महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होणाऱ्या गावांचा निरूत्साह कायम असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा त्यांची संख्या आणखी १३६ गावांनी घसरली आहे. २०१२-१३ या वर्षांत या मोहिमेत ९३९ गावे सहभागी असून ही संख्या गतवर्षी १०७५ इतकी होती. सलग दोन वर्षांपासून सहभागित्वाचे प्रमाण कमी होत असल्याने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत पुन्हा एकदा राजकारण आडवे आल्याचे अधोरेखीत होत आहे.
गावासाठी गावातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वमान्य तोडगा घडवून आणण्याची व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम राबविली जात आहे. परंतु, काही ग्रामपंचायतींच्या अनास्थेमुळे नाशिक जिल्ह्याचा
शंभर टक्के सहभागी होण्याचा निकष अपूर्ण रहात असल्याचे अधोरेखीत झाले आहे. इतर जिल्ह्यात सर्वच गांवे मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी होत दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. सलग दोन वर्षांपासून ही परंपरा कायम राहिल्याने या मोहिमेत सहभागी न होणाऱ्या ग्रामपंचायतींना तंटामुक्त वातावरण नको आहे की काय, अशी साशंकता निर्माण झाली आहे.
या मोहिमेत २०१२-१३ या वर्षांत नाशिक जिल्ह्यातील ९३९ गावे सहभागी झाली आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या १०७५ होती. २०१०-११ वर्षांत १,३४७ गावांनी सहभाग नोंदविला होता. तीन वर्षांतील आकडेवारीचा आढावा घेतल्यास नाशिकच्या सहभागित्वाचे प्रमाण लक्षणियरित्या घटल्याचे लक्षात येते. सलग दोन वर्षांपासून गावांची संख्या कमी होण्यामागे ग्रामपंचायत व इतर निवडणूक हे कारण असल्याचे सांगितले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीत रमलेल्या ग्रामस्थांनी विहित मुदतीत या मोहिमेत सहभागी होण्यात अनास्था दाखविली. त्याची परिणती हे प्रमाण कमी होण्यात झाली आहे. शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत मोहिमेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींना ग्रामसभा आयोजित करावी लागते. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर मोहिमेत सहभाग घेऊ इच्छित असल्याबाबतचे पत्र व तंटामुक्त गाव समिती सदस्यांची यादी संबंधित पोलीस ठाणे प्रमुखास ग्रामपंचायतींना द्यावे लागते. उपरोक्त गावांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. ग्रामीण भागात अतिशय क्षुल्लक कारणावरून होणारे वाद गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारक ठरतात. अशांतता व असुरक्षित वातावरणात कोणताही समाज अथवा गांव विकास साधू शकत नाही. स्थायी व समतोल विकास साधण्यासाठी समाजात शांतता व सुरक्षितता आवश्यक ठरते.
या पाश्र्वभूमीवर, गावातील तंटे गाव पातळीवर मिटविले जावेत आणि गाव पातळीवर तंटे निर्माण होवू नये, याकरिता प्रभावीपणे प्रयत्न करणाऱ्या गावांना शासनाकडून पुरस्कार दिला जातो. पुरस्काराच्या रकमेतून गावाचा विकास साधण्याची संधी उपलब्ध असताना सहभागी न झालेल्या गावांनी ही संधी गमावली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील सहभागी झालेल्या गावांनी ९३९ तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना केली आहे.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील सोळावा लेख