सरत्या वर्षांप्रमाणेच आगामी वर्षांतही बॉलीवूडमध्ये मोठय़ा प्रमाणावर नवोदित दिग्दर्शक पदार्पण करीत आहेत. त्याचबरोबर मोठय़ा संख्येने नवोदित कलावंतही रूपेरी पडद्यावर चमकणार आहेत. विषय वैविध्य, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे बदललेली नव्या पद्धतीची हाताळणी आणि महानगरीय-शहरी-ग्रामीण अशा देशातील सर्व ठिकाणच्या लोकांच्या मानसिकतेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न आगामी वर्षांतही रूपेरी पडद्यावर केला जाणार आहे. किंबहुना सरत्या वर्षांतील विषय वैविध्य आणि मांडणीतील वैविध्य यामुळे बॉलीवूडचा बदलत चाललेला चेहरामोहरा आगामी वर्षांतही असाच वैविध्यपूर्ण राहावा अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून केली जाणार आहे. कारण केवळ असत्यावर सत्याचा विजय, खलनायकी छटेचा नायक, तद्दन प्रेमकथापट, तद्दन भयपट यापेक्षा वेगळ्या धाटणीचे चित्रपट सरत्या वर्षांत आले आणि छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात त्यांनी प्रेक्षकांना जिंकले. त्यामुळेच २०१३ वर्षांतही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कलावंतांचे आणि वेगळ्या प्रकारच्या हाताळणीचे चित्रपट झळकतील असे अपेक्षा नक्कीच करायला हवी.
अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारख्या स्टार कलावंतांबरोबरच रणबीर कपूर, हृतिक रोशन, जॉन अब्राहम, नवाझुद्दीन सिद्दिकी, इम्रान खान, शाहीद कपूर, इम्रान हाश्मी, फरहान अख्तर, आयुषमान खुराना, रणवीर सिंग यांसारख्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील कलावंतांचेही चित्रपट जुन्या दिग्गजांच्या तुलनेत संख्येने अधिक असतील.
बॉलीवूडचा ट्रेण्ड गेल्या वर्षीप्रमाणेच राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि रिअ‍ॅलिटी शोमुळे देशभरातील प्रेक्षकांच्या घराघरांती पोहोचलेला रेमो डिसूजा ‘एबीसीडी’ म्हणजेच ‘एनीबडी कॅन डान्स’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत असून ‘उडान’फेम विक्रमादित्य मोटवाने यांचा ‘लुटेरा’ हा चित्रपट नवीन वर्षांत झळकेल. ‘उडान’सारखा चित्रपट केल्यानंतर ‘लुटेरा’सारखा रोमॅण्टिक चित्रपट करण्याचा विचार या दिग्दर्शकाने केला असून त्यामध्ये रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा अशी रोमॅण्टिक जोडी असेल. हा चित्रपट साधारणपणे जुलै २०१३ च्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होणार असून याद्वारे बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात दमदार कामगिरी दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने करणार असे दिसते.  
‘धूम थ्री’ आणि ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई २’ यांसारखे स्टार कलावंतांच्या गाजलेल्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होते. परंतु, त्याचबरोबर २०१३ वर्षांत झळकणारे ‘काय पो चे’, फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत असलेला ‘भाग मिल्खा भाग’, रणबीर कपूरचा ‘बेशरम’, शाहीद कपूरचा ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या चित्रपटांची सरत्या वर्षांत खूप चर्चा झाली. वास्तविक हे सर्व चित्रपट २०१३ च्या शेवटच्या सहा महिन्यांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. विपणन प्रक्रियेमुळे या चित्रपटांची चर्चा सुरू झाली. हिंदी चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’चे उद्घाटन  करण्यापूर्वी त्याविषयीचे गॉसिप, नंतर एखादेच पोस्टर किंवा आयटम साँग असेल तर त्या गाण्याविषयीची चर्चा असे एकामागून एक सातत्याने मार्केटिंग करीत हिंदी सिनेमा झळकविण्याचा प्रकार गेल्या वर्षीपासून अधिक प्रमाणात सुरू झाला आहे. हा ट्रेण्ड पुढील वर्षीही कायम राहणार असून हॉलीवूडच्या स्टाईलने बॉलीवूडपटांची प्रसिद्धी आणि विपणन करण्याचे निर्मात्यांनी ठरविलेले दिसते.
रणबीर कपूर-कतरिना कैफ या जोडीला घेऊन ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या २००९ मध्ये दिग्दर्शित केलेल्या चित्रपटानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राजकुमार संतोषी आगामी वर्षांत ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा चित्रपट रसिकांसमोर आणणार आहेत. अनेक गाजलेले चित्रपट देणारे संतोषी यांच्या या चित्रपटाबद्दल बरीच हवा २०१२ मध्येच निर्माण झाली होती. ‘ए वेन्सडे’ या समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी गौरविलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे आगामी वर्षांत अक्षय कुमारला घेऊन ‘स्पेशल छब्बीस’ प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. अक्षय कुमारचा चित्रपट म्हणजे ‘फूल टू टाईमपास’ किंवा ‘अ‍ॅक्शनपट’ असणार हे उघडच असले तरी दिग्दर्शक नीरज पांडे असल्यामुळे केवळ बिनडोक मनोरंजनाच्या पलिकडे जाईल का याची प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता आहे.
‘एण्टरटेन्मेंट’ हा एकमेव बॉलीवूडचा फॉम्र्युला मान जात असला या ‘एण्टरटेन्मेंट’चा बादशहा म्हणून अमिताभ बच्चनने ‘हिरो’ असताना चित्रपट केले असले तरी गेल्या काही वर्षांत केवळ मनोरंजन यापलिकडे जाऊन त्याने केलेले वैविध्यपूर्ण आणि तद्दन गल्लाभरू या संकल्पनेपेक्षा वेगळे असे चित्रपटही केले आहेत.
आगामी वर्षांत अमिताभ प्रमुख भूमिकेत असलेला ‘सत्याग्रह : डेमोक्रसी अंडर फायर’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी झळकण्याची शक्यता आहे. एकंदरीत ‘ट्रेण्ड’ पाहता आगामी वर्षांतही सरत्या वर्षांप्रमाणे वैविध्यपूर्ण बॉलीवूडपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील.