घोरपडीचे मटन खाणाऱ्यांना जामीन न देण्याची विनंती
घोरपडीच्या मटनावर ताव मारणाऱ्या पाच शिपायांचा बचाव वरिष्ठ पोलिस अधिकारीच करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून वन व पोलिस खात्यात जुंपली असून पोलिस शिपायांना तात्काळ अटक करून वन कार्यालयात हजर करावे, या आशयाचे सलग तीन वेळा स्मरणपत्र दिल्यानंतरही पोलिस तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपींचा बचाव करत आहेत. दरम्यान, घोरपड शेडय़ूल एकचा प्राणी असल्याने या पाचही आरोपींना जामीन देऊ नये, अशी विनंती वनखात्याने न्यायालयाकडे केली आहे.
येथील जनता महाविद्यालयासमोर गजानन भोजनालयात घोरपडीच्या मटनावर पाच पोलिस शिपाई ताव मारत असतांना वन पथकाने छापा टाकला होता. यावेळी वन पथकाने हॉटेलचे मालक अरुण महाडोळे व गौतम बनसोड यांना अटक केली. मात्र, पोलिस शिपाई अरुण भसारकर, सुरेश सातपुते, विठ्ठल देशमुख, गुलाब पोचाम व प्रमोद डोंगरे फरार झाले. त्या दिवसापासून वनाधिकारी या पाचही जणांचा शोध घेत आहेत. घोरपड हा प्राणी शेडय़ूल क्रमांक एकमध्ये येत असल्याने पाचही शिपायांना तात्काळ अटक करून वन कार्यालयात हजर करण्यात यावे, या आशयाचे पत्र उपवनसंरक्षक एन.डी. चौधरी यांनी स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन यांना दिले. मात्र, मटन खाणारे आरोपी शिपाई असल्याने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीच आता त्यांचा बचाव करत असल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. आज ही घटना होऊन दहा दिवसाचा अवधी होऊनही आरोपी मिळत नाही याला काय म्हणायचे, असा प्रश्न वनाधिकारी उपस्थित करत आहेत. याचाच अर्थ, या फरार शिपायांना पोलिस दलाची मदत होत आहे. गेल्या दहा दिवसात वनखात्याने पोलिस दलाला तीन स्मरणपत्रे देऊन आरोपींना वन कार्यालयात हजर करण्यास सांगितले. मात्र, या स्मरणपत्रांनाही पोलिस दलाने उत्तर दिलेले नाही.
दुसरीकडे या पाचही जणांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आलेला आहे. मात्र, घोरपड हा शेडय़ूल एकचा प्राणी असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती वनखात्याच्या वतीने अ‍ॅड. वेणूगोपाल यांनी केली आहे. आजवर तरी शेडय़ूल एकच्या शिकार प्रकरणात अडकलेल्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातही आरोपींना जामीन मिळणार नाही, असा विश्वास उपवनसंरक्षक चौधरी यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केला. तिकडे घटनास्थळावरून घोरपडीचे मटन, शिपायांच्या गाडय़ा व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याने पोलिस दलाने शिपायांचा बचाव करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यात यश येणार नाही, असे वनखात्याचे म्हणणे आहे. घोरपडीच्या शिकार प्रकरणावरून वन व पोलिस खात्यात चांगलीच जुंपली असल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. दहा दिवसापासून वनखाते शिपायांचा शोध घेत असतांना पोलिस त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर या पाचही जणांना वन कार्यालयात हजर राहावेच लागेल, असे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पाचही शिपायांनी स्वत:ला वन विभागाच्या स्वाधीन करावे अन्यथा, त्यांना अटक करण्याशिवाय पर्याय नाही. या प्रकरणामुळे नाहक पोलिस दलाची बदनामी होत आहे. एखाद्या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करणारे पोलिस अधिकारी तीन स्मरणपत्रे दिल्यानंतरही स्वत:च्या खात्याच्या शिपायांना अटक करून हजर करू शकत नाही, यापेक्षा दुर्देवी बाब ती कोणती, अशीही चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. एकूणच येथे पोलिस दल विरुध्द वनखाते, असा सामना सुरू झालेला बघायला मिळत आहे.