महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीला महापौर व स्थायी समिती सभापतींनी आक्षेप घेतल्याने सत्ताधारी गटाचा दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचाच हा प्रयत्न असल्याचा आरोप महापालिका कामगार संघाने केला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी एस. एस. वैद्य हे शासनाच्या अटी व शर्तीत बसत नसल्याचे पत्र महापौर जयश्री दांडे व स्थायी समिती सभापती रमेश जैन यांनी आयुक्तांना दिले आहे. वैद्य यांची नियमबाह्य़ नियुक्ती रद्द करून पात्र व सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सत्ताधारी गटाने चौकशी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसंदर्भात दिलेले पत्र अपूर्ण माहितीच्या आधारावर असल्याचा व दोषी अधिकाऱ्यांना वाचविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप शहीद भगतसिंग महापालिका कामगार संघाने केला आहे. वाघूर पाणीपुरवठा योजनेत दोषी उपअभियंता शशिकांत बोरोले यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचे संघाने पत्रात म्हटले आहे. वैद्य यांच्याकडे महापालिकेतील बोरोले यांची चौकशी पूर्ण करण्यात येऊन त्यांच्याविरुद्धचे सर्व आरोप निर्विवाद सिद्ध झाले आहेत. दुसरे तत्कालीन परंतु सध्या सेवानिवृत्त कामगार कल्याण अधिकारी मधुकर आळंदे  यांनी पालिका प्रशासनास  बेकायदेशीर बिले सादर करून लाखो रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आळंदे यांनी मात्र या चौकशीवर औरंगाबाद खंडपीठातून स्थगिती आणली आहे. आळंदे यांना लिपिक पदावरून थेट कामगार कल्याण अधिकारी अशी पदोन्नती देण्यात आल्याचाही आरोप आहे.