मराठवाडय़ाचे पाणी चोरणाऱ्यांनी मराठवाडय़ाला शहाणपणाच्या गोष्टी सांगू नयेत. जे हक्काचे ते मराठवाडय़ाला मिळालेच पाहिजे. हक्काच्या पाण्यात कोणी खोडा घालत असेल तर मराठवाडा ते कदापि सहन करणार नाही. जायकवाडीला मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असा निर्धार शिवसेनेच्या वतीने सोमवारी आयोजित रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी करण्यात आला.
मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसनिक व पदाधिकारी, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, अजय गव्हाणे, मारोती बनसोडे, संभाजी लोखंडे, ज्ञानेश्वर पवार, अतुल सरोदे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, भाजपाचे गणेश रोकडे, िलबाजी भोसले, सच्चिदानंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गव्हाणे यांनी या वेळी मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्यासाठीचा संघर्ष परभणीतून होत आहे. मराठवाडा विकास आंदोलनाची ठिणगीही परभणीतूनच पडली होती. या ठिणगीचा पुढे वणवा झाला. त्याच पद्धतीने हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष परभणीतून सुरू झाल्यानंतर तो पुढे मराठवाडाभर पसरणार आहे, असे स्पष्ट केले. नगर, नाशिक जिल्ह्यांनी मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी घेतले आहे. मराठवाडय़ाच्या पाण्यावर चोरी करणाऱ्यांनी हक्काच्या गप्पा मारू नयेत, असे ते म्हणाले. सुधाकर खराटे, गणेश रोकडे, आणेराव, संदीप भंडारी, उदय देशमुख आदींची भाषणे झाली.
विधिमंडळाचे अधिवेशन चालू असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संजय जाधव व मीरा रेंगे आंदोलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. आंदोलनात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेना व भाजपचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सरकारने मराठवाडय़ातील जनतेचा अंत पाहू नये. जायकवाडीला हक्काचे पाणी आले तरच मराठवाडय़ाच्या सर्व जिल्ह्यांत भविष्यात सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अन्यथा पाण्याअभावी मराठवाडय़ातील जनतेला वणवण भटकावे लागेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी भाषणातून व्यक्त केल्या. जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी यापुढेही संघर्ष करावा लागेल, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.