बाबासाहेब नाईक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा आणि कापूस उत्पादक शेतकरी मेळावा शनिवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्यादित पिंपळगाव कान्हा परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या सर्वागसुंदर पुतळ्याचे अनावरण माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर राहतील. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती सूतगिरणीचे प्रमुख मार्गदर्शक मनोहरराव नाईक व सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
लोकनेते दिवंगत बाबासाहेब नाईक यांच्या प्रेरणेतून महागाव तालुक्यातील पिंपळगाव कान्हा येथे १९८१ साली बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीची स्थापना करण्यात आली. १९.५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला राज्य शासनाने १९८६ मध्ये मान्यता दिली. जागतिक बँकेच्या ९.८ कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्यातून या सूतगिरणीची उभारणी १९९० मध्ये पूर्ण झाली व १९.७४ कोटी रुपयांची परतफेड मुदतीच्या आत करण्यात आली. १ एप्रिल १९९१ रोजी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. गेल्या २१ वर्षांच्या कार्यकाळात ३ वर्षे वगळता सतत १८ वर्षे गिरणीने नफा मिळविला. आज सूतगिरणीचा ३ कोटी २६ लाख २१ हजार एवढा संचयित नफा आहे. गिरणीला उत्कृष्ट कामगिरीसाठी आजपर्यंत ९ सुवर्णपदके, २ रौप्यपदके, १ कास्यपदक, तसेच अनेक प्रशस्तिपत्रे महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई व अखिल भारतीय वस्त्रोद्योग महासंघाकडून प्राप्त झाली आहेत. अखिल भारतीय पातळीवर २००५-२००६ व २००६-२००७ या दोन वर्षांत टॉप टेनमध्ये गिरणीने आठवा क्रमांक प्राप्त केला, तसेच सूतगिरणीला गेल्या वीस वर्षांत सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे.
सूतगिरणीच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून पहिल्या टप्प्याचे ३.४२ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. या कर्जाची व्याजासह परतफेड मुदतीच्या आत करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यातील २५.९५ कोटी रुपयांचे काम २०१३ पर्यंत पूर्ण करण्यात येत आहे. या सूतगिरणीच्या सुताची गुणवत्ता उत्तम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुताची निर्यात करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे कापूस उत्पादकांचे, तसेच कामगारांचे जीवनमान उंचावले असून सूतगिरणीने सामाजिक बांधीलकीही जोपासली आहे. रोटरी क्लबच्या सहकार्याने सूतगिरणीने ८ वर्षांपासून आयोजित केलेल्या मोफत शिबिरातून सुमारे १ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून अनेक रुग्णांना दृष्टिदान मिळाले आहे. गिरणीचे ८ हजार सभासद असून त्यांच्या प्रत्येकी १ हजार भागभांडवलाच्या आठपट परतावा सूतगिरणीने आजवर दिला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, उपाध्यक्ष ययाती नाईक, कार्यकारी संचालक एम. आय. पातरी व संचालक मंडळाने केले आहे. पत्रकार परिषदेला गिरणीचे प्रमुख मार्गदर्शक  मनोहरराव नाईक व सूतगिरणीचे संचालक उपस्थित होते.