पाण्याच्या प्लास्टिक टाक्यांमुळे मानवी शरीरावर कोणताही परिणाम होत नसल्याची माहिती महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यशाळेत माहिती दिली. ‘प्लास्टिक टाकीची तांत्रिक माहिती’ विषयावरील या कार्यशाळेत बांधकाम क्षेत्रात प्लास्टिक टाकीचे महत्व मांडण्यात आले. सध्या बांधकाम क्षेत्रात हरित इमारत या संकल्पनेवर भर दिला जात असल्याने प्लंबिंग काम देखील पर्यावरणपूरक होण्यावर अभियंत्यांकडून भर दिला जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
व्यासपीठावर विजय जाधव, विजयसिंग परिहार, रवी पाटील उपस्थित होते. सिंटेक्स इंडस्ठ्रिज लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत विजय जाधव यांनी प्रस्तावनेत टिकाऊ व मजबूत प्लंबिंग साहित्याची कशी मागणी होत आहे त्याविषयी माहिती दिली. सध्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्यांना मागणी असून संशोधनामुळे सध्या ५० लिटरपासून ३० हजार लिटर पर्यंत सर्व क्षमतेच्या टिकाऊ प्लास्टिक टाक्या बाजारात उपलब्ध आहेत. भूमिगत टाकीही उपलब्ध आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने टाकी तयार करण्यासाठी साधारणत: २४ दिवस लागतात. मात्र प्लास्टिकची पाम्याची टाकी प्लंबरद्वारे एका दिवसात बसवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विजयसिंग परिहार यांनी तांत्रिक माहिती दिली. सध्या बांधकाम क्षेत्रात ‘हरित इमारत’ संकल्पनेवर भर दिला जात आहे. अर्थातच प्लंबिंग काम देखील पर्यावरणपूरक होण्यावर अभियंत्याचा भर असतो. वाळू व विटा, लोखंड, सिमेंट, खडी या नैसर्गिक साधनांचा वापर आतापर्यंत टाकी बांधण्यासाठी केला जात होता. पण वाळूच्या जास्त उपशामुळे नैसर्गिक जल स्त्रोतावर परिणाम होत आहे. तसेच बांधलेली भूमिगत टाकी गळतीरोधक नसेल तर तर आतील पाणी बाहेर अथवा बाहेरील दुषित पाणी आतमध्ये जाऊ शकते. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच बांधलेल्या टाकीचे झाकण कधीच हवेला रोखणारे नसते. त्यामुळे जीव जंतु व पाली, झुरळांचा शिरकाव सहज होतो. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पाण्याच्या टाक्या १०० टक्के गळतीरोधक असल्याने साधारणत: या टाकीचे आयुष्य ५० वर्षे असते. प्लंबिंग कामातील चुकांमुळे जर टाकीचे नुकसान झाले तर आधुनिक यंत्राव्दारे जागेवर दुरूस्ती केली जाते. अशी माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र प्लंबिंग संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी पाण्याच्या टाकीबरोबर ‘सेप्टींक टँक’ची माहिती दिली. अनेक वेळा इमारत बांधताना वाया जाणाऱ्या साहित्याचा वापर करून सेप्टी टँक बांधल्या जातात. त्यामुळे या तुलनेत नवीन पध्दतीच्या सेप्टी टँक महाग वाटतात. परंतु त्यासाठीचा खर्च फार नसल्याचे त्यांनी नमूद केले. आभार मिलींद चोपडा यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीहरी गांगल यांनी केले.