इरई, झरपट व शहरालगत वाहणाऱ्या वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उद्योगांकडून वर्षांकाठी २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल होत असल्याने वर्धा नदीचे पात्र जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असून येत्या उन्हाळ्यात लगतच्या गावकऱ्यांना पाण्याची भीषण समस्या भेडसावणार आहे.
उद्योगात आघाडीवर असलेल्या या जिल्ह्य़ात वर्धा ही प्रमुख नदी आहे. त्यासोबतच चंद्रपूर शहराचा पाणी पुरवठा इरई नदीवर अवलंबून आहे, तर महाकाली मंदिर परिसरातील यात्रेकरू व लोकांची तहान झरपट नदी भागवते, मात्र या तिन्ही नद्यांचे अस्तित्व सध्या धोक्यात आलेले आहे. वर्धा ही या जिल्ह्य़ासाठी अतिशय महत्वाची नदी आहे. हजारो एकर शेतजमिनीचे सिंचन याच नदीच्या पाण्यातून होते. शेकडो गावांची तहानही ही नदी भागवते, मात्र काही वर्षांंपासून या नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. वेकोलिने या नदीचे पात्रच बदलले आहे, तर आज या जिल्ह्य़ातील औष्णिक विद्युत प्रकल्प याच नदीवर उभारण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने वर्धा पॉवर, धारीवाल, आरपीजी ग्रुप, तसेच येत्या काही वर्षांत येऊ घातलेल्या उद्योगांचा समावेश आहे. या उद्योग समुहांकडून १३५.९८ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जात आहे. विशेष म्हणजे, या वीज प्रकल्पांकडून नदीच्या पात्रात बंधारे बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची तीव्र समस्या भेडसावणार आहे.  
वर्धा पॉवर ४२.१५ दलघमी पाण्याची उचल करत आहे. त्या पाठोपाठ नागपूर एनर्जी इन्फ्रा लि. ४२ दलघमी, नारंडा येथील मुरली अ‍ॅग्रो ४.५६ दलघमी, धारिवाल इन्फ्रा लि. १९.२३ दलघमी, बीएस इस्पात लि. १० दलघमी, शालिवाहन कंस्ट्रक्शन १० दलघमी पाणी वर्धा नदीतून उचलत आहे. धारिवाल इन्फ्रा लिमिटेडला वर्धा नदीत बंधारा बांधायचा होता, मात्र वेकोलि यासाठी परवानगी देत नाही, असे कारण त्यांनी समोर केले आहे. या औष्णिक विद्युत प्रकल्पाव्यतिरिक्त वेगवेगळे उद्योग ६२.५९९ दशलक्ष घनमीटर पाणी वर्धा नदीतून दरवर्षी घेत आहेत. यासोबतच वरोरा एमआयडीसी, वरोरा नगर पालिका, अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, लॉयड मेटल्स, एसीसी, ऑन्र्डनन्स फॅक्टरी, बाबुलाल आइस फॅक्टरी, वॉशरीजकडूनही पाण्याची उचल होत आहे. यासोबतच इरई व झरपट नदीतूनही अशाच प्रकारे पाण्याची उचल होत आहे. इरई धरणातून या शहराला पाणी पुरवठा होतो, तसेच एमआयडीसी व स्थानिक छोटय़ा उद्योगांनाही इरई नदीतून पाणी पुरवठा होत आहे. झरपट नदीतूनही पाण्याची उचल केली जात आहे. त्यामुळे या नद्या भविष्यात राहणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी या तिन्ही नद्यांच्या बचावासाठी विविध सामाजिक संघटना एकत्र आल्या होत्या, परंतु आता या संघटनांचे आंदोलनही थंडबस्त्यात आहेत. सध्या तरी इरई, झरपट व वर्धा या तिन्ही नद्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहेत.