कॉलेज रोडवर कॅनडा कॉर्नरपासून भोसला सैनिकी महाविद्यालयापर्यंत सिग्नल यंत्रणा नसल्याने अनेक अपघात घडले असून समाजकंटकांना महिला व मुलींची छेड काढून पसार होण्यास त्यामुळे मदत मिळत असल्याचे सांगत स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्या वतीने या रस्त्यावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी बुधवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अलीकडेच जयेश केळकर या विद्यार्थ्यांला अशाच एका अपघातात प्राणास मुकावे लागले आहे.  संघटनेकडून कुलकर्णी सर्कल, कृषिनगर चौक आणि मॉडेल कॉलनी या ठिकाणी सिग्नल बसविण्याची ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेली मागणीची दखल वाहतूक अधिकारी आणि  महापालिका प्रशासनाने न घेतल्याने जिल्हा संघटक पप्पू शेख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.