महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेबाबत दाखल तक्रारी व पुरावे तपासून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लोकसंग्राम पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.
महापालिकेची प्रभाग रचना करताना तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करीत गोपनीयतेचा भंग केला, तसेच काही राजकीय व्यक्ती व नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून त्यांच्या सोयीची प्रभाग रचना करून दिल्याची तक्रार आ. अनिल गोटे यांनी नगरसेवक कैलास हजारे यांच्यासह निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.
मुंबई येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आयुक्त नीला सत्यनारायण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या तक्रारींबाबत चर्चा केली. या शिष्टमंडळात अनिल गोटे यांच्या समवेत गटनेते दिलीप साळुंखे, नगरसेवक कैलास हजारे, प्रशांत भदाणे, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.