंद्रांवरचा मतदानाचा ओघ कमी झाला होता. यावेळचा प्रखर उन्हाळा बघता शहर आणि ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर उन्हापासून बचाव करण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे.