जिल्ह्य़ातील सर्व गाव व शहरांचा परिसर स्वच्छ राहावा, साथीच्या रोगांना प्रतिबंध करता यावा, या उद्देशाने जिल्ह्य़ात २० नोव्हेंबरपासून स्वच्छता पंधरवडा मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाब देवकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवनात साथरोग नियंत्रण व स्वच्छता मोहिमेच्या नियोजन बैठकीत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देवकर यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्य़ात स्वच्छता पंधरवाडा मोहीम राबविण्यासाठी एकाच प्रकारे नियोजन करून गाव ते शहरापर्यंतच्या कार्यक्रमाचा समावेश करण्यात यावे, तसेच सर्व तालुक्यात स्वच्छता मोहिमेची माहिती मिळावी, यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा राबविण्यासंबंधी करण्यात आलेल्या नियोजनाची तसेच साथरोग नियंत्रणासाठी विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक व प्रबोधनात्मक कामाची माहिती दिली.